Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

उदंड झाली स्मारके

Blog No. 2023/19 

Dated 22nd, January 2024.  

 


मित्रांनो, 

            भारत हा पुतळ्यांचा आणि स्मारकांचा देश आहे, असे वर्णन जरी कुणी केले तरी ते वावगे ठरू नये, इतके भारतात पुतळे आणि स्मारकं आहेत. तुम्ही जर दिल्लीला गेलात तर दोन तीन दिवस,तुम्हाला नुसती स्मारकं बघायला लागतील.इथे महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू,लाल बहादूर शास्त्री,ग्यानी झेलसिंग, शंकर दयाळ शर्मा, इंदिरा गांधी, राजीव गांधी,अटल बिहारी वाजपेयी, के.आर.नारायणन, चंद्रशेखर,चौधरी चरण सिंग,जगजीवनराम, आय.के.गुजराल यांची स्मारकं आहेत.ही सारी स्मारकं भूतपूर्व राष्ट्रपती,भूतपूर्व पंतप्रधान,भूतपूर्व उप-पंतप्रधान यांची आहेत.तरी यांत डॉ.राजेंद्रप्रसाद,डॉ.राधाकृष्णन,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,स्व. मोरारजी देसाई,स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.पी.व्ही.नरसिंहराव,चौधरी देवीलाल ह्यांचा समावेश नाही,हे महत्वाचे आहे.

स्मारकं उभारण्याचे कारण आणि उद्दिष्टे

            ही स्मारकं उभारण्याचे कारण आणि उद्दिष्टे काय आहेत.हे आपण समजावून घेतले पाहिजे.माझ्या माहिती प्रमाणे ह्या सगळ्या महान व्यक्तींचे विचार,लोकांपर्यंत पोहोचावेत एवढेच नव्हे तर ,त्यांच्या पासून पिढ्यानपिढ्यानी प्रेरणा घ्यावी किंवा ह्या स्मारकांना भेट देऊन प्रेरणा मिळावी.हा ह्या मागचा उद्देश असावा.पण प्रत्यक्षात असे होतांना दिसत नाही.प्रत्यक्षात ह्या स्मारकांना लोक भेट तर देतात,पण तो साइट सीइंगचा एक भाग असतो.मग प्रेरणा ती काय मिळणार.जिथे इतर काही पाहण्यासारखे नाही,फक्त महान व्यक्तींचे स्मारक आहे,अशा ठिकाणी किती लोक फक्त ह्या स्मारकांना भेट द्यायला जातात,हा संशोधनाचा विषय आहे.

            हा सर्व विषय आज ब्लॉग मधे लिहायचे कारण म्हणजे आमच्या “पुस्तकप्रेमी” समूहावर प्रसिद्ध लेखक रवींद्र पिंगे ह्यांच्या “दुसरी पौर्णिमा” ह्या पुस्तकाचा परिचय करून देण्यात आला.त्यांनी “सेवाग्राम गांधी आश्रमातील  सायंकाळ” या लेखात असे म्हटले आहे की,आज तुम्हाला ही भूमी ओस पडलेली दिसते.हा त्यांचा अनुभव बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे.आज तर गांधीजींचे अनुयायी देखिल तिथे राहिलेले नाहीत.मला आठवते आहे स्व. इंदिरा गांधी होत्या तेव्हा त्या नागपूरला आल्या की त्यांचा सेवाग्रामला भेट देण्याचा कार्यक्रम ठरलेला असे.पवनारच्या विनोबा आश्रमाची आता हीच स्थिति आहे.हे आश्रमास भेट दिल्यावर लक्षात आले.   

त्यांचे विचार कुणी सांगेल कां?

आज ह्या साऱ्या थोर नेत्यांच्या विचारांविषयी बोलतांना दिलेली भाषणे सामान्यपणे अशी असतात. “अमुक अमुक नेत्यांचे विचार हे देशाला पुढे नेण्यास मार्गदर्शक आहेत.” “अमुक अमुक नेत्यांचे विचार हेच देशात शांतता प्रस्थापित करण्यास मार्गदर्शक ठरू शकतात.” “देशाची सर्वांगीण प्रगती व्हायला हवी असेल तर अमुक अमुक नेत्यांचे विचार अंगीकारायला हवेत.” “अमुक अमुक नेत्यांचे विचार हे देशाला तंत्रज्ञानात पुढे नेऊ शकतात.” वगैरे वगैरे. पण हे कुणीच त्यांनी नांव घेतलेल्या विचाराबद्दल काहीच बोलतांना दिसत नाही.ह्यात दोन गोष्टी असू शकतात. एक तर त्या थोर नेत्याचे विचार ह्या भाषणे देणाऱ्यांना माहित नसावेत किंवा त्या नेत्यांचे विचार सांगितले,तर आपले स्वतःचे वर्तन तसे नसल्याने,आपली पोल खोल होऊ शकते,म्हणून सांगत नसावेत असे वाटून जाते.जसे पूर्वी लोकमान्य टिळक ह्यांच्या वर शाळेत भाषण करायला सांगितले,की मुले फक्त त्यांच्या मी शेंगा खाल्या नाहीत,मी टरफले उचलणार नाही ही,एकच गोष्ट सांगत जणू त्यांच्या चरित्रात दुसरे काहीच नव्हते की काय.     

           

ह्यावर उपाय काय?

खरं तर हे सारे बघितल्यावर मन विषण्ण होतं.भौतिक विकास हाच देशाचा सर्वांगीण विकास नसून त्या सोबत देशातील नागरिकांचे विचार देखिल प्रगल्भ व्हायला हवेत. विचारांचा विकास व्हायला हवा असेल तर ह्या साऱ्या नेत्यांचे विचार हे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन पुढे आणावयास हवेत.ह्यासाठी देशातील थोर व्यक्ती,त्यांची चरित्रे आणि त्यांचे विचार ह्याचा अभ्यास नागरिक शास्त्र ह्या विषयाचा एक वेगळा भाग करून पाठयक्रमात त्याचा समावेश व्हायला हवा असे मला वाटते. अन्यथा असेच म्हणावे लागेल “उदंड झालीत स्मारके पण विचारांचा दुष्काळ.”      


प्रसाद नातु, पुणे. 

Comments

Post a Comment