Blog No. 2023/102
Date: 28th, April 2023.
मित्रांनो,
काही
दिवसांपूर्वी म्हणजेच 10 एप्रिल,2023 ला गानसरस्वती किशोरी अमोणकर यांची जयंती होती.
त्यांनी गायलेल्या एका सुंदर भजनाचा मी त्यात उल्लेख केला होता.संत सोयराबाई म्हणजे
संत चोखोबांची पत्नी. “अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग.” किती सुंदर अर्थ आहे
या भजनाचा. आज आपण पहाणार आहोत या निरतिशय सुंदर भजनाचा अर्थ. मी याला निरूपण म्हणणार
नाही.तेवढा माझा अभ्यास नाही.
अवघा रंग एक झाला
तर संत
सोयराबाई आपल्या अभंगात म्हणतात.
अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥
येथे संत सोयराबाई म्हणतात की मी तुझे दर्शन घेतले आणि मी तुझ्या रंगात म्हणजेच तुझ्यात इतकी रंगून गेले की मी एक साधी स्त्री आणि तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस याचे मला भान उरले नाही.माझा रंगच काय माझे सर्वस्व तुझ्यात हरवून गेले आहे.
मी तूंपण गेले वायां ।पाहतां पंढरीचा राया ॥२॥
हे पंढरीच्या राया तुला पहाताच माझे मी पण गळून पडले आहे .तू माझ्याहून कुणी वेगळा आहेस ही भावना देखिल नष्ट झाली.हे सर्व तुझ्या दर्शनाचे महात्म्य आहे की माझ्यातला अहंभाव नाहीसा झाला.माझ्यातले मी पण लयाला गेले.मी आणि तू कुणी वेगळे नाही,परमेश्वरा या अद्वैताचे भान मला झाले आहे.
नाही भेदाचें तें काम ।पळोनि गेले क्रोध काम ॥३॥
जर हे परमेश्वरा मी, मी तू हा भेद विसरून गेले आणि अद्वैताचे भान मला झाले आहे. तर तिथे भेदाभेद कुठून असणार. तो भेदाभेद नष्ट झाला आणि क्रोध म्हणजे राग आणि काम म्हणजे वासना, हव्यास, लोभ हे सारे केव्हाच दूर निघून गेलेत.
देही असोनि विदेही ।सदा समाधिस्त पाही ॥४॥
हे परमेश्वरा मला अद्वैताचे भान झाल्यामुळे माझ्या देहात तू असूनही मी तुझे निर्गुण रूप अनुभवते आहे.माझे सगुण रूप तुझ्यात सामावले आहे.तू चरचरात सामावला आहेस.तू सगुणांत आहेस पण हे परमेश्वरा मी तुला समाद्धीस्त अवस्थेत अनुभवत आहे.
पाहते पाहणें गेले दूरी ।म्हणे चोखियाची महारी ॥५॥
हे परमेश्वरा तुला भेटण्याची आणि तुला पाहण्याची आस उरात होती. आता ही चोखीया ची महारी म्हणजे पत्नी,सोयराबाई म्हणते आहे की एकदा तुझे रूप पाहिल्यानंतर काही दुसरे किंवा अन्य काही पहायची इच्छा राहिली नाही.
समारोप
संत सोयराबाई यांची अवीट भक्ति होती. प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाले आणि त्या स्वतःला विसरून गेल्या. त्यांचे स्वत्व गळून पडले, काम, क्रोध पळून गेले, त्यांना अद्वैताचा साक्षात्कार झाला.एवढे की बस आता तुझे रूप पाहिले,आता ह्या जगी काही पहाण्याची आसक्ती उरली नाही असे त्यांना वाटू लागले.थोडक्यात काय तर खरा भक्त काय असतो आणि त्याचे ईश्वराशी तादात्म पावणे काय असते.हे संत सोयराबाईंनी या अभंगातून दाखवून दिले आहे.त्या स्वतःचे नांव देखिल अभंगात न गुंफता म्हणे चोखीया ची महारी म्हणत असतं. खरोखर कुठलेही शिक्षण नसतांना एवढे प्रगल्भता हे परमेशाचेच देणे होय.
प्रसाद नातु,पुणे
सुंदर
ReplyDeleteVery Good
ReplyDeleteखूप छान. अवघा रंग एक झाला की, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया अशी स्थिती होते.
ReplyDeleteअनंत मिसे
👍👍
ReplyDelete