Blog No. 2023/43
Date: 20th, February 2023.
मित्रांनो,
महाराष्ट्राचे
दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची काल जयंती झाली.माझ्या मित्रांनी मला
विचारले देखिल, कि आम्हाला वाटले की आज तू महाराजांबद्दल ब्लॉग लिहिला असशील.माझ्या
मनांत होतं पण मी काल नाही लिहिला,कारण काल विविध माध्यमातून छत्रपती शिवाजी
महाराजांबद्दल तुम्ही खूप काही वाचले असेल.छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही,असा
अखिल महाराष्ट्रात तर कुणी नसेलच पण भारतातही नसेल.मागे मी राजस्थानला एलटीसीवर
गेलो होतो तेव्हा एका ब्लॉग मधे लिहिले होते,की उदयपूरमधे महाराणा प्रताप ह्यांचा त्यांच्या
चेतक घोड्यावरील पुतळा पहावयास मिळाला राजस्थानात सगळे राजे “महाराजा” हे बिरुद
मिरवितात.मग एकटे महाराणा प्रताप हे “महाराणा” कसे.असे मी आमचा ट्रीप मधील ड्रायवर
कमलेशला विचारले तेव्हा तो मला म्हणाला “सर अपने देशने
केवल दो ऐसे महारथी हो गए जो मुग़लोंके शरण मे नहीं गए.वो थे छत्रपती
शिवाजी महाराज और महाराणा प्रताप. बाकी सब जो शरण
गये वो सब महाराजा कहलाते है .” माझा उर अभिमानाने भरून आला.तो जेवढ्या अभिमानाने महाराणा प्रताप यांच्या बद्दल बोलत होता,तेवढाच
अभिमान त्याच्या बोलण्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दिसला.म्हणूनच म्हटलं की
त्यांची ओळख नाही असा भारतात देखिल कुणी नसेल.
छत्रपती शिवाजी महाराजांची महानता
मित्रांनो,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आज काल जो कुणी उठेल तो बडबड करतो.कुणी
म्हंटलं की छत्रपती शिवाजी महाराज आता जुने झाले.मित्रांनो दैवत जे असतं ना ते कधीच
जुनं होतं नाही.ते सदैव वंदनीयच असतं.तसेच
छत्रपती शिवाजी महाराज काय फक्त योद्धा होते की ते केवळ त्यांनी लढलेल्या लढायांमुळे
लक्षात राहतील.उलट ते ज्यांचाशी लढले त्यामुळे कदाचित ते लोक आज आपल्याला माहिती
आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते.कल्याणकारी राज्य ही संकल्पना
कदाचित त्यांच्यापासूनच आपण घेतली असावी.वयाच्या तारुण्यात ज्यांनी स्वराज्य
स्थापन करण्याची शपथ घेतली आणि शेवटी स्वराज्याची स्थापना केली आणि ते छत्रपती
झाले.ह्यातच त्यांचे मोठेपण सामावलेले आहे.अन्याय,जुलूम,अत्याचार या विरुद्ध निर्णय
घेतांना ते अतिशय कडक प्रशासक होते.ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसतं.हे मी वेगळे
सांगायची गरज नाही. शिवचरित्राबद्दल मी ह्या ब्लॉग मधे काहीच लिहीत नाही.कारण ते
सर्वांना माहित आहे.त्यांच्याबद्दल काही बोलण्याआधी प्रत्येकाने ते अवश्य वाचावे ही
अपेक्षा आहे.आई राजमाता जिजाबाई ह्या त्यांच्या मार्गदर्शक होत्या.जीवनात पहिली
गुरु आईच असते.त्यांना आईबद्दल नितांत आदर होता,प्रेम होते,भक्ती होती, निष्ठा
होती. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात अत्यंत आदराचे स्थान होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धती
त्यांच्या काळातील गडकिल्यांचे व्यवस्थापन,त्यांचे
व्यवस्थापन,त्यांची युद्धनीती ज्यात गनिमी काव्याचा समावेश होतो.सह्याद्रीच्या
पर्वतरांगांत जर बलाढ्य शत्रूशी परिणामकारकपणे मुकाबला करायचा असेल,तर गनिमी कावाच
कामात येईल हे त्यांनी हेरले होते.शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासकीय व्यवस्था
हे त्यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ठ.त्याच्याच
जोरावर त्यांनी एक भक्कम आणि सामर्थ्यशाली राज्य उभारले.महाराजांनी आरमाराचे महत्व
ओळखले.त्यांनी कोकण किनारा आणि गोव्याच्या किनाऱ्याच्या संरक्षणासाठी आपले स्वतःचे
आरमार उभारले होते. प्रदेशातील भूभागाची सखोल माहिती,वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याच्या
जोरावर त्यांनी अनेक लढाया जिंकल्या.त्यांनी राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना
केली होती.हे मंत्री राज्यकारभारविषयक कामांत महाराजांना मदत करीत असतं.त्यांचे दक्षिण
दिग्विजय,उमराणी आणि नेसरीच्या लढाया,पन्हाळ्याचा लढा,पावनखिंडीची लढाई,आग्राहून सुटका,शाहिस्तेखानाशी
लढाई,अफजलखानाशी मुकाबला, विजापूरच्या सलतनतशी संघर्ष या आणि अशा असंख्य रणसंग्रामातून
शिवरायांच्या मुत्सद्देगिरीची आणि राजकीय कुटनीतीची कल्पना येते.त्यांच्या शिस्तबद्ध
आणि सक्षम प्रशासकीय संघटनाच्या जोरावर त्यांनी कुशल नागरी शासन प्रस्थापित केले. अतिशय
बुद्धिमान,पराक्रमी,धोरणी,मुत्सद्दी अशी कित्येक विशेषणे लिहिली तरी कमी पडतील,अशा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जन्मदिनी
माझे लक्ष्य लक्ष्य प्रणाम.
प्रसाद नातु,पुणे.


ऊर भरून आला
ReplyDeleteSundar
ReplyDelete