Blog No.2023/197
Date:-29th ,July, 2023.
मित्रांनो,
मान्सून हा आधीपासून लहरीच होता.पण तो बदलला केंव्हा हे कळलंच नाही. माझ्या लहानपणी अगदी 7 जूनला मृग नक्षत्रावर त्याचं आगमन होत असे.मला आठवतंय पावसाळ्याच्या सुरुवातीला विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटात त्याचं आगमन व्हायचं.सुरुवातीला संध्याकाळी मग दुपारी मग सकाळी आणि मग दिवसभर यायचा.”श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन्हं पडे.” असं खरोखर होतं असे. कविता असली तरी ते वास्तव देखिल होतं.पण आता सगळं तंत्र बिघडलं आहे. आज त्यामुळे पावसावर हा ब्लॉग लिहिला.
प्रास्ताविक
पाऊस जून आणि जुलैचा पहिला आठवडा, असा
काही लपंडाव खेळला आणि “पावसा पावसा यो रे यो रे” किंवा अगदी “येरे येरे पावसा तुला
देतो पैसा” म्हणावेसे वाटत होतं.शेवटी तो आला धसमुसळ्या सारखा की हा पहिला पाऊस वाटला
नाही. “आला पाऊस मातीच्या वासात गं, मोती गुंफीत मोकळ्या केसात गं” असं म्हणावेसे वाटू
नये अशा थाटात आला.”आला आला वारा संगी पावसाच्या धारा, पाठवणी करा निघाल्या सासुरा.”
असं म्हणणे जड वाटू लागलं. कारण कुठे दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद, तर कुठे पाणीच पाणी
झाले म्हणून वाहतूक बंद.
पाऊस उशिरा आल्यामुळे श्रावण लवकर आल्यासारख
वाटतय, लगेच काही लोक म्हणतील श्रावण नाही अधिक श्रावण आला आहे. पण श्रावण आहेच.तर
श्रावण म्हटलं अन मला आठवलं “श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा” अन रिमझिम वरुनच
आठवलं “रिमझिम पाऊस पडे सारखा यामुनेला ही पुर चढे पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन
कुणीकडे” आजकाल रस्त्यांची यमुना होते.अन शहरात पाणीच पाणी चहूकडे अशी अवस्था होते.
रिमझिमवर मराठीतच गाणी आहेत असं नाही.हिन्दीत
तर रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन”, झिलमिल सितारोका आंगन होगा रिमझिम बरसता सावन
होगा”, रिमझिम रिमझिम रुणुझुणू भीगी भीगी ऋतमे तुम हम हम तुम चलते है”,“रिमझिम के गीत
सावन गाए गाए भीगी भीगी रातोमे” ही गाणी आली गीतकारांचा आणखी एक आवडता शब्द त्यातले
“एक लडकी भीगी भागीसी सोती रातोमे जागी से”, “भीगी भीगी रातोमे मिठी मिठी बातोमे ऐसी
बरसातमे कैसा लगता है”, तर अदनान सामी “भीगी भीगी रातोमे तुम आओ ना” म्हणून बोलावत
असे.”हम तुम दोनो साथमे भीग जाएंगे बरसातमे” या गाण्यातला हा देखिल एक आवडता शब्द “जिंदगी
भर नही भुलेगी वो बरसात की रात”, सावन हा देखिल परवलीचा शब्द जसं “सावन का महिना पवन
करे सोर” “सावन के झुले पडे तुम चले आओ” सावन आये या ना आये,जिया जब झुमे सावन है”,
“सावन का महिना आ गया हो जिना नही आता जिन लोगो को”. “अबके सजन सावनमे आग लगेगी बदन
मे”. तसच टीप टीप चं “टीप टीप टीप टीप बारिश शूरु हो गई”. किंवा “टीप
टीप बरसा पानी,पानीने आग लगा दी.”
मित्रांनो,हे सारं आठवायचं कारण असं की
रोमॅंटिक होता पावसाळा. शेतकरी आनंदित असायचा.चित्रपट हे शेवटी खूप सार वास्तवाचं प्रतिबिंब
असतं. आज काल पहिलाच पाऊस अंगावर शहारे तर आणतोच पण काटे आणतोच. पहिल्याच पावसात 50
ते 60% धरणं भरतात,नदीला पुर येतो, गावाकडे पिकं आणि शहराकडे घर पाण्याखाली जातात.यालाच
विकास म्हणायचं कां?
मुंबईहून नागपूरला 7.30 तासात जाण्यासाठी
समृद्धिमार्ग तयार होतो. “समृद्धिमार्ग” आपण सुरु केला म्हणून काही जण पाठ थोपटून घेतात
आणि काही जण आपल्याला “समृद्धिमार्गाला” हिरवा झेंडा दाखवता आला नाही म्हणून त्याला
शापित म्हणतात. पण मुंबई पासून 100-150 किमी वरील तळोघ ग्रामपंचायतीतील जूनवणे वाडीतील
वनिता भगत या गर्भवतीचा गावाहून जिथे आरोग्य मिळेल तिथे जायला रस्ता नाही. चिखलात,
खाचखळग्यातून डोलीतून दवाखान्यात नेलं तर दवाखाना आहे पण डॉक्टर नाही. शेवटी जिल्हा
शासकीय मध्ये उपचार झाले खरे पण बाळ आणि बाळंतीन दोघही मृत्यू पावले.ही किती दुर्दैवाची
गोष्ट आहे.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपण अगदी प्राथमिक
सुविधा गरजुपर्यंत पोहोचवू शकलो नसू तर विकास झाला म्हणता येईल कां? मित्रांनो, मोठ
मोठे रोड, शहरांना जोडणे ही सारी विकासाची दार आहेत मी मानतो. पण त्याचं वेळेस हे असंही
घडत त्याचं काय? पण एक विचार मनात येतो याला काय फक्त सरकार जबाबदार आहे कां? आपण सारेच
जबाबदार आहोत. पाच वर्षासाठी निवडून देतांना मला काही देणारे सरकार पाहिजे आहे.गावाला
रस्ते नकोत,पाणी नकोय, आरोग्यसेवा नकोय. मला पाहिजे रोजगार,नाही तोही नकोय, मला सगळं
फुकट पाहिजे आहे.अगदी बारा महिने जेवण फुकट हवे आहे. याला काही उपाय आहे असं मला वाटतं
नाही. “फुकट” ही मानसिकता संपून जेव्हा गावासाठी,तालुक्यासाठी, जिल्हयासाठी,राज्यासाठी
आणि शेवटी देशासाठी काही देण्याचं वचन देणाऱ्याला आपण निवडून दिलं तर हे संपेल. अन्यथा
पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरूच राहील.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु,पुणे
पावसाचे वर्णन व त्या वरील गाण्याचे संदर्भ उत्तम . शेवटी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तो खरंच खूप छान आहे.
ReplyDeleteChan blog
ReplyDelete