ब्लॉग नं. 2024/293.
दिनांक:4 डिसेंबर,2024.
मित्रांनो,
महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा गोंधळ 10 दिवस होऊन गेले तरी संपला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री इतरांची काळजी करण्याऐवजी स्वतःची काळजी घेण्यात मश्गुल आहेत. 2022 ला पाच वर्षे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पार्टीच्या आदेशानुसार दुय्यम पद स्वीकारलं. आणि केवळ अडीच वर्षे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या एकनाथ शिंदे यांना आता उपमुख्यमंत्री होणे अपमानास्पद वाटतंय.गंमत आहे ना. तिकडे विरोधी पक्ष जो पराभव झाला आहे,त्यातून अजून बाहेर पडायला तयार नाही.स्वीकारायला तयार नाही की आपला पराभव झाला आहे. ते EVM मध्येच अडकला आहे. या विषयावर आहे आजचा ब्लॉग.
सविस्तर:
2022 ला ध्यानीमनी नसतांना, आताचे काळजीवाहू मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.ते पूर्वीच्या शिवसेनेत असते. तर त्याना हे पद कधी मिळाले असते कां? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला हवा. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस ज्यांनी 5 वर्षे मुख्यमंत्री पद भूषविले ते शिंदेच्या सरकारमध्ये. जे शिंदे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते,त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री भूषवायला तयार झाले.मग आता भारतीय जनता पक्षाच्या 132 जागा निवडून आल्यावर मुख्यमंत्री त्याच पक्षाचा असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार हे माहीत असतांना अजून देखिल अडून बसले आहेत.पदाची लालसा नाही आणि कॉमन मॅन आहे असे म्हणत म्हणत ते मुख्यमंत्री पदाची लालसा बाळगून बसलेच कसे? हा प्रश्न शाळेत जाणाऱ्या मुलाला देखिल कळू शकेल.एवढे प्रचंड बहुमत मिळवूनही जर सरकार स्थापन करायला वेळ लागतं असेल तर ही कुठल्या प्रकारची लोकशाही आहे.
तिकडे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष EVM यंत्रात गडबड म्हणून ओरडत आहे.कॉंग्रेसने कित्येक दिवसांत आत्मपरीक्षण केलेले नाही.स्वतःचा पक्ष जिंकला तर तो त्यांच्या कर्तृत्वावर आणि हरला तर EVM मुळे. स्वतःचे कुठे चुकले हे पहाण्याऐवजी EVM खराब म्हटलं की आपल्या दोषांवर पांघरूण घातले जाते. त्यामुळे एका वेळेस संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या कॉंग्रेसवर ही वेळ आली आहे. बरं EVM मुळे सत्ता आली म्हटलं तर भारतीय जनता पक्षाने EVM कडून स्वतःच्याच पक्षाला 145 वर जागा कां निवडून आणल्या नाहीत? मविआकडे महायुतीवर,बऱ्याच वेळा वैयक्तिक टीका करण्याशिवाय काही केले नाही. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा काही रोड मॅप नव्हता. लाडकी बहीण योजनेवर टीका करून एक प्रकारे विरोधी पक्षांनी महायुतीचा प्रचार केला.
संवैविधानिक पद्धतीने निवडणूका पार पडून सत्तेत आलेल्या पक्षाला धांदलीने विजय मिळविला असे म्हणणे हे लोकमताचा अनादर आहे.मतपत्रिकेच्या आधारावर निवडणूक घेणे म्हणजे, बूथ capturing वगैरे निवडणूक जिंकण्याची साधने आता वापरता येत नसल्याने EVM हटाव आणि मतपत्रिका लाव हा नारा देऊन, काही तरी करून, देशात गोंधळ निर्माण करायचा, एवढेच काम आता विरोधी पक्षाकडे उरले आहे.लोकसभेत विरोधी पक्षाचे 200 च्यावर सदस्य निवडून गेले तेव्हा EVM चांगले होते कां? हा प्रश्न विरोधी पक्षाने विचारून पहावा.
महाराष्ट्रात यापूर्वी न झालेली स्थिती पाहायला मिळते आहे,ती ही एवढे प्रचंड बहुमत आल्यावर देखिल. जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीची अशी अवस्था आहे. आचारसंहितेमुळे कामाचे दिवस वाया जातात,म्हणून देशात “एक देश एक निवडणूक” चा प्रसार करणारे आपले पंतप्रधान देखिल यात काही हस्तक्षेप करत नाही,याचं आश्चर्य वाटतंय. भारतीय जनता पक्षाला देखिल गट नेता निवडीसाठी एवढा वेळ लागतो,याचं आश्चर्य वाटतं. त्यांना त्यांचा नेता निवडीसाठी कुणाची वाट पहायची गरज कां वाटावी. कारण हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे.गृहखाते मागच्या वेळेस उपमुख्यमंत्र्यांकडे होते म्हणून ते उपमुख्यमंत्र्याकडेच असावे असा परिपाठ नाही. 2022 ला देखिल भारतीय जनता पक्षाला 105 जागा होत्याच,त्यामुळे त्यांनी ते स्वतःकडे ठेवले होते,तर त्यात नवल ते काय?
समारोप:
जनतेचा कमावलेला विश्वास गमवायचा नसल्यास महाराष्ट्रात लवकरात लवकर स्थापन होणे गरजेचे आहे. तसेच निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांना EVM बद्दलच्या तक्रारींवर चर्चा करण्यासाठी बोलविले होते. त्यात काय झाले ते कळेलच. EVM ला इंटरनेट जोडले जाऊ शकत नाही, कुठलाही मोबाइल, डेटा किंवा वायफाय सुरू नसला की तो जसा hack करता येत नाही,तसेच EVM च आहे,असे आजपर्यंत खूप वेळा समजाविण्यात आले आहे. तरी देखिल ओरड सुरू आहे,कारण पराभव स्वीकारण्याची भीती हे कारण आहे, त्या ऐवजी विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले तर त्याचा फायदा त्यांनाच होईल.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु,
after all this is bloody politics. They never care about common man forget the nation
ReplyDelete