Blog No.2023/298
Date: -29th,
November 2023.
मित्रांनो,
मध्यंतरी
तीन चार दिवस एका खासगी कार्यासाठी,अर्थात शुभ-विवाह मंगल कार्यासाठी शेगांवला गेलो
होतो.त्यामुळे काल सकाळी ब्लॉग लिहू शकलो नव्हतो आणि आज सकाळी सुद्धा.आज घरी परतल्यावर
ब्लॉग लिहायला घेतला गेला.शेगांवला गेलो होतो म्हटल्यावर आज शेगांवच्या श्री संत गजानन
महाराज मंदिर आणि तेथील एकंदर व्यवस्थेवर लिहिणे आलेच.कारण तिथे जाऊन आल्यावर लिहावसं
वाटतंच. आज एक अत्यंत छोटा ब्लॉग श्री संत गजानन महाराज मंदिर या विषयावर.
प्रास्ताविक
या वेळेस
पहिल्यांदा “गजानन विसावा” या भक्त निवासात राहण्याचा योग आला.आनंद सागरच्या परिसरात
खूप मोठे भक्त निवास उभारले आहे.चौथा शनिवार, रविवार आणि सोमवारी कार्तिकी पौर्णिमेला
असणारी गुरु नानक जयंतीची सुट्टी.भक्तांची प्रचंड गर्दी यावेळेस अनुभवास मिळाली. सगळे
भक्त निवास अक्षरशः तुडुंब भरले होते.विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट ही, की पार्किंगची
सोय सगळ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध केलेली आहे.एवढा मोठा परिसर पण अतिशय स्वच्छ,कुठेही
केर कचरा नाही.सगळं कामं अतिशय पद्धतशीर सुरू होते.चहा आणि अल्पोपहाराची सेवा अगदी
अत्यल्प दरात उपलब्ध करून दिलेली आहे.
मंदिरात दर्शन
घेण्यासाठी गेलो.तर तिथे कार पार्क करण्यासाठी विशाल पार्किंगची व्यवस्था केलेली आहे.ही
सुविधा मी पहिल्यांदाच बघितली.जवळपास 200 ते 250 कार पार्क करण्यासाठीची व्यवस्था आहे.मंदिर
परिसर अतिशय स्वच्छ.कुठेही गोंधळ आणि गर्दी नाही. सारे काही सुचारू पद्धतीने सुरू होते.मंदिरात
दर्शनासाठी किती वेळ लागेल हे दर्शन रांगेत प्रवेश करतांनाच दर्शविलेले होते.बाहेर
लिहिल्याप्रमाणे 30 मिनिटांत दर्शन झाले.
माझी मावशी
आणि बहीण दोघीही शेगांवचे सासर असल्याने,मी श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी
गेल्या 55 वर्षापासून मंदिरात जातो आहे.एक आदर्श मंदिर व्यवस्थापन अशीच ओळख माझ्या
मनात अगदी सुरुवातीपासून आहे. याला कारण हे असावे असे वाटते की प्रत्यक्ष श्री गजानन
महाराजांचे सान्निध्य पाटील परिवारास (मंदिराचे व्यवस्थापक) लाभले आहे.त्यांच्यावरील
निस्सीम भक्तीपोटी आणि प्रेमापोटी हा परिवार हे सगळे करत असावा.इतर कित्येक ठिकाणी
दर्शनाच्या वेळी,मंदिराचे सेवेकरी म्हणा किंवा तैनात सुरक्षा कर्मचारी म्हणा, दर्शनाच्या
जागी ढकलाढकली करतात आणि दर्शनार्थीना व्यवस्थित दर्शन करू देत नाहीत. असे शेगांवला
मी आजपर्यन्त कधीच पाहिले नाही. याला कारण जे सेवेकरी आहेत पेड कर्मचारी नाहीत.याचं
एक उदाहरण सांगतो.भक्त निवासाच्या कार पार्किंग साठी एक सेवेकरी होता,तो सांगत होता
की त्याच्या गांवातील पंचवीस जणांची चमू सेवा देण्यासाठी,या तीन दिवसांच्या सुट्टीनिमित्त
आले आहेत.ते एकूण पांच दिवस सेवा देतील आणि मग जवळच्या दुसऱ्या गावातील 25 जणांची चमू
येईल अन सेवा देऊन जाईल.हे सेवेकरी महाराजांचे
भक्त आहेत.ते केवळ सेवेसाठी येतात.त्यामुळे त्यांच्याकडून जसे वर्तन अपेक्षित आहेत,तसेच
ते देत असतात.असे सेवेकरी इतर मंदिरात असतात की नाही मला माहित नाही,पण शेगांवच्या
सेवेकऱ्यांमध्ये समर्पणाची भावना अधिक आहे असेच म्हणावे लागेल.
सारांश
देवाचे ठिकाण हे स्वच्छ असले पाहिजे,तिथे गडबड गोंधळ
नसावा, कारण या गोष्टी जिथे असतील तिथे आपल्यालाच रहावेसे वाटतं नाही,तिथे परमेश्वर
वास करत असेल अशी आपण अपेक्षा कशी ठेवायची.लोकांचा धर्मावरचा विश्वास उडाला आहे,वगैरे
आजकाल व्हॉटस अप ग्रुपमधून वाचायला मिळाले.त्यात तथ्य नाही.हे मंदिरात दर्शनासाठी जमणाऱ्या
प्रचंड गर्दीवरून सिद्ध होते.आजकाल सर्वच मंदिरात गर्दी वाढली आहे. हे लक्षण काही लोकं,अपराध,पापं
वाढलेत म्हणून किंवा काळजी,चिता वाढल्यात म्हणून लोक अधिक प्रमाणात दर्शनाला जाऊ लागले
आहेत असे म्हणत असतील तर त्यातून देखिल देवाप्रती श्रद्धा वाढली आहे हाच अर्थ निघतो.
हे सुलक्षण आहे कारण कुणाप्रती श्रद्धा असणे गरजेचे आहे.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा
वाटला,हे कमेन्ट बॉक्स
मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया
उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी
रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
Chan blog
ReplyDeleteजय गजानन
ReplyDeleteश्री गजानन🙏🌺🌺