Blog No 2024/193.
दिनांक:23 ऑगस्ट, 2024
मित्रांनो,
बंगालमध्ये हॉस्पिटलमध्ये जे प्रकरण घडले किंवा आता काल परवा
महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये जे घडले. ती कृत्ये माणुसकीला काळिमा फासणारी आहेत.
आपण माणूस म्हणण्याच्या किंवा जगण्याच्या लायकीचे आहोत कां? की ज्यामुळे माणसावर
चालवण्यात येणारे खटले या क्रूरकर्मा लोकांवर चालविण्यात यावेत कां? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यांना खरोखर
मानव म्हणून यांच्यावर खटले चालवावेत की यांना वेगळी काही तरी संज्ञा देऊन त्यांच्यावर खटले
चालवावेत.100 दोषी सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये
असे कायदा म्हणतो,पण हे माणसाला लागू असावे. हैवानाला किंवा शैतानाला नाही. हैवानासाठी
आणि शैतानासाठी वेगळे कायदे असावेत.
सविस्तर:
बदलापूरमध्ये साडे तीन आणि सहा
वर्षाच्या बालिकांसोबत अश्लील कृत्य करणारा माणूस म्हणता येईल कां ? त्याला पशू
म्हणणं देखिल प्राण्यांचा अपमान आहे.आणि या गोष्टीचे राजकारण करणारे हे विसरत आहेत
की त्या मुलींना आधी न्याय मिळवून द्यायचा आहे,त्या कुकर्मी माणसाला लवकरात शिक्षा
कशी होईल हे आधी बघायचे आहे. या गोष्टींवर सर्व राजकीय पक्षांचे एकमत होणे गरजेचे
आहे, कारण राजकारणामुळे जे घडले आहे,त्याचे गांभीर्य कमी केलं जातंय.संविधान बचाओ
म्हणून टाहो फोडणारे त्या कुकर्मी माणसाला आताच्या आता फाशी द्या,असं कसं म्हणू
शकतात. आधी पोलिस केस, मग चौकशी,मग सुनावण्या, मग तारीख पे तारीख हे कायदे मंडळात
बसून तुम्ही लोकांनी ठरविलेत ना? म्हणून म्हणतो आता हैवानासाठी
आणि शैतानासाठी वेगळे कायदे असावेत.यात आरोपीला कोर्टातर्फे वकील वगैरे देण्याची
माणुसकी दाखवता कामा नये. कारण माणुसकी
माणसाला दाखवायची असते. हैवानासाठी आणि शैतानासाठी माणुसकी नाही.
नोट दाखवून किंवा आधीच्या
भाषेत हरी पत्ती दाखवून पोलिस,थोडक्यात कायदा विकत घेता येतो हे जनतेला कुणी
शिकवलं? गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाळायला कुणी सुरुवात केली ? दुष्ट प्रवृत्ती या देशांत कुणामुळे फोफावल्या?
याचा विचार व्हायला हवा.सुसंस्कृत समाज या बाबतीत उदासीन आहे,काहीही घडलं तरी “मला
काय करायचं आहे? मी कशाला या भानगडीत पडू?” या वृत्तीने नुकसान झाले आहे. सुरेख
रोड झाले,बिल्डिंगस उभ्या राहिल्या, जीडीपी म्हणजेच प्रगती झाली कां? आज आपले
शिक्षण माणूस घडवायला कमी पडलंय. तुम्ही डॉक्टर,इंजीनियर,वकील,शास्त्रज्ञ कित्येक
घडवलेत, पण माणसाला माणूस म्हणून घडवायला शिक्षण आणि शैक्षणिक धोरण कमी पडलंय.
शैतानाला किंवा हैवानाला धर्म नसतो.
आपल्या देशात स्त्रियांच्या हाती शस्त्र द्या असे म्हणता येत नाही? कारण इथे त्याचा वापर त्यांच्या घरचे पुरुष मंडळी अधिक करतील. कारण सरपंच,नगराध्यक्ष किंवा महापौर म्हणून महिला स्थानापन्न झाल्या पण बहुतेक ठिकाणी कारभार चालविला तो त्याच्या घरातील पुरुषांनीच. मग ते नवरे असतील, वडील असतील किंवा बंधु. त्यामुळे उपाय अपाय व्हायची शक्यता अधिक.पण मुलींना सुरुवातीपासून शाळांमध्ये स्वसंरक्षण हा विषय अनिवार्य करायला हवा.कराटे प्रशिक्षण अनिवार्य व्हावे.तसेच लहान मुलांच्या शाळेत शक्यतो जिथे त्याच्या पालन पोषणाचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे,तिथे फक्त स्त्रियांचीच नेमणूक व्हावी. त्या खऱ्या अर्थाने सबला होत नाहीत तोपर्यंत हे सर्व सुरू ठेवावे.
समारोप:-
इतर प्रदेशाबद्दल मी काही बोलणार
नाही,पण महाराष्ट्र जिथे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होऊन गेला,ज्यांनी कल्याणच्या
सुभेदाराच्या सुनेस सन्मानपूर्वक परत पोहोचविण्याची आज्ञा आपल्या सैन्यास दिली होती.असे
छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले,त्या महाराष्ट्रात देखिल स्त्रियांवर अत्याचार व्हावेत
हे लांछनास्पद आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्त्री अत्याचार
मुक्त राज्य कसे करता येईल असा केवळ विचार नव्हे प्रण करायला हवा.तरच त्यांना स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेता येईल.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर
लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे
Horrible
ReplyDelete