Blog No.2023/265
Date: - 19th, October
2023.
मित्रांनो,
तुम्ही आपल्या आसपास अनेक वेगवेगळी हॉटेल्स बघितली असतील.पहिला
प्रकार म्हणजे प्युअर व्हेज, मग नॉन-व्हेज, चायनिज, उडुपी किंवा अस्सल महाराष्ट्रीयन
खाद्य पदार्थ मिळणारे मिळणारे म्हणजे पाववडा, मिसळ, मिसळ पाव वगैरे वगैरे.बाकी आणखी
प्रकारांमद्धे मी जात नाही.पण पुस्तकांचे हॉटेल कुठे बघितलंत कां? या पुस्तकाच्या हॉटेलची
ओळख आज मी तुम्हाला करून देणार आहे.
प्रास्ताविक
सहा महिन्यापूर्वीची गोष्ट असेल,मला माझ्या एका मित्राने एक विडियो पाठवला.खाली त्याने लिहिले होते “मित्रा,तुझ्या पुस्तकप्रेमी समूहाच्या चळवळीपेक्षा मोठं काम,एक अल्पशिक्षित 73 वर्षाची आजी करते आहे. हा यू ट्यूब विडियो बघ.” मी तो विडियो बघितला आणि खरोखर या आजीचे कार्य कुठल्याही पूर्ण शिक्षित माणसापेक्षा मोठं आहे.मी त्या “हॉटेल रिलॅक्स कॉर्नर” चा फोन नंबर मिळवला.तो फोन नंबर होता,आजींचा मुलगा प्रवीण जोंधळे यांचा आणि त्या आजी म्हणजे भीमाबाई जोंधळे.प्रवीण जोंधळेशी बोललो.माझी ओळख करून दिली आणि माझी पाच पुस्तके या हॉटेलला पाठवायची कल्पना बोलून दाखविली.त्यांना आनंद झाला.मी पुस्तके पाठविली आणि जेंव्हा केव्हा नासिकला येईन तेव्हा अवश्य येऊन भेटून जाईन असे सांगितले.
आठ ऑक्टोबरला मी नासिकला गेलो होतो.नऊ तारखेला नासिक मधील काही
मित्रांच्या गाठी भेटी झाल्यानंतर 10 ऑक्टोबरला मी प्रवीण जोंधळे यांना फोन लावला.त्यांनी
लगेच ओळखलं, खरं म्हणजे त्यांनी माझा नंबर त्यांच्याकडे सेव असल्याचे सांगितले.मी त्यांना
लोकेशन मॅप शेअर करण्याबद्दल सांगितले.त्याप्रमाणे त्यांनी शेअर केला.मी कारने निघालो.
जऊळका या गावाला,जे आता ओझरमध्येच मोडते हे हॉटेल आहे.गूगल मॅपने नेहमी प्रमाणे दगा
दिला. पण अडचण काहीच नव्हती. “कुणालाही विचारले तर तो सांगेल “पुस्तकाचे हॉटेल” कुठे आहे”,असे
म्हणत रस्त्यावरच्या एका व्यक्तीने मला हॉटेल कुठे आहे ते सांगितले.
आम्ही पोहोचलो आणि त्या पुस्तकांच्या हॉटेलला भेट देण्याचा योग
आला.जोंधळे आजी हॉटेलमध्ये नव्हत्या,त्या पाठीमागेच त्यांच्या घरी जेवायला गेल्या होत्या.पण
तिथे उपस्थित असलेली ऐश्वर्या तिडके हिने आम्हाला पूर्ण हॉटेल दाखविले.हॉटेलच्या पाठीमागे
सुद्धा बसायची व्यवस्था आहे,तिथे एक सेल्फी पॉइंट आहे,जिथे वर “पुस्तकांचे हॉटेल” असे
लिहिलेले आहे आणि खाली “माणसाला दोनच गोष्टी
हुशार बनवितात.एक वाचलेली पुस्तके आणि भेटलेली माणसे.” असा विचार लिहिलेला होता. दोन्ही
बाजूला खुर्च्या टाकलेल्या आहेत आणि मधून जो रस्ता जातो,त्यावर दोन्ही बाजूला इलेक्ट्रिकचे
दिवे लावण्यासाठीचे जे खांब आहेत,त्या खांबावर प्रसिद्ध साहित्यिकांचे फोटो लावले आहेत.हॉटेलमध्ये उजव्या बाजूला विविध लेखकांनी दिलेली पुस्तके आहेत आणि
डाव्या बाजूस विकावयास ठेवलेली पुस्तके. उजव्या हाताला विविध प्रसिद्ध कवींच्या कवितांचे
वॉल पोस्टर लावलेले आहेत. हॉटेलमधील व्यंजनांचा आस्वाद घेण्यासाठी तीन बेंचेसच्या लाइन्स
आहेत.
