Blog No.2023/222
Date:- 24th, August 2023.
मित्रांनो,
काल मी चांद्रयान-3
वर ब्लॉग लिहिला होता आणि 6.15 च्या सुमारास चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्रावर
लॅंडींग केले.भारतीयांसाठी कालचा दिवस खूप मोठा दिवस होता.कारण 2019 ला आपण चंद्रावर
पोहोचू शकलो नव्हतो.त्यावेळेस भरपूर टीका सरकारवर होत होती.पण कालचे श्रेय मात्र सरकारचं
नव्हतं.असो.यालाच राजकारण म्हणतात.मी माझ्यावतीने त्या सगळ्या शास्त्रज्ञांचे,माझ्या
ब्लॉगच्या समस्त वाचकांचे आणि या देशातील जनतेचे अभिनंदन करतो.
पावसाळा सुरू आहे.जरी मध्यंतरी त्याने दडी मारली असली,तरी तो
पुन्हा येईलच कारण त्याची कुणाशीही युती नाही आणि पावसाळ्यात खाल्ला जाणारा आवडीचा
पदार्थ म्हणजे “कांदा भजी” आणि त्यातही खेकडा भजी.सिंहगडावर पहिल्यांदा काही वर्षापूर्वी
मी आस्वाद घेतला होता. जेव्हा मी पुणेवासी नव्हतो.त्यानंतर कोल्हापूरकडून पुण्याला
येतांना खंबाटकी बोगद्याच्या अलीकडे काही अंतरावर “आराम हॉटेल”ला खूप स्वादिष्ट “खेकडा
भजी” खायला मिळाली. एव्हाना तुम्हाला लक्षात आलं असेल की मी आज आहार विचार मध्ये कांदा
या भाजीवर सविस्तर लिहिणार आहे.
कांदा मूळचा कुठला?
कांदा मूळचा इराणमधला. सुमारे 3000 हून जास्त वर्षापूर्वी कांदा तिथे वापरला जायचा
असं समजतं. भारतात देखिल गरुड पुराणात कांद्याचा उल्लेख आहे. आज मात्र जगभरात सर्वत्र
पिकविला जातो आणि चीन,स्पेन आदि देशात तर कांद्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही असं
म्हणतात. अर्थात ते भारताला देखिल मोठ्या प्रमाणात लागू पडतं.
कांदा हा बरेच दिवस टिकतो आणि तो वाळवल्यास अधिक टिकतो.आपल्याकडील
नासिक जिल्ह्यातील दोन तालुके निफाड आणि लासलगांव, कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.महाराष्ट्रातील एकूण
कांदा उत्पादनाच्या 65% उत्पादन या दोन तालुक्यात घेतले जाते. देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या
40% उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते.म्हणजेच देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या 26%
एवढे उत्पादन हे निफाड आणि लासलगाव मध्ये घेतले जाते.
कांद्यात जीवनसत्वे, खनिजांचे प्रमाण
100 ग्राम कांद्यात जवळपास 11 मिलिग्राम एवढे विटामीन सी असते. कॅल्शियम 47 मिलिग्राम
असते आणि फास्फरस 40 मिलिग्राम असते.
कांद्याचा औषधी उपयोग
1. दातांच्या तक्रारीवर प्रभावी:- कांदा रोज कच्चा खावा.खातांना थोडा वेळ तोंडात ठेवल्यास दातांच्या तक्रारी उद्भवत
नाहीत,असे संशोधनात आढळून आले.
2.
हृदयरोगापासून दूर ठेवतो:- त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. राधाकृष्णन आणि डॉ. के. माधवन यांनी
केलेल्या संशोधनानुसार हृदयरोग आणि रक्तदाब यापासून सुटका हवी असल्यास रोज 100 ग्राम
कांदा खायला हवा. कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल संतुलित रहाते आणि रक्तात गुठल्या होतं
नाहीत असे निष्पन्न त्याच्या संशोधनात आढळून आले आहे.
3.
त्वचारोग:- विविध त्वचा रोगांत कांदा हा परिणामकारक सिद्ध झाला
आहे. जसे जखमा, खरचटणे किंवा अंगाची आग आग होणे इत्यादि.
4.
किडनीसंबंधीच्या तक्रारी:- किडनीसंबंधीच्या तक्रारी असल्यास
त्या देखिल कांद्याचे सेवन केल्याने दूर होऊ शकतात असे दिसून आले आहे.
5.
याशिवाय श्वसनाच्या तक्रारी,कानाच्या तक्रारी, सर्दी,खोकला
आणि फ्लू अशा रोगांवर सुद्धा कांदा गुणकारी असल्याचे सांगितले जाते.
सारांश
कांद्याचे औषधी गुणधर्म किंवा उपयोग याविषयी अॅलोपॅथीचे
डॉक्टर सहमत असतील असे नाही. त्यामुळे कांद्याचे जे उपयोग हे तुमची नेहमीची औषधे तुम्ही
घेत आहात,त्यासोबत करून बघावेत.कारण हे उपयोग केल्याने झाला तर फायदा होईल,नुकसान होणार
नाही.बाकी कांदा भजी, कांद्याच्या पातीचा झुणका,कांदा बटाटा रस्सा भाजी,कांद्याची दहयातली
कोशिंबीर,कांदेभात,कांद्याची थालीपीठ, कांदा परतून चिवड्यात टाकल्यास चिवड्याला एक
वेगळीच चव येते, या गोष्टींचा आनंद घेण्यास काही हरकत नाही. अगदी मधुमेही देखिल माफक
प्रमाणात या सर्व पदार्थांचा आनंद लुटू शकतात.
आजचा हा
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स
मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये
तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु,पुणे
Mast blog
ReplyDeleteछान माहिती🙏💐
ReplyDelete