Blog
No.2025/049.
Date: -18th, February,2025
मित्रांनो,
परवा म्हणजे रविवारी लक्ष्मण उतेकर
दिग्दर्शित “छावा” हा हिन्दी चित्रपट बघितला आणि या विषयावर ब्लॉग लिहिण्याचा मोह मला
आवरला नाही.छत्रपती संभाजी महाराजांवर आलेला हा सुरेख चित्रपट आहे.एका मराठी योध्याचे
सुरेख चित्रण करणारा हा चित्रपट.महाराष्ट्राच्या राजाच्या शौर्याची हिन्दी जगताला आणि
त्या निमित्ताने अखिल भारताला दखल घ्यायला लावणारा हा चित्रपट आहे.मुघल साम्राज्य भरात
असतांना आणि एकीकडे भारतातील अनेक राजे मुघलांचे मांडलीकत्व स्वीकारून,आपली चमडी वाचविण्याचे
प्रयत्न करत असतांना,आपल्या महाराष्ट्रातील दोन महायोध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि
छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघल साम्राज्य आपल्या अतुल सामर्थ्याने थोपविलेच नव्हे,तर त्यांना जेरीस
आणले आणि त्यांना आपला झेंडा महाराष्ट्रात फडकाविता आला नाही,या विचाराने उर भरून येतो.
सविस्तर:
या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची
भूमिका साकारण्यासाठी विकी कौशल या अभिनेत्याची निवड करण्यात आली, तेव्हा वाटलं की
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका हा अभिनेता निश्चितपणे चांगली साकारू शकेल,कारण त्याने
फील्ड मार्शलमध्ये छान भूमिका केली होती.पण छत्रपती संभाजी महाराज ही ऐतिहासिक
भूमिका,त्या भूमिकेत दाखवावा लागणारा आत्मविश्वास,नजरेमधील धार आणि चेहऱ्यावरील कणखरपणा,शौर्य,हे
सारं कितपत निभाऊ शकेल ही शंका माझ्या मनांत होती. पण विकी कौशलने ज्या ताकदीने छत्रपती
संभाजी महाराज ही भूमिका उभी केली आहे,त्याला तोड नाही. छत्रपती संभाजी महाराजांना
जेरबंद केल्यानंतर औरंगजेबाच्या समवेत असलेले गणोजी आणि कान्होजी शिर्के या दोन फितूर
मराठी सरदारांकडे पाहून छत्रपती संभाजी महाराज जो जळजळीत नेत्रकटाक्ष टाकतात,तो प्रसंग
विकी कौशलने अगदी जिवंत केला आहे. बऱ्हाणपूरमध्ये जी भीषण लढाई मराठे आणि मुघलांना
होते,तिचे चित्रीकरण जबरदस्त केले आहे.
रश्मिका मंदाना हिने येसुबाई या छत्रपती
संभाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका जेवढे महत्व त्या भूमिकेला या चित्रपटात दिले होते,ती
छान निभावली आहे, मुख्य म्हणजे ती एका मराठी साम्राज्याची सम्राज्ञी वाटते, (मराठी
वाटते) दिव्या दत्ता हिने छत्रपती संभाजी महाराजांची सावत्र आई सोयराबाईची भूमिका जी
भूमिका नकारात्मक प्रकारची आहे,ती छान रंगवली.चेहऱ्यावरचा
कणखरपणा आणि कोरडेपणा दिव्या दत्ताने छान दर्शविला आहे.आशुतोष राणा सेनापति हंबीरराव
मोहित्यांच्या भूमिकेत छाप पाडून जातो.अकबराची भूमिका नील भुपालम याच्या वाट्याला आली
आहे,तो मात्र आपली छाप सोडू शकला नाही.कवि कलशच्या भूमिकेत विनीत कुमार सिंहने रंग
भरला आहे,तसेच डायना पेंटी हिने औरंगजेबाची क्रूर कन्या झिन्तुन्नीसाची भूमिका लक्षात
राहिल अशा रितीने साकारली आहे.संतोष जुवेकर आणि मनोज कोल्हटकर या दोन मराठी अभिनेत्यांच्या
छोट्या भूमिका या चित्रपटात आहेत.ए.आर. रेहमानला विशेष कौशल्य दाखवायला वाव नव्हता.
आणि सगळ्यात शेवटी क्रूरकर्मा शहेनशहा
औरंगजेबाची भूमिका दुर्लक्षित अभिनेता अक्षय खन्ना याने जबरदस्त ताकदीने रंगविली आहे,त्याचे
चालणे,त्याचे बोलणे,त्याचे पहाणे सारेच आपल्याला ही विसरायला भाग पाडतात की हा खराखुरा
औरंगजेब नसून अक्षय खन्ना आहे.शेवटी,आपल्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांसारखा एक पुत्र
कां जन्माला आला नाही,हे औरंगजेबाचे वैफल्य त्याने छान दाखविले आहे.अक्षय खन्ना हा
केवळ नट नसून तो एक गुणी अभिनेता आहे,हे त्याने आजपर्यंत अनेक भूमिकांमधून दाखवून दिले
आहे.
चित्रपटात संवाद चांगले आहेत,पण बऱ्याच
ठिकाणी संवादांना कात्री लावली गेल्याचे प्रकर्षाने आढळते.कादंबरी ‘छावा’त असणाऱ्या
संवादाच्या मानाने सौम्य संवाद येथे ऐकायला मिळतात.यावरुन चित्रपटाला बऱ्याच प्रमाणात
कात्री लावली असल्याचे जाणवते. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रकरणे
वगळलीत असे वाटते. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन उत्तम आहे.
समारोप:
थोडक्यात,हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांना जाणून घेण्यासाठी पहावा,त्यांचे
शौर्य अनुभवण्यासाठी बघावा.तसेच तो विकी कौशल आणि अक्षय खन्ना या दोन अभिनेत्यांच्या
जबरदस्त भूमिकांसाठी पहावा.आपल्याला शालेय इतिहासातून जेवढा मुघलांचा कळलाय,तेव्हा
मराठ्यांचा माहित नाही,पण देखिल पहावा. बऱ्हाणपूरमध्ये, मराठा सैन्याने मुघलांचा इतका
जबरदस्त पराभव केल्याचे ऐकिवात नव्हते, अशासाठी देखिल पहावा. या चिटपटाला माझे रेटिंग
5/5 किंवा ***** .
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग
येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
image courtesy@youtube
छान लिहितात
ReplyDeleteछान लिहिलात
ReplyDeleteVery nice 👌 👍 👏
ReplyDeleteसुंदर लिहिले आहे .आजच हा सिनेमा बघायचा बेत आहे.👌👌
ReplyDelete