Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

प्रदूषणमुक्त फटाके- एक वास्तव?

 Blog No.2023/288

Date: -16th, November 2023.

 

मित्रांनो,

            मी माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये शिवकाशीतील फटाका उद्योगाचा ओझरता उल्लेख केला होता. शिवकाशीतील फटाका उद्योगाला देशातील वाढत्या प्रदूषणाचा फटका बसला आहे. फटाक्यात वापरले जाणारे बेरियम हे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत असल्याने,सूप्रीम कोर्टाने बेरियमयुक्त फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी घातल्याने हा उद्योग संकटात आला आहे. आज आपण बघूया की या उद्योगाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली. 

प्रास्ताविक

            शिवकाशीतील फटाका उद्योग कसा अस्तित्वात आला हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल.साधारणतः एकोणिसाव्या शतकातील दुसऱ्या दशकातील गोष्ट आहे.तेव्हाच्या मद्रास राज्यातील दोन तरुण चुलत भाऊ शनमुगा आणि अय्या नाडर यांनी सुरुवातीला काड्याची पेटी म्हणजे माचिसच्या फॅक्टरीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.त्या नोकरीतून त्यांना जे काही शिकायला मिळाले,त्यातून त्यांच्या लक्षात आले की आपण जे काही शिकलो आहे, त्या शिक्षणाचा उपयोग आपण एखादा कुटीर उद्योग सुरू करण्यासाठी केला तर गावातच आपल्याला स्वतःचा रोजगार मिळेल आणि इतरांना देखिल रोजगार पुरविता येईल.त्यांचा माचिस बनविण्याचा उद्योग आणि फटाक्याचा उद्योग यांचा जवळचा संबंध असल्याने त्यांनी फटका उद्योग सुरू केला.अशा रितीने शिवकाशीतील फटाक्याच्या उद्योगाचा श्रीगणेशा झाला. 

आजचे या उद्योगाचे स्वरूप

            आज शिवकाशी हे गांव फटाका उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र बनले असून, भारतातील फटाक्यांच्या एकूण उत्पादनाच्या 90% उत्पादन हे भारतातील या गावात होते. साडे सात ते आठ लाख लोकांचे हे रोजगाराचे साधन झाले असून, या उद्योगाची किंमत ही 6000 कोटी रुपे इतकी आहे असे समजते.पण सध्या या उद्योगावर संकट पसरले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे हवेचे प्रदूषण.खरं पाहिलं तर प्रदूषणाच्या कित्येक कारणांपैकी हे एक कारण आहे.पण काही विपरित झाले की त्याचा फटका सामान्य लोकांच्या उद्योगाला आधी बसतो, तसे काहीसे झाले आहे,असे मला वाटते.

            याची सुरुवात झाली 2018 मध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने, ज्या फटाक्यामध्ये बेरियम सॉल्टचा वापर केला जातो की ज्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक आहे,अशा फटक्याच्या निर्मितीवर बंदी घातली.बेरीयममुळे फटाके अधिक चमकतात आणि त्यामुळे ते ज्वलनशील देखिल बनतात.तसेच ते फटाके टिकाऊ देखिल होतात.पारंपरिक फटक्याच्या उत्पादनावर आलेल्या बंदीमुळे फटाका उत्पादक संभ्रमित झाले.मानकांची पूर्तता करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे उत्पादनाला फटका बसला. ते फक्त 60% उत्पादन करू शकले.जर कोणतेही निर्बंध नसते तर या व्यवसायाने यावर्षी 10,000 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असता.

पर्यावरणपूरक फटाके विकसित करण्याची जबाबदारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडे (CSIR) सोपवण्यात आली आहे. पर्यावरणपूरक फटाके हवेतील लहान सूक्ष्म कण आणि हानिकारक वायूंचे उत्सर्जन 40% पर्यंत कमी करू शकतात. त्यांच्या आवाजाची पातळीही कमी होऊ शकते.पण दुर्दैवाने, हे प्रयत्न संशोधनाच्या पुढे गेले नाहीत.या संशोधनातील माहिती फटाके उत्पादकांना देण्यात आली.परंतु त्यांना पूर्णपणे बेरीयमयुक्त फटाके निर्मितीतून प्रदूषणमुक्त फटाके निर्मितीसाठी आर्थिक पाठबळ मिळाले नाही.कारण या ट्रांजिशनसाठी त्यांना दुप्पट खर्च लागेल हे अपेक्षित होते. कमी प्रदूषक रसायन वापरले तर सामग्रीची किंमत दुप्पट होईल.तसेच हे केमिकल सुकायला जास्त वेळ लागत असल्याने,उत्पादनसाठी वेळही लागेल.कोविड 19 मुळे फटाका उद्योगाला फटका बसला होता.त्यामुळे फटाक्यांची विक्री देखिल कमी झाली. कोविड 19 पश्चात हरियाणा, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांनी फटाक्यांवर निर्बंध घातला.दिल्लीत तर ग्रीन फटाक्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. 

सारांश

शिवकाशीतील बहुतेक युनिट्स आता त्यांच्या क्षमतेच्या फक्त 60-70% क्षमतेने कार्य रत आहेत. धूळ प्रदूषण कमीत कमी 30% कमी करण्यासाठी ते फटाक्यांचे CSIR मान्यताप्राप्त ऍडिटीव्हचा वापर करुन उत्पादन करत आहेत.यामुळे उत्पादन देखील कमी होऊ शकते.पण शिवकाशीमधील उत्पादक आता निर्यातीकडे लक्ष पुरवून जागतिक बाजारपेठेत शिरकाव करण्याची इच्छा बाळगून आहेत.ही एक चांगली गोष्ट आहे. पर्यावरणपूरक फटाक्यांच्या निर्मिती सोबत जर निर्यात करुन परकीय चलन देशाला मिळाले,तर यासारखी चांगली गोष्ट दुसरी नाही. आजच्या ब्लॉगबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेन्ट बॉक्समध्ये जरूर लिहा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.                            

Comments

Post a Comment