ब्लॉग नं. 2026/134.
दिनांक: 14 मे, 2026.
मित्रांनो,
चालणे हे सर्वात सोपा आणि कुठलाही खर्च
करावा लागत नसलेला,व्यायाम प्रकार आहे.चालण्याच्या व्यायामाचा विचार करताना, सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी नेमकी कोणती वेळ निवडावी, याचा विचार आपण अनेकदा करतो. 'सकाळी चालावे की
संध्याकाळी?'
हा विषय नेहमीच चर्चेचा राहिला आहे. फिटनेसप्रेमी, डॉक्टर आणि अगदी कुटुंबातील व्हॉट्सॲप ग्रुप्समधील सदस्यही,यापैकी कोणती वेळ
अधिक चांगली आहे,यावर आपली ठाम मते मांडत असतात.काही लोकांना सकाळची वेळ शांत,प्रसन्न
आणि उत्साहवर्धक वाटते,
तर काहींच्या मते दिवसभराच्या कामाच्या धावपळीनंतर,संध्याकाळची
वेळ अधिक सोयीस्कर ठरते.मात्र, प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ, (Diabetologist) डॉ. व्ही.मोहन यांच्या मते,यामागील सत्य बहुतेकांना वाटते,त्यापेक्षा
खूपच साधे आणि सोपे आहे.आजच्या ब्लॉगमध्ये हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
सविस्तर:
'डॉ. मोहन्स डायबिटीस स्पेशालिटीज सेंटर'चे अध्यक्ष,आणि 'पद्मश्री' पुरस्कार विजेते डॉ. मोहन यांनी, चालणे आणि रक्तातील
साखरेचे नियंत्रण,याविषयीचा संभ्रम दूर करण्यासाठी नुकतीच 'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आधार घेतला.यांत त्यांनी आपले मत
व्यक्त केले आहे.
"सर्वांसाठी एकच नियम लागू होत नाही"
"सकाळी चालावे की संध्याकाळी? हा प्रश्न लोक मला अनेकदा विचारतात," असे डॉ. मोहन म्हणाले. "माझ्या मते, 'सर्वांसाठी एकच नियम' असा कोणताही उपाय येथे लागू होत नाही. काही लोकांना सकाळची वेळ अधिक मानवते (morning people), तर काहींना संध्याकाळची वेळ अधिक सोयीस्कर वाटते (evening people)."
सकाळच्या चालण्याला प्राधान्य द्या:
चालण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ,हे
दोन्ही पर्याय योग्यच आहेत,असे स्पष्ट करतानाच, डॉ. मोहन यांनी मात्र,सकाळच्या
चालण्याला,आपली वैयक्तिक पसंती असल्याचे सांगितले आणि त्यामागील कारण ही विशद
केले."सकाळी हवा ताजी असते,प्रदूषण कमी असते,तुमचे
शरीरही ताजेतवाने असते आणि रात्रीची झोपही शांत व पूर्ण झालेली असते," असे ते म्हणाले. सकाळच्या
वेळी शरीर आणि मन (मेंदू) सर्वाधिक ग्रहणशील अवस्थेत असतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. "नेमक्या याच वेळी शरीर आणि मेंदूला मिळणारे
विविध संकेत (inputs)
अधिक प्रभावीपणे स्वीकारले जातात; म्हणूनच मी सकाळच्या चालण्याला,अधिक पसंती देईन," असे
डॉ. मोहन यांनी स्पष्ट केले.दिवसाच्या कोणत्याही वेळी केलेल्या,शारीरिक हालचालींना
शरीर चांगला प्रतिसाद देत असते. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे,तुमच्या
जीवनशैलीला साजेली,अशी एक वेळ निवडणे आणि त्या वेळेचे नियमितपणे पालन करणे.सकाळी
लवकर केलेली सैर (चालणे) दिवसभराचा मूड ठरवण्यास,मन प्रसन्न करण्यास
आणि दिवसभर अधिक आरोग्यदायी निवडी करण्यास प्रोत्साहित करण्यास मदत करू शकते.
