ब्लॉग नं. 2026/171.
दिनांक: 20 जून, 2026.
मित्रांनो,
संध्याकाळी 5 नंतरच्या 'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर
दिवस मावळत असताना,आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं,तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते, संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता, त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर (Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.
सविस्तर:
'ईटिंगवेल' (EatingWell) च्या एका अहवालानुसार,आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते,तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी,रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो.
आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या आहेत, ज्या रात्री नकळतपणे तुमच्या रक्तातील साखरेत व्यत्यय आणत असतात.
1. रात्री जास्त जेवणे किंवा उच्च-कार्बोहायड्रेट्स खाणे:
संध्याकाळी शरीराची चयापचय क्रिया (Metabolism) नैसर्गिकरित्या मंदावते.अशा वेळी झोपण्यापूर्वी रात्रीचे जेवण जास्त करणं किंवा उच्च-कार्बोहायड्रेटयुक्त स्नॅक्स खाणं,रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरतं.
· तज्ज्ञांचे मत: पांढरा ब्रेड, पास्ता, पेस्ट्री, गोड स्नॅक्स आणि साखरयुक्त पेये यांसारखे प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्स,संध्याकाळी 5 नंतर सर्वात जास्त त्रासदायक ठरतात.
· परिणाम:हे पदार्थ लवकर पचतात,ज्यामुळे साखरेची पातळी वेगाने वाढते.रात्री इन्सुलिनची संवेदनशीलता कमी असल्यामुळे,ही साखर रक्तप्रवाहात जास्त काळ टिकून राहते,ज्यामुळे झोप,भूक आणि सकाळच्या ग्लुकोजच्या पातळीत व्यत्यय येतो.
2. संध्याकाळी मद्यपान (Alcohol) करणे:
संध्याकाळच्या वेळी घेतलेले एखादं पेय आराम देत असलं,तरी ते रक्तातील साखरेचं संतुलन पूर्णपणे बिघडू शकत.
· परिणाम: अल्कोहोल सुरुवातीला रक्तातील साखर कमी करू शकतं,परंतु अनेकदा रात्रभरात 'रिबाउंड हायपरग्लायसेमिया' (रक्तातील साखरेची पातळी अचानक पुन्हा वाढणे) होतो.
· कारण: जेव्हा यकृत प्रथम अल्कोहोलचं विघटन करण्यावर लक्ष केंद्रित करतं, तेव्हा त्याची ग्लुकोज मुक्त करण्याची क्षमता कमी होते.हा चढ-उतार दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत टिकून राहू शकतो.
3. झोपेची कमतरता किंवा अनियमित वेळ:
तुमच्या झोपेचे वेळापत्रक ग्लुकोजच्या संतुलनाशी थेट जोडलेले आहे.खूप उशिरापर्यंत जागं राहिल्याने, शरीराला इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करणं कठीण होतं.
· परिणाम: एका रात्रीची खराब झोप देखील,इन्सुलिनची संवेदनशीलता कमी करू शकते.
· तणाव संप्रेरक (Cortisol): झोप पूर्ण न झाल्यास,कॉर्टिसोल नावाचे तणाव संप्रेरक वाढतं,जे शरीराला इन्सुलिनला अधिक प्रतिरोधक बनवतं.तसेच,थकव्यामुळे दुसऱ्या दिवशी,कार्बोहायड्रेट्स खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते.
4.शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) असणे:
रात्रीच्या वेळी ग्लुकोजची स्थिरता राखण्यासाठी,शरीरात पुरेसे पाणी असणं (Hydration) अत्यंत आवश्यक आहे.
· परिणाम:जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते,तेव्हा रक्तातील ग्लुकोज अधिक केंद्रित होतं, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते.
· टीप:संध्याकाळी नियमित पाणी प्यावे,पण झोपण्यापूर्वी लगेच जास्त पाणी पिणे टाळावे,जेणेकरून रात्रीच्या झोपेत व्यत्यय येणार नाही.
5. संध्याकाळी पूर्णपणे निष्क्रिय राहणं:
जर तुम्ही जेवणानंतर सोफ्यावर किंवा बेडवर,तासनतास निष्क्रिय बसून राहत असाल,तर रक्तातील साखर वाढलेली राहण्याची शक्यता जास्त असते.
· उपाय: जेवण किंवा नाश्ता केल्यानंतर 60 ते 90 मिनिटांच्या आत,अगदी 5 ते 10 मिनिटे चालल्याने, (Walk) इन्सुलिनची संवेदनशीलता लक्षणीयरीत्या सुधारते.
· जर बाहेर जाणं शक्य नसेल,तर घरातील घरगुती हालचाली,हलकं स्ट्रेचिंग किंवा बॉडी-वेट व्यायाम देखील,शरीराला ग्लुकोजचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात.
6.संध्याकाळच्या तणावाकडे (Stress) दुर्लक्ष करणं:
रक्तातील साखरेचा विचार करताना,लोक फक्त अन्नाचा विचार करतात,पण तणाव देखील यात मोठी भूमिका बजावतो.रात्री शांत झोप न घेता तणावात राहिल्यास,कॉर्टिसोलची पातळी वाढलेली राहते, जी ग्लुकोजची पातळी थेट वाढवते.
· उपाय: वाचन,सौम्य स्ट्रेचिंग,ध्यान (Meditation) किंवा कोमट पाण्याने अंघोळ करणे,यांसारख्या आरामदायी सवयींमुळे शरीराला विश्रांतीचा संकेत मिळतो.यामुळे तणाव कमी होतो आणि सकाळी रक्तातील साखर स्थिर राहते.
समारोप:
संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपल्या दिनचर्येत केलेले हे छोटे आणि सकारात्मक बदल,रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मैलाचा दगड ठरू शकतात.एक नियमित संध्याकाळची दिनचर्या,तुम्हाला शांत झोप तर देईलच,सोबतीने कॉर्टिसोल नियंत्रित ठेवून,दुसऱ्या दिवशी सकाळी,रक्तातील साखरेची पातळी देखील निरोगी राखेल.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
होलीस्टिक हेल्थ कोच
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

Important information on health
ReplyDelete🙏RR
ReplyDelete