ब्लॉग नं:2025/360
दिनांक: 24 डिसेंबर,2025.
मित्रांनो,
:ओझेम्पिक भारतात लाँच होणार :
भारतामध्ये मधुमेह हा एक झपाट्याने वाढणारा आरोग्यविषयक धोका बनला आहे. विशेषत: टाइप 2 मधुमेह आणि त्यासोबत वाढणारी स्थूलता ही चिंतेची बाब बनली आहे.अशा पार्श्वभूमीवर नोव्हो नॉर्डिस्कने ओझेम्पिक (Semaglutide) हे महत्त्वाचे औषध भारतात लाँच केले आहे — जे फक्त मधुमेहावरच नव्हे तर वजन नियंत्रणातही प्रभावी मानले जाते. मात्र, तज्ज्ञांचे ठाम म्हणणे आहे की हे जादुई उपाय नसून, योग्य औषधाबरोबर शिस्तबद्ध जीवनशैली हीच खरी गुरुकिल्ली आहे.आजच्या ब्लॉगमध्ये या औषधाची माहिती करून घेणार आहोत.
सविस्तर:
ओझेम्पिक म्हणजे काय?
ओझेम्पिक हे जीवनशैलीशी संबंधित आजारांवर,विशेषतः टाइप 2 मधुमेह नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करणारे इंजेक्शन स्वरूपातील औषध आहे.भारतात हे औषध 0.25 mg, 0.5 mg आणि 1 mg अशा साप्ताहिक डोसमध्ये उपलब्ध होणार आहे.
CDSCO ने (Central
Drug Standard Control Organisation) याला ऑक्टोबरमध्ये औपचारिक
मान्यता देऊन उपचारांना नवीन दिशा दिली आहे.याबाबत तज्ज्ञांचे मत असे आहे की, औषधापेक्षा
दिनचर्या महत्त्वाची आहे.चेल्लाराम डायबिटीज इन्स्टिट्यूटचे डॉ. उन्नीकृष्णन सांगतात,
“ओझेम्पिक उपयुक्त आहे, परंतु त्याचबरोबर
रुग्णांनी काटेकोर दिनचर्या, संतुलित आहार आणि नियमित
व्यायाम पाळणे अत्यावश्यक आहे.”
हे औषध वजन कमी करण्यास मदत करते, परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या गुंतागुंतींपासूनही संरक्षण देते. त्यामुळे याचा फायदा फक्त मधुमेह नियंत्रित करण्यातच नाही तर एकूणच आरोग्य सुधारण्यातही होतो.
ओझेम्पिक : जागतिक स्तरावरील लोकप्रिय औषध:
ओझेम्पिकला 2017 मध्ये अमेरिकेत प्रथम मान्यता मिळाली.याचा जगभरात मधुमेह आणि वजन नियंत्रणासाठी सर्वाधिक वापर केला जातो. काही ठिकाणी वजन कमी करण्यासाठी ऑफ-लेबल वापरही लोकप्रिय झाला आहे. संशोधनानुसार 8 किलोपर्यंत वजन कमी होण्याची शक्यता असते. नोव्हो नॉर्डिस्क इंडियाचे प्रमुख विक्रांत श्रोत्रिय यांचे म्हणणे आहे की,“ओझेम्पिक फक्त रक्तातील साखर नियंत्रणात ठेवत नाही, तर वजन व्यवस्थापनातही मोठा फायदा होतो. हृदयविकार आणि किडनीच्या समस्यांचा धोका देखील कमी करते.”
भारत वाढती बाजारपेठ होईल का?
भारत हा जगातील टाइप 2 मधुमेहाने प्रभावित झालेल्या लोकांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. स्थूलतेचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. त्यामुळे चयापचयाशी संबंधित औषधांसाठी भारत एक मोठी बाजारपेठ बनत आहे.अहवालानुसार, 2030 पर्यंत वजन नियंत्रण आणि चयापचय औषधांचा जागतिक बाजार 150 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
ओझेम्पिक फक्त डॉक्टरांच्याच सल्ल्याने:
भारतामध्ये हे औषध फक्त एंडोक्राइनोलॉजिस्ट किंवा इंटरनल मेडिसिन तज्ञ यांच्याद्वारेच लिहून दिले जाऊ शकते. हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण,हे कॉस्मेटिक कारणांसाठी वापरणे धोकादायक,योग्य डोस, मॉनिटरिंग आणि फॉलो-अप अनिवार्य तर काही रुग्णांमध्ये साइड इफेक्ट्सची शक्यता आहे.
ओझेम्पिक घेताना काय काळजी घ्यावी?
नियमित व्यायाम:
सप्ताहातून किमान 150 मिनिटे वेगवान चालणे, योगा, हलका कार्डिओ आवश्यक. संतुलित आहार घेणे आवश्यक, कमी कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाणे, भरपूर फायबर असलेले पदार्थ घेणे आणि प्रोसेस्ड फूड टाळणे.
झोप आणि ताण नियंत्रण:
ताण वाढला की साखर वाढते. त्यामुळे योग, प्राणायाम आणि चांगली झोप महत्त्वाची.
नियमित तपासणी:
HbA1c, क्रिएटिनिन, लिपिड प्रोफाइल यांची सतत तपासणी आवश्यक.
समारोप:
ओझेम्पिकच्या आगमनामुळे मधुमेह आणि वजन नियंत्रणासाठी भारतात एक प्रभावी पर्याय उपलब्ध झाला आहे. परंतु लक्षात ठेवा, एका इंजेक्शनने चमत्कार होत नाही.तर आरोग्य सुधारणे हे औषध + आहार + व्यायाम + शिस्त यांची संयुक्त प्रक्रिया आहे.आपण किंवा आपल्या प्रियजनांपैकी कोणी ओझेम्पिकचा उपयोग करण्याचा विचार करत असल्यास, प्रथम तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हेच योग्य पाऊल ठरेल.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

प्रसाद सर, तुम्ही या ब्लॉग मधून दररोज नविन नविन माहिती देत असता
ReplyDeleteआजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही ओझेंपिक विषयी खूप उपयुक्त माहिती दिली आहे, धन्यवाद
मिलिंद निमदेव
खूप उपयुक्त माहिती
ReplyDelete