ब्लॉग नं. 2024/308
दिनांक:- 19 डिसेंबर, 2024.
मित्रांनो,
भारताचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन
अश्विन याने वयाच्या 38 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. ऑस्ट्रेलियात
गॅबा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर त्याने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. भारतीय कर्णधार
रोहित शर्मा यांच्यासोबत पत्रकार परिषदेत उपस्थित राहून अश्विनने हा निवृत्तीचा निर्णय
जाहीर केला,तो त्याच्या भाषणात म्हणाला, "आजचा दिवस
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माझा शेवटचा दिवस आहे." या विषयावर आहे आजचा ब्लॉग.
सविस्तर:
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका
पराभवानंतर निवृत्तीबाबत विचार करण्यास सुरुवात केली होती. अश्विन यांची निवृत्ती
हा एक शांत आणि विचारपूर्वक निर्णय असल्याचे दिसते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत
अंतिम 11 खेळाडूमध्ये निवड होऊ न शकल्याने आश्विनचा निर्णय पक्का झाला असावा.
दैदिप्यमान कारकीर्द:
14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अश्विनने अनेक विक्रम प्रस्थापित
केले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 106
सामन्यांत 24.00 च्या सरासरीने 537 बळी मिळवले. अनिल कुंबळे यांच्यानंतर भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा
गोलंदाज हा किताब त्याने पटकावला. त्याची एका डावातील सर्वोत्तम गोलंदाजी 7/59
अशी आहे. तसेच त्यांनी 37 वेळा एका डावात पाच
बळी घेतले,तर 8 वेळा एका सामन्यात दहा बळी घेतले.
वनडे क्रिकेटमध्ये अश्विनने 116 सामन्यांत 33.20 च्या सरासरीने 156
बळी घेतले, तर त्याची सर्वोत्तम कामगिरी 4/25
अशी आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये
त्याने 65 सामन्यांत 23.22 च्या
सरासरीने 72 बळी मिळवले. त्याच्या सर्वोत्तम कामगिरीत 4/8
चा समावेश आहे.
त्याच्या फिरकी गोलंदाजीसोबतच,अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी देखिल केली आहे. त्याने एकूण 3,503 धावा 25.92 च्या सरासरीने केल्या, असून कसोटी क्रिकेटमध्ये त्याची 6 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली. त्याचा सर्वोत्तम स्कोर 124 धावांचा आहे.अश्विनने एकंदर 11 वेळा Man of the Series चा बहुमान पटकावला,हा देखिल एक विक्रम आहे.
अश्विनने त्याच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले. त्याने फक्त 54 कसोटी
सामन्यांत 300 बळी घेण्याचा विक्रम केला, जो यापूर्वी डेनिस लिली यांच्या नावावर होता. त्यांच्या 'कॅरम बॉल' ने अनेक फलंदाजांना चकवले आणि त्यांचे
गोलंदाजीतील नियोजन हा त्यांचा प्रमुख शक्तीबिंदू राहिला. विशेषतः भारतातील
सामन्यांमध्ये ते संघासाठी यशस्वी ठरले.
सहकाऱ्यांच्या
प्रतिक्रिया:
अश्विन यांच्या निवृत्तीने क्रिकेटविश्वात अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.त्याचा
संघ सहकारी आणि माजी कर्णधार विराट कोहली
याने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे, "गेल्या 14 वर्षांत
तुझ्यासोबत खेळलो.आज तुझी निवृत्तीची बातमी ऐकून मी खूप भावनिक झालो आहे."
माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी अश्विन याची महत्त्वाकांक्षा आणि यशाचा गौरव
केला, तर इरफान पठाण यांनी त्याचा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च विकेट
घेणारा गोलंदाज म्हणून गौरव केला.
कर्णधार रोहित शर्मा यांनी सांगितले, "निवृत्ती हा अत्यंत वैयक्तिक निर्णय
आहे, आणि तो आपण आदराने घेतला पाहिजे."
वारसा आणि
पुढील वाटचाल:
अश्विनच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेटमधील एक सुवर्णयुग संपले आहे. त्याच्या
कौशल्यपूर्ण गोलंदाजीने त्याने संघाला अनेक वेळा विजय मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय
क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही तो क्लब स्तरावर खेळत राहिल,असे त्यांनी
सांगितले.क्रिकेटरसिकांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी अश्विन यांचे योगदान कायमच
प्रेरणादायी ठरेल. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी
लिहिले जाईल.
समारोप:
अश्विनने पत्रकारांशी बोलतांना सांगितले
की, “माफ करा,मी आज कुठल्याही प्रश्नाला व्यवस्थित उत्तर देऊ शकणार नाही,कारण मी आज
खूप खूप भावुक झालो आहे.” त्याने क्रिकेट बोर्डाचे,संघ सहकार्यांचे आभार मानले आणि
रोहित शर्मा,विराट कोहली,चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे यांचे विशेष आभार मानले,त्यांनी
झेल पकडल्यामुळे मी इतक्या विकेट घेऊ शकलो.बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्न,वेंकटराघवन,भागवत
चंद्रशेखर, अनिल कुंबळे, हरभजनसिंग आदि ज्येष्ठ गोलंदाजांच्या पंक्तीत जो जाऊन बसला
आहे.या निमित्ताने म्हणावेसे वाटते की “Thank you,अश्विन, तुझ्या मुळे आम्हाला आपल्या
देशाच्या टीमने,अनेक विजय मिळविले हे पहायला मिळाले.”
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा
वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये
तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त
जगा.
प्रसाद
नातु.
आश्विन महान आणि गुणवान खेळाडू आहेच ,आपण त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाचा आदर करायला पाहिजे...पण मला असे वाटते की ऑस्ट्रेलिया भारत राहिलेले दोन कसोटी सामने पूर्ण करून त्याने निवृत्त व्हायला हवे होते.. पण अर्थात हा संपूर्ण पाने त्याचा निर्णय आहे..असो अशिविन तुझे भावी आयुष्य निरामय आणि आनंदी जावो यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!
ReplyDeleteGlorious career coming to an end. Ashwin, you will be always remembered. Happy Retirement
ReplyDelete