Blog No. 2023/135
Date: 30th, May 2023.
मित्रांनो,
पर्यावरणाविषयी एकूणच सगळीकडे
जागरुकता निर्माण करण्याचे कार्य जागतिक पातळीवर सुरु आहे.अशातच एक बातमी वाचण्यात
आली की,भारतातील जंगलतोड रोखण्यास युरोपियन युनियन मदत करू शकते.या बातमीने तुम्हाला
आश्चर्य वाटले असेल ना? तसं मलाही वाटलं. पण पूर्ण बातमी वाचल्यावर नेमकं काय ते कळलं.त्यावरच
आहे माझा आजचा ब्लॉग.
प्रास्ताविक
युरोपियन युनियन हा युरोप खंडातील 27 देशांचा संघ आहे.युरोपियन युनियनकडे वस्तूंचे उत्पादन घेण्याची क्षमता नाही.म्हणजे त्याचे उत्पादन घेण्यासाठी त्यांच्याकडे योग्य जमीन आणि हवामान नाही.त्यामुळे त्या विशिष्ट वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी ते इतर देशांवर अवलंबून आहेत.युरोपियन युनियन मधील देशांना चॉकलेट आणि बिस्किटांसह इतर बर्याच वस्तूंच्या उत्पादनांमध्ये पाम तेल मोठ्या प्रमाणात लागते.पण हे देश पाम तेलाचे उत्पादन करीत नाहीत.त्यांना त्यांच्या देशात जर पाम तेल उत्पादन घेणे सुरु करायचे असेल तर, त्यांना पामची शेती करावी लागेल आणि त्यासाठी त्यांना जंगलतोड करावी लागेल.खरं तर चॉकलेट आणि बिस्किटांसह इतर बर्याच वस्तूंच्या उत्पादनांमध्ये पाम तेल उपयोगात आणण्यासाठी युरोपियन युनियन जगभरातील 16% जंगलतोड होण्यास जबाबदार आहेत.
युरोपियन युनियन जगभरात कुठेही जंगलतोड होऊ नये यासाठी सक्रिय
युरोपियन युनियनच्या लक्षात
उशिरा कां होईना आले आहे की, जगभरात कुठेही असो जंगलतोड होणे योग्य नाही.कारण जंगले
हीच कार्बनचे प्रमाण कमी करण्यास सहाय्यभूत ठरतात.ते हवेतील कार्बन डाय ऑक्साईड
शोषून घेतात,साठवतात आणि हवामान बदलाशी
लढण्यास मदत करतात.त्यामुळे EU आता काहीतरी महत्त्वाकांक्षी कार्य
करीत आहे.अलीकडेच युरोपियन युनियनने फॉरेस्टेशन-फ्री प्रोडक्टस् रेग्युलेशन (EUDR)
नावाचा कायदा स्वीकारला आहे.ज्याचा उद्देश जंगलतोड कमी करा हा आहे.
जंगलतोडीस सर्वात मोठा हातभार कोणाचा आहे?
तुम्हाला हे ऐकून धक्का बसल्याशिवाय रहाणार नाही की,जंगलतोडीस सर्वात मोठा
हातभार हा शेतीचा आहे. 2001 ते 2015 दरम्यान, जागतिक वृक्ष तोडीमध्ये
शेतीचा वाटा 39% होता. जंगलतोड करुन शेती केली जात आजे.युरोपियन युनियन
फॉरेस्टेशन-फ्री प्रोडक्टस् रेग्युलेशन या कायद्याप्रमाणे डिसेंबर २०२० पासून एखाद्या वस्तूचे उत्पादन हे जंगलतोड करुन,त्या जागेवर
शेती करुन घेतलेले असेल.तर त्या उत्पादित वस्तुस युरोपियन युनियन मधील देशात प्रवेश
मिळणार नाही.अशा आयात आणि निर्यात,दोन्ही प्रकारच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली
आहे.याची सुरुवात म्हणून पाम तेल, गोमांस, कोको, कॉफी, सोया आणि लाकूड यांच्या
आयात आणि निर्यात, व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे.जर या वस्तूंचे उत्पादन जंगलतोड
करुन त्या जागेवर शेती करुन घेतलेले असेल.