संध्याकाळची सैरही तितकीच गुणकारी:
डॉ. मोहन म्हणतात,सकाळी चालणे जमले
नाही,म्हणून दिवसभरातून चालणे पूर्णपणेच टाळावे, असे मुळीच नाही. "जर
तुम्हाला सकाळी चालणे शक्य होत नसेल, तर तुम्ही संध्याकाळीही
चालू शकता,"
असे ते म्हणाले.संध्याकाळची सैर लोकांना विरंगुळा मिळवून
देण्यास,कामाचा ताण कमी करण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते. ज्यांचे
सकाळचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असते,किंवा जे रात्रीच्या पाळीत (नाईट शिफ्टमध्ये)
काम करतात,
त्यांच्यासाठी संध्याकाळची वेळ हाच कदाचित एकमेव व्यावहारिक
पर्याय असू शकतो;
आणि यात काहीही गैर नाही.
वाढता कल: जेवणानंतर चालणे:
डॉ. मोहन म्हणतात,सध्या लोकप्रिय होत
असलेला एक नवीन दृष्टिकोन,तो म्हणजे जेवणानंतर चालणे.ते प्रत्येक जेवणानंतर 10 ते 15
मिनिटे चालण्याचा सल्ला देतात."जर तुम्ही नाश्त्यानंतर 10 ते 15 मिनिटे, दुपारच्या जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे आणि रात्रीच्या जेवणानंतर 10 ते 15
मिनिटे चालू शकलात,तर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी,वेगळे चालण्याची गरज उरत नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
जेवणानंतर चालण्यामुळे रक्तातील साखरेवर कसा परिणाम होतो?
जेवणानंतर चालणे इतके प्रभावी
ठरण्यामागचे कारण हे,जेवणानंतर रक्तातील साखरेच्या पातळीत होणाऱ्या बदलांशी संबंधित आहे.
"जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते; आणि
नेमक्या त्याच वेळी जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात करता, तेव्हा साखरेची ती वाढ (वाढण्याचा वेग) मंदावते," असे
डॉ. मोहन म्हणतात.जेवणानंतर चालण्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासही मदत होते.मधुमेह किंवा 'प्री-डायबेटीस'
(मधुमेहाच्या पूर्वस्थितीत) असलेल्या लोकांसाठी, ही साधी सवय,रक्तातील साखरेच्या पातळीत,लक्षणीय फरक घडवून आणू शकते.
दिवसभरात किती पावले चालणे आदर्श मानले जाते?
दिवसभरात किमान 7,000 पावले चालण्याचे
उद्दिष्ट ठेवण्याचा सल्ला ते देतात. हे उद्दिष्ट नियमितपणे गाठल्यास, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास आणि एकूणच आरोग्यात सुधारणा करण्यास मदत होऊ शकते.असे
डॉ. मोहन म्हणतात.
समारोप: चालणे महत्त्वाचे, वेळ कोणतीही असो:
थोडक्यात
सांगायचे तर,व्यायामासाठी,'सकाळी की संध्याकाळी' या वादात अडकून पडण्यापेक्षा, 'नियमित चालणे' हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली
आहे.डॉ. व्ही. मोहन यांच्या मार्गदर्शनानुसार,आपल्या
शरीरप्रकृतीला आणि दैनंदिन वेळापत्रकाला जी वेळ सोयीस्कर पडेल, तिचे पालन करणे सर्वात महत्त्वाचे आहे. मुख्य म्हणजे यांत सातत्य हवे. जेवणानंतर
10-15 मिनिटे चालणे आणि दिवसभरात 7,000 पावले चालण्याचे उद्दिष्ट ठेवणे,या गोष्टी लक्षात
ठेवा.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला
कसा वाटला,हे कमेन्ट
बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
होलीस्टीक हेल्थ कोच
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर
लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही
वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

🙏RR
ReplyDelete🙏RR
ReplyDelete