ब्लॉग नं. 2025/028.
दिनांक: 28 जानेवारी, 2026.
मित्रांनो,
“रक्तदाबाची औषधे रोज घेतल्याने
मूत्रपिंड निकामी होतात” अशी एक भीती अनेकांच्या मनात असते आणि तो एक गैरसमजही अनेकांच्या
मनांत आहे.त्यामुळे काही जण औषधे टाळतात,तर काही जण रक्तदाब
नॉर्मल आला की, स्वतःहून औषधे बंद करतात. पण ही समजूत कितपत
खरी आहे?
मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटल्सचे सल्लागार
इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. परिन संगोई यांनी या गैरसमजुतीला स्पष्टपणे
चुकीचे ठरवले आहे.जाणून घेऊ या आजच्या ब्लॉग मधे.
सविस्तर:
रक्तदाबाची औषधे मूत्रपिंडांना नुकसान करतात का? याचे उत्तर स्पष्ट आहे – नाही. डॉ. संगोई सांगतात की, रक्तदाबाची औषधे मूत्रपिंडांना हानी पोहोचवत नाहीत.या उलट, उपचार न केलेला
उच्च रक्तदाब हे मूत्रपिंडाच्या आजाराचे एक प्रमुख कारण आहे.दीर्घकाळ रक्तदाब
जास्त राहिल्यास मूत्रपिंडातील अतिशय सूक्ष्म रक्तवाहिन्यांना हळूहळू इजा होते.
त्यामुळे रक्तातील कचरा गाळण्याची मूत्रपिंडांची क्षमता कमी होते. ही प्रक्रिया
अनेक वर्षे “शांतपणे” चालू असते आणि रुग्णाला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.मग
औषधे सुरू केल्यावर मूत्रपिंडाचा त्रास का लक्षात येतो? अनेकदा असे
घडते की,रक्तदाबाचे निदान होईपर्यंत मूत्रपिंडांचे नुकसान
आधीच सुरू झालेले असते. औषधे सुरू केल्यानंतर नियमित तपासण्या (क्रिएटिनिन,
युरिया, GFR इ.) केल्या जातात.
तेव्हा आधीपासून असलेली मूत्रपिंडाची समस्या “समोर
येते”. यामुळे लोकांना वाटते की औषधांमुळेच हा त्रास झाला. प्रत्यक्षात, हे नुकसान
वर्षानुवर्षे नियंत्रणात न ठेवलेल्या रक्तदाबामुळे झालेले असते, औषधांमुळे नव्हे.रक्तदाब नॉर्मल झाला, तरी औषधे का
थांबवू नयेत?
हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.डॉ.संगोई स्पष्ट करतात
की,
1.रक्तदाब नॉर्मल दिसणे म्हणजे उपचार यशस्वी आहेत.
2. उच्च रक्तदाब ही बहुतेक वेळा आयुष्यभर चालणारी स्थिती असते.
3.अचानक औषधे बंद केल्यास रक्तदाब पुन्हा वाढू शकतो,आणि तोही कोणतीही लक्षणे
न देता.
अचानक वाढलेला रक्तदाब खालील गंभीर धोके निर्माण करू
शकतो. जसे की, हृदयविकाराचा झटका,
मेंदूचा पक्षाघात (स्ट्रोक), मूत्रपिंडांचे आणखी नुकसान
डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे बंद करणे किती धोकादायक?
स्वतःहून औषधे थांबवणे ही सर्वात मोठी आणि धोकादायक
चूक आहे.काही रुग्ण सोशल मीडियावरील सल्ले ऐकतात.मित्रांचे अनुभव ऐकून निर्णय
घेतात, “आता बरं वाटतंय” म्हणून औषधे बंद करतात, यामुळे
रक्तदाब
पुन्हा अनियंत्रित होतो आणि अवयवांचे नुकसान झपाट्याने वाढू शकते.औषधांचा डोस
बदलणे किंवा औषधे बंद करणे हे नेहमी डॉक्टरांच्या देखरेखीखालीच केले पाहिजे.जीवनशैली
सुधारणा उपयोगी आहेत का? होय, नक्कीच.निरोगी जीवनशैलीमुळे रक्तदाब
नियंत्रणात ठेवायला मदत होते, जसे की, मीठ
कमी खाणे,नियमित चालणे / व्यायाम,वजन
नियंत्रण,ताणतणाव कमी करणे आणि पुरेशी झोप घेत चला.
समारोप:
पण लक्षात ठेवा, या सवयी औषधांचा
पर्याय नाहीत.काही रुग्णांमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधांचा डोस कमी होऊ
शकतो, पण औषधे पूर्णपणे बंद करण्यासाठी काळजीपूर्वक वैद्यकीय
निरीक्षण आवश्यक असते. Self- medication is always dangerous. एक लक्षात ठेवा रक्तदाबाची औषधे. ही हृदय, मेंदू आणि मूत्रपिंड या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करतात.यात दीर्घकालीन
गुंतागुंत निर्माण करत नाहीत, तर त्यांना प्रतिबंध करतात.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा
भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु.
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही
वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती
ReplyDeleteखूपच उपयुक्त माहिती आहे. बरेच लोक औषधी बंद करून धोका पत्करतात.
ReplyDeleteउपयुक्त माहिती
ReplyDelete