समजा तुमची जर्मनीला कोको
निर्यात करणारी कंपनी आहे.तर तुमच्या मालाला जर्मनीच्या सीमेत प्रवेश करण्याआधी तुम्हाला
हे सिद्ध करावे लागेल की, तुम्ही निर्यात करीत असलेल्या कोकोचे उत्पादन, नवीन
जंगलतोड झालेल्या जमिनीवर लागवड करुन घेतलेले नाही.तुम्हाला त्यासाठी शेतजमिनीची भौगोलिक
माहिती द्यावी लागेल.आवश्यकता पडल्यास,उपग्रहाची मदत घेऊन अधिकारी सत्य तपासून पाहू
शकतील.याची योग्य ती पडताळणी झाली की,तुमच्या कोकोला जर्मनीच्या सीमेत प्रवेश मिळू
शकेल.युरोपियन युनियन असे करुन दरवर्षी 72,000 हेक्टर जंगल जमीन वाचवू शकेल, असा अंदाज
आहे.
युरोपियन युनियनच्या या एका चांगल्या निर्णयास पाठिंबा आहे कां?
नाही,इंडोनेशिया आणि मलेशिया हे पाम तेल निर्यातदार देश,आधीच तक्रार करण्यासाठी ब्रुसेल्सला पोहोचले आहेत.भारत दरवर्षी युरोपियन युनियनला कॉफी आणि लेदर हाइड ची $1.3 अब्ज एवढ्या किमतीच्या उत्पादनांची निर्यात करत असल्याने भारतालाही अस्वस्थ वाटत आहे.भारताने आधीच जागतिक व्यापार संघटनेकडे निषेध नोंदविला आहे.भारताने काही महिन्यांपूर्वी एक जोरदार शब्दांत पत्र पाठवले आहे आणि निदर्शनास आणून दिले की,काही देश स्थानिक व्यापार्यांचे संरक्षण करण्यासाठी,(जे कदाचित आंतरराष्ट्रीय व्यापार कायद्यांचे उल्लंघन आहे) विशिष्ट उत्पादनांची आयात मर्यादित करण्यासाठी पर्यावरणाचा आडोसा घेत आहेत.हे एक प्रकारचे अप्रत्यक्ष शुल्क आहे.पडताळणी एजन्सी (युरोपमध्ये) फायद्यासाठी पैसे गोळा करीत आहे आणि निर्यातदार तोट्यात जात आहे.युरोपियन युनियनचा सदस्य असलेल्या फिनलंडच्याही भुवया उंचावल्या आहेत. इतर देशांच्या मनात आता हेच विचार येत आहेत की आजवर युरोपियन युनियनच्या देशांनी जंगलतोड केली आणि पैसा कमावला.आता आमची पाळी आहे आहे तर, तुम्ही निर्बंध लादता आहात. आम्हालाही पैसे कमवायचा अधिकार आहे. पण आता युरोपियन युनियन माघार घेईल असे वाटत नाही.
2005 पूर्वीची गोष्ट आहे.ब्राझीलमधे सोया लागवडीसाठी अमेझॉन रेन फॉरेस्ट,मोठ्या
प्रमाणावर उद्ध्वस्त केले जात होते.तिथे जंगलतोड करुन 30% सोयाचे उत्पादन झाले.कोंबडीच्या
खाद्यासाठी सोयाच्या पिकाची उपलब्धता,ही गोष्ट तेथे कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय
कंपन्यांना हवीहवीशी वाटत होती.परंतु मोठ्या जनक्षोभानंतर,सर्वांनी स्वेच्छेने नवीन जंगलतोड झालेल्या ऍमेझोनियन जमिनीवर
लागवड केलेल्या सोयाची खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर 2019 पर्यंत,एकूण सोया पिकापैकी फक्त 2% सोया पीक जंगलतोडीशी संबंधित होते. या गोष्टीमुळे
Amazon चे जंगल वाचले.जर स्वैच्छिक स्थगितीचा असा परिणाम होऊ शकतो,
तर कल्पना करा की EU सारख्या मोठ्या प्रदेशात किती
जंगल वाचू शकेल.त्यांच्या या प्रयत्नांमुळे आपण देखील जंगलतोड रोखण्यात यशस्वी होऊ
शकतो,नाही का? आणि आपण सर्व उत्सर्जन
कमी करण्याच्या आणि आपला ग्रह वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याने युरोपियन युनियनच्या
या निर्णयाचे आपण स्वागत करू.
सारांश
शेवटी कुणाच्या कां प्रयत्नामुळे जंगले वाचलीत
तर ती कुणाला नको आहे.जंगलं वाचलीत तर कार्बनचे उत्सर्जन शोसले जाईल आणि त्याचा हवामानावर
निश्चित परिणाम होईल.शेवटी पृथ्वी वाचली तर आपण वाचणार.म्हणून आपण युरोपियन युनियनच्या
या कायद्याचे स्वागत करू या.आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर
लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग
मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु,पुणे.
Chan blog.
ReplyDeleteमाहितीपूर्ण लेखन.
ReplyDelete