Blog No. 2023/62
Date: 12th, March 2023.
मित्रांनो.
वर्ष 2023 ला मी नियमितपणे ब्लॉग लिहावयांस सुरुवात केली,तेव्हा एक गोष्ट कटाक्षाने ठरविली होती की राजकारणावर लिहायचे नाही आणि राजकारण्यांवर लिहायचे नाही.पण आज एका राजकारणी नेत्याचा जन्मदिवस आहे, त्यांना केवळ राजकारणी म्हणून मला टाळता येणार नाही.महाराष्ट्राचे मुत्सद्दी राजकारणी, अर्थतज्ञ, सुसंस्कृत,साहित्यिक नेतृत्व म्हणजे भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण.
स्व.यशवंतराव चव्हाण यांचे बद्दल थोडेसे
स्व. यशवंतराव चव्हाण. यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे झाला.त्यांना एकूण तीन भावंडे होती. चव्हाण लहानपणीच पोरके झाले, कारण त्यांच्या वडिलांचे यशवंतराव लहान असतांनाच निधन झाले. त्यांच्या आईने त्यांना स्वावलंबन आणि देशभक्तीची शिकवण दिली.स्वतंत्रता चळवळीबद्दल त्यांच्या मनात लहानपणापासून आकर्षण होते. 1930 साली कराड येथे शाळेत असतांना असहकार चळवळीत सहभाग घेतल्याबद्दल त्यांना दंड झाला होता. 1932 साली साताऱ्यात भारताचा ध्वज फडकविल्याबद्दल त्यांना 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.
1934 ला टिळक हायस्कूल कराड येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर,त्यांनी कोल्हापूर येथील राजाराम कॉलेज येथून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. बी.ए. झाल्यावर त्यांनी तत्कालीन बॉम्बे यूनिवर्सिटी मधून एलएलबी पूर्ण केले. 1942 ला त्यांनी कराड येथे वकिलीस सुरुवात केली.त्यांचा विवाह फलटण येथे वेणूताई यांचेशी झाला. महाविद्यालयीन जीवनात ते जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संपर्कात आले. 1942 च्या चले जाव चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली.
राजकीय कारकीर्द
1946 साली मुंबई राज्याच्या विधानसभेचे सभासद झाले. त्या नंतर ते 1957 साली कराड येथून निवडून गेले होते.त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती, 1 मे 1960 ला ते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले तेव्हा पासून .त्यांच्या कार्यकाळातच कृषि जमीन धारणा कायदा पारित करण्यात आला. 1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केल्यानंतर,भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन ह्यांनी राजीनामा दिल्यावर,त्यांना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी, त्यांना संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविली.1966 ते 1970 ह्या काळात ते गृहमंत्री होते. 26 जून,1970 ला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपविली. 1974 ते 1977 ह्या काळात त्यांनी परराष्ट्रमंत्री पद देखिल भूषविले.त्या नंतर मात्र कॉंग्रेस मध्ये जेव्हा फुट पडली. तेव्हा त्यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांना पाठिंबा न देणे त्यांना महागात पडले.1979 ते 1980 या काळात ते भारताचे उप- पंतप्रधान देखिल होते. भारताचे गृहमंत्री,अर्थमंत्री,संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि उप- पंतप्रधान इतकी सारी वरिष्ठ पदे सांभाळणारे ते एकमेव महाराष्ट्रीयन.
साहित्यिक संपदा
मी आधीच लिहिल्याप्रमाणे स्व. यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक होते. त्यांनी खालील पुस्तके लिहिली.
1. आपले नवे मुंबई राज्य
2. ऋणानुबंध (ललित लेख)
3. कृष्णाकाठ हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
4. भूमिका
5. विदेश दर्शन
6. सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह)
7. युगांतर
8. तसेच त्यांचे भाषण संग्रह पुस्तिका देखिल आहेत.
स्व. यशवंतराव चव्हाण हे साहेब या नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या काळातील राजकारण हे द्वेष विरहित राजकारण होते. राजकारणात सुद्धा सुशिक्षित आणि महत्वाचे म्हणजे सुसंस्कृत नेते मंडळी होती.कुणावर वैयक्तिक टीका होत नसे. काही व्यक्ती शब्दांत सामावत नाहीत.साहेब त्यापैकीच एक पण ब्लॉग किती मोठा असावा हे देखिल बघावे लागणार,
मृत्यु:-
असे हे थोर मुत्सद्दी राजकारणी,अर्थतज्ञ, उदारमतवादी, साहित्यिक, कलोपासक असे स्व. यशवंतराव चव्हाण 25 नोव्हेंबर, 1984 ला आपल्याला सोडून गेले. नवी दिल्ली येथे त्यांचे हृदय विकाराचा झटका आल्याने निधन झाले. मृत्युसमयी ते 71 वर्षाचे होते.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना त्यांच्या 114 जयंती निमित्त माझा प्रणाम.असा राजकारणी होणे नाही हेच खरे.
प्रसाद नातु,पुणे.
छान लेख
ReplyDeleteसुंदर मोजके पण प्रभावी लेखन.
ReplyDeleteछान लेख..👍
ReplyDeleteChan lekh. Very true about politics
ReplyDeleteGood one
ReplyDeleteखूप छान लेख.
ReplyDelete