थोड्याच वेळात भीमाबाई जोंधळे आजी तिथे येऊन दाखल झाल्या.मी त्यांची एक छोटीशी मुलाखत देखिल घेतली.त्यांनी सांगितलं की त्यांचं शिक्षण 5 वी पर्यन्त झालेलं. मुलांना शिकवायचे होते. त्यांनी सुरुवातीला एक चहाचे दुकान सुरू केले. अडीच रुपये दराने आधी चहा विकण्यासाठी स्टॉल टाकला.त्या नंतर हॉटेल सुरू केले. त्यांचा मुलगा प्रवीण जोंधळे याची अक्षरबंध प्रकाशन संस्था ही प्रकाशन संस्था आहे.त्यांनी एकूण 84 पुस्तके प्रकाशित केली आहेत. एक दिवस भीमाबाईंच्या मनात विचार आला की घरात बरीच पुस्तके धूळ खात पडून रहाण्यापेक्षा जर हॉटेलमधल्या बेंचवर दोन दोन पुस्तके ठेवली तर,लोक वाचतील,ज्ञानाचा प्रसार होईल.त्याप्रमाणे त्यांनी ते अंमलात आणले. आधी आधी लोक या कल्पनेला हसत,असे त्या म्हणाल्या.पण जेंव्हा हळू हळू ही गोष्ट पसरू लागली,तेव्हा नासिक-धुळे रोडवरुन जाणारे येणारे हॉटेलमध्ये डोकावून जावू लागले.आता या हॉटेलला खूप गर्दी असते. पुस्तकांच्या जोडीला आजींच्या हातची पिठलं आणि भाकरीचा आस्वाद घेतात. त्यांची सून देखिल यांत त्यांना मदत करते. हॉटेल मधील ऐश्वर्या तिडके आणि शुभम या दोघांचे आदरातिथ्य आणि हॉटेल बद्दल असलेला अभिमान बरंच काही सांगून गेला.
हॉटेलचे इंटिरियरची कल्पना प्रवीण यांची.खूप लोकांनी या हॉटेलला
भेट म्हणून पुस्तके दिली आहेत. हॉटेलमध्ये एका रॅकमध्ये प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले
सरांची पुस्तके ठेवलेली आहेत.जी त्यांनी भेट म्हणून दिल्याचे आजींनी सांगितले.आजींचे
म्हणणे असे की तुम्ही हॉटेलमध्ये मोबाईलपेक्षा पुस्तकांना जवळ करा. पुस्तकांनी ज्ञान
वाढेल.त्यांचे तर असे म्हणणे पडले की एखादा व्यक्ती जर खाद्य पदार्थाची ऑर्डर न देता
दिवसभर पुस्तकं वाचून गेला तरी हरकत नाही.हे सारं अगदी स्तिमीत करणारं होतं.
हॉटेलमधील मेनू कार्डही पुस्तकाच्या आकाराचे आणि ऑर्डर देण्यासाठी
पाटी आणि पेन्सिल ठेवलेली. तिथे बरेच ग्राहक पुस्तक वाचत बसलेले दिसले.संध्याकाळी बरीच
गर्दी होते असे आजी सांगत होत्या. आणखी एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला तो म्हणजे
त्यांनी 15 ऑक्टोबर, जो डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सरांचा वाढदिवस “वाचन प्रेरणा दिवस” म्हणून साजरा केला जातो,त्या
दिवशी रु.50,000/- ची पुस्तके, जे ग्राहक हॉटेलला भेट देतील,त्यांना मोफत देण्याचा
संकल्प सोडला असल्याचे प्रवीण जोंधळे यांनी सांगितले. मी या पुस्तकाच्या हॉटेलने इतका
भारावून गेलो की आमचा जो पुस्तकप्रेमी समूह आहे,त्याचे संचालक श्री. कृष्णा दिवटे यांच्याशी
संपर्क साधून भीमाबाई जोंधळे यांचा समूहातर्फे सत्कार करण्याची संकल्पना समूहाच्या
सदस्यांच्या नासिक भेटीत करण्याबद्दल त्यांना सुचविले.
सारांश
मी या पुस्तकांच्या हॉटेलला भेट देऊन आल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण सुशिक्षित
लोक एक तर असं काही करत नाही.पण केलं तर वाचन चळवळ वाढविण्यासाठी आपण किती केलं याचा
अहं आपल्या ठायी जाणवतो.तो अहं मला भीमाबाई जोंधळे यांच्या आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण
जोंधळे यांच्या न चेहऱ्यावर जाणवला न बोलण्यात. त्याच्याशी बोलतांना त्या अल्पशिक्षित
आहेत असे कुठे जाणवले नाही.खरोखर आपण निसर्ग स्थळांना भेट द्यायला जातो, देव दर्शनाला
जातो तसं एकदा नासिक धुळे रस्त्यावर धुळ्याकडे जातांना ओझर गावाला म्हणजे दहा मैलाच्या
(16 किमी) अंतरावर असलेल्या या पुस्तकाच्या हॉटेलला नव्हे मी तर म्हणेन पुस्तकाच्या
मंदिराला एकदा भेट द्याच.लोक काय काय अलौकिक करत असतात याची प्रचिती येईल.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा
वाटला,हे कमेन्ट बॉक्स
मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया
उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी
रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
खूप खूप धन्यवाद सर. पुस्तक प्रेमी समूहाने तुमची सूचना मान्य करून आमचा सन्मान केला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे.
ReplyDeleteNice blog
ReplyDelete