Blog No.2023/196
Date:- 28th,July, 2023.
मित्रांनो,
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा एक सर्वांगसुंदर
चित्रपट “अभिमान.”
आज हा चित्रपट रिलीज होऊन 50 वर्षे झाली. 27 जुलै,1973 या तारखेला हा चित्रपट रिलीज
झाला.त्याला व्यावसायिक यश सर्वसाधारण मिळालं, जे अपेक्षित होतं.कारण गल्लाभरु क्राऊड
किंवा तेव्हाच्या थर्ड क्लास मध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नव्हताच. एक
साधी,सोपी,सरळ कहाणी होती. ना मारामारी, ना हिंसक दृश्ये, ना उत्तान नृत्ये हे काहीच
नव्हतं.माझ्या काही टॉप चित्रपटाच्या यादीतील वरच्या नंबरचा हा चित्रपट.त्यामुळे आजचा
ब्लॉग या चित्रपटाला समर्पित.
प्रास्ताविक
मी या चित्रपटास सर्वांगसुंदर चित्रपट यासाठी
म्हटलं की अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा
सुरेख अभिनय,त्यांना असरानी,बिंदु,डेव्हिड, दुर्गा
खोटे, ए के हंगल आणि ललिता
कुमारी यांनी दिलेली सुंदर साथ. हृषिकेश मुखर्जी यांची सुरेख कथा त्यातील राजेंद्रसिंह बेदी यांचे लाजवाब संवाद,हृषीकेश मुखर्जी यांचे अप्रतिम दिग्दर्शन,नेत्रदिपक छायाचित्रण जयवंत पाठारे यांच, मजरूह
सुलतानपुरी यांची सुरेल गाणी, सचिन देव बर्मन यांच
सुश्राव्य संगीत दिग्दर्शन आणि
ती तितक्याच प्रभावीपणे सादर केली ती गायकांची मांदियाळी अर्थात किशोर कुमार,
लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मनहर उधास,
सचिन देव बर्मन, अनुराधा पौडवाल.आता सांगा बरं
चित्रपट निर्मितीतील कुठलं अंग सुटलं. हा चित्रपट सितार वादक रविशंकर आणि
अन्नपूर्णा देवी यांच्यातील अडचणीत आलेल्या विवाहावर आधारित आहे असं म्हटल जातं.पण लेखक राजू भारतन
यांच्या मते,
हृषीदांनी सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार आणि त्यांची पहिली
पत्नी रुमा घोष यांच्या जीवनावर चित्रपटाची कथा लिहिली आहे. कुठतरी
या चिटपटास हिंदी भाषेतील संगीत नाटक चित्रपट आहे असं म्हटले असल्याचं वाचलं.चित्रपटाची कथा थोडक्यात पाहू.
चित्रपटाची कथा
सुबीर कुमार (अमिताभ बच्चन) हा एक
व्यावसायिक गायक आहे जो प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.उमा (जया भादुरी) ला
भेटेपर्यंत त्याला तिच्याशी लग्न
होईल याची कल्पना नसते. उमा गावात दुर्गा मौसी (दुर्गा खोटे) सोबत राहत असते. तिच्याशी लग्न करून सुबीर
कुमार तिला मुंबईला घेऊन येतो. तिची गायनाची कारकीर्द सुरू करण्यासाठी तो स्वतः प्रयत्न
करतो. दरम्यान सुबीर कुमारला मिळणारी प्रसिद्धी कमी होते आणि उमाला खूप प्रसिद्धी मिळू
लागते आणि तिच्या पतीपेक्षाही ती
अधिक प्रसिद्ध गायिका बनते. यामुळे सुबीर उमाचा तिरस्कार करू लागतो
आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो.पुढे भावनिक वळणात, उमा गर्भवती असते आणि नवीन जीवांच्या आगमनाची चाहूल त्यांना जवळ आणते कां? “तेरे मेरे मिलन की ये रैना” ह्या गाण्यामुळे शेवटी दोघांचे भावनिक पुनर्मिलन होते कां? हे खरोखर पहाण्यासारखे होते.
चित्रपटातील गाणी
1.
"अब तो है तुमसे हर खुशी अपनी" (लता मंगेशकर)
2.
"तेरी बिंदिया रे" लता मंगेशकर, मोहम्मद रफी
3.
"तेरे मेरे मिलन की ये रैना" किशोर कुमार, लता मंगेशकर
4.
"नदियाँ किनारा" लता मंगेशकर
5. लता मंगेशकर यांचे "पिया बिना पिया बिना"
6. किशोर कुमारचे "रे मित ना मिला रे मनका".
7.
"लुटे कोई मन का नगर" लता मंगेशकर, मनोहर उधास
नामांकन आणि पुरस्कार
1974 सचिन देव बर्मन फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीत संयोजक पुरस्कार जिंकला.
जया बच्चन यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा
पुरस्कार मिळाला.
असरानी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता.
सारांश
हा चित्रपट मी पहिल्यांदा पाह्यला तेव्हा मी केवळ नववीत होतो.अमिताभ सोबत त्यावेळेस
सचिन देव बर्मन यांची गाणी, त्यातील माझा फेवरीट गायक किशोर
कुमारची गाणी यासाठी चित्रपट पाहिला होता.त्यानंतर टीव्हीवर हा चित्रपट जेव्हा जेव्हा
दाखवला गेला.तेव्हा तेव्हा मी पाहिला.आज या ब्लॉगमधे कुठल्या गाण्याचा अंतर्भाव करावा
हे माझं निश्चित होत नव्हतं. मग “पिया बिना बसेरा” ही लता मंगेशकर
यांच गाणं आणि "मित ना मिला रे मनका " हे किशोर कुमार यांनी गायलेले
गाणं निवडलं ते ऐका.
प्रसाद नातु,पुणे
Top class picture wigh yop class songs. Apla blog pan top class
ReplyDelete