Blog No. 2024/ 079.
Date: 23rd, April 2024.
मित्रांनो,
कुणालाही मधुमेह झाल्याचे निदान झाले की,ज्याला इंग्लिश मधे “ले मॅन”
म्हणतात तो देखिल पहिला अनाहूत सल्ला काय देत असेल? तर तो म्हणजे भात खाणं बंद कर.
खरं आहे हे की भात न खाण्याने मधुमेह नियंत्रित ठेवता येतो.पण म्हणून तुम्ही ठरवलं,की आता मी महिनाभर भात खाणार नाही तर काय होईल. या प्रश्नाचे उत्तर आपण
आजच्या ब्लॉगमध्ये शोधणार आहोत.
सविस्तर
महिनाभर भात न खाल्ल्यास काय होईल ?
भात खाणे पूर्णपणे सोडून दिल्याने,आरोग्यावर
विविध प्रकारे परिणाम होऊ शकतो.तांदूळ, विशेषत: आशियातील
अनेकांसाठी मुख्य अन्न आणि दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग बनला आहे. इतकं की
प्रत्येक जेवणात किमान एकदा भात खाल्याशिवाय बरेच लोक राहू शकत नाहीत.पण भातावर
आपले अवलंबित्व, आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असतं असं नाही.भात अत्यावश्यक
कर्बोदके पुरवत असतो, पण त्याच वेळा त्यात स्टार्चचे प्रमाण जास्त असते आणि काही पोषक तत्वांचा अभाव असतो.अशा
प्रकारे,परिष्कृत पांढऱ्या तांदळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची
पातळी वाढू शकते आणि वजन देखिल वाढू शकते.
मग जेवणातून भात पूर्णपणे वगळला पाहिजे
का? तसेच सुरुवातीला महिनाभर भात न खाल्ल्यास शरीरावर त्याचा काय परिणाम होईल? हे बघू या.जर एक महिन्यासाठी भात खाणे सोडून दिले,तर शरीरात कॅलरीचे कमी
झाल्यामुळे,वजन कमी होऊ शकते.तांदळातील उच्च-कार्बोहायड्रेटच्या अभावी रक्तातील
साखरेची पातळी स्थिर होऊ शकते.तसेच
एका महिन्यासाठी तांदूळ पूर्णपणे सोडून दिल्यास काही प्रमाणात वजन कमी होऊ शकते.परंतु
जर तांदूळ खाण्याऐवजी,आहारात दुसरे तृणधान्य खाणे सुरू केले नाही,तसेच कॅलरीज आणि
एकूण कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मर्यादित ठेवले,तरच रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ
शकते.
जर भात खाणे एक महिन्यांसाठी सोडून दिले
तर,रक्तातील साखरेची पातळी "केवळ त्या महिन्यासाठी" कमी होईल.जर भात
खाण्यास पुनः सुरुवात केली तर, ग्लुकोजच्या पातळीत पुन्हा चढ-उतार होऊ लागतील. यासाठी
भात किती आणि केव्हा खावा,हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.एक लहान वाटी भात योग्य
पद्धतीने खाल्ल्याने शरीराला कोणताही त्रास होत नाही.
तांदूळ पूर्णपणे सोडून दिल्यास
रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.हे खरे असले तरी भात न खाल्याने शरीरातील फायबरचे
प्रमाण कमी झाल्यामुळे,पचनक्रियेवरही परिणाम होऊ शकतो.कारण तांदूळ
कार्बोहायड्रेट्स,
ब जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा स्रोत आहे. त्यामुळे त्याच्या
पौष्टिकतेचा विचार केला पाहिजे.
तज्ञ आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाकण्याची शिफारस
करतात का?
नाही. त्यापेक्षा भात कसा खायचा हे समजून घेणे आवश्यक आहे.असे
ते म्हणतात.
भात खाताना लक्षात ठेवण्याच्या काही टिप्स.
भात खाण्यावर नियंत्रण:-
भात मर्यादित प्रमाणात खायला हवा आणि एका वेळी एक तृणधान्य खाण्याचे लक्षात ठेवा.
भातासोबत फायबर मिसळा: भातासोबत
भाज्या, बिया आणि फायबरयुक्त भाज्या घालून, कार्बोहायड्रेट्सचे एकूण
प्रमाण नियंत्रित केले, म्हणजे जेवणानंतरचे ग्लुकोज Blood Sugar नियंत्रित करता येते.कारण
फायबर पचण्यास अधिक वेळ लागतो, परिणामी तृप्ति लाभते. भूक कमी करून आणि शरीरात
ग्लुकोज हळूहळू सोडले जाऊन वजन कमी करण्यास चालना मिळू शकते.
भातासोबत सोबत प्रथिने मिसळा:
प्रथिने विशिष्ट तृणधान्यांसह एकत्रित केल्यावर,उच्च जैविक मूल्याच्या
प्रथिनांमध्ये बदलतात आणि शरीरात चांगले शोषले जातात. सोबतच, प्रथिने देखील तृप्ति देतात आणि रक्तातील ग्लुकोज मंद गतीने सोडून पचण्यास
अधिक वेळ घेतात.
जेवणात काय काय खायचे याचा क्रम ठरवा: नेहमी आपल्या जेवणाची सुरुवात एक कप सॅलड (फायबर) ने करा, त्यानंतर प्रथिने आणि कर्बोदकयुक्त आहाराचे सेवन करा.
समारोप:
पोषण तज्ञ
मंडळी काहीही सल्ला देत असतांना,शेवटी एक वाक्य जोडतात की,शेवटी काय खायचं आणि कशाचा
त्याग करायचा या बाबत तुमच्या फॅमिली डॉक्टरचा किंवा ज्या डॉक्टरकडे तुम्ही नेहमी जात
असता,त्यांचा सल्ला घ्या.कारण तुमच्या शरीरास काय आवश्यक आहे,हे ते अधिक चांगल्या प्रकारे
सांगू शकतात. मी माझ्या एक दाक्षिणात्य मित्रास विचारलं की, तुमचं मुख्य अन्न तर भात
आहे,तुमच्याकडे मधुमेहाचे प्रमाण अधिक असते कां त्यावर तो उत्तरला,नाही आम्ही भातावरचे
स्टार्च काढून भात खातो.असेलही कदाचित.पण जे कराल ते डॉक्टरचा सल्ला घेऊन करा.भात जेवणातून
काढून टाकल्यास काही विपरीत परिणाम न होता जर शुगर लेवल कमी झालं तर फारच छान.
तुम्हाला आजचा
ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
Nice information. Good thing is I never eat rice except during dental work. My weight shoot up dramatically and it's not willing to come down
ReplyDeleteछान माहितीपूर्ण पोस्ट
ReplyDelete