Blog No. 2023/104
Date: 30th, April 2023.
मित्रांनो नमस्कार,
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली
जाते.20 व्या शतकात जे संत होऊन गेले त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा प्रामुख्याने समावेश
होतो. त्यांनी भजनातून आणि कीर्तनातून अंधश्रद्धा आणि जातिभेदाचे निर्मूलनासाठी प्रयत्न
केला.तुमच्या मनात भाव नसेल तर देव पावणार नाही.असा संदेश ते आपल्या “मनी नाही भाव
म्हणे देवा मला पाव, देव अशानी भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे.” अशा
भजनातून देत असतं. अशा या संताबद्दल अधिक जाणून घेऊया आजच्या ब्लॉग मधे.
प्रास्ताविक
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म बंडोजी
इंगळे आणि मंजुळाबाई इंगळे यांच्या परिवारात 30 एप्रिल, 1909 ला अमरावती जिल्ह्यातील
यावली या गांवी झाला. त्यांचे जन्मनांव माणिक बंडोजी इंगळे हे होते. त्यांचे गुरु आडकोजी
महाराज यांनी त्यांचे माणिक हे नांव बदलून ठेवले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य
1942 च्या
भारत छोडो आंदोलनाच्या वेळी त्यांना अटकही झाली होती, “आते है नाथ हमारे” हे गीत स्वातंत्र्य
लढ्यातील स्फूर्ती गान ठरले होते.त्यांनी केवळ विदर्भात नाही तर महाराष्ट्रभर आणि देशभर
फिरून आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रबोधनाचे कार्य
केले होते.एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशातून जाऊन त्यांनी
विश्वबंधुतेचा संदेश दिला होता.
त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आहे.या ग्रामगीतेत एकूण 41 अध्याय
आहेत.मी काही महत्वाच्या अध्यायात काय सांगितले आहे.ते सांगायचा प्रयत्न केला आहे.पहिला अध्याय हा देवदर्शनाचा आहे.यात 121 श्लोक आहेत. ज्यात महाराजांनी
लिहिले आहे “माझी मला साक्ष आहे, मी ग्रंथकर्ता विद्वान नोहे, तरी धान्यराशीत आपुले
पोहे,टाकावे वाटती.देव प्रेमाचा भुकेला,न पाही जातपात अथवा कला, साधाभोळाहि उद्धरिला,ऐसा
लौकिक तयाचा.” या अध्यायात देव नेमका कसा आहे, त्यास प्राप्त करण्यासाठी काय करावे
लागेल या बद्दल लिहिले आहे.
दुसऱ्या अध्यायात धर्माध्ययन वर लिहिले
आहे,हयात एकूण 108 श्लोक आहेत. अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दांत धर्माबद्दल आणि धर्माचारणाबद्दल
सांगितले आहे.त्यातील या ओळी मला आवडल्या.प्रत्येकासि
शरीर , मन । वाणी , इंद्रियें
, बुध्दि , प्राण । या सर्वांचें विकास
साधन । तोचि धर्म. अशी धर्माची सुटसुटीत व्याख्या केली आहे. तिसरा आणि चवथा अध्याय
हा आश्रम धर्म आणि संसार परमार्थ यावर आहे.
पाचव्या अध्यायात जो वर्णव्यवस्थेवर
आहे.त्यात महाराज म्हणतात की वर्ण हा जन्माने नसावा तो कर्माने असावा. “ऐसें ब्राह्मणत्व निर्माण करा । प्रचारक होऊनि घरोघरीं फिरा । तरीच
सर्वांसि मिळे आसरा । सुखशांतीचा ॥१२९॥ हें ब्राह्मणत्व नव्हे जातीय । कुणीहि साधावें निर्भय । जो आदर्श
प्रचारक होय । तोचि ब्राह्मण निर्धारें ॥१३०॥ महाराज म्हणतात की जो
धर्मप्रचारकाचे कार्य करेल आणि जो आदर्श प्रचारक होईल, तोच निश्चितपणे ब्राह्मण होय,
मग तो कुठल्याही जातीचा असो.
चौदाव्या
अध्यायात ग्राम आरोग्याबद्दल महाराज म्हणतात “गांव
असो अथवा शहर । तेथील बिघडले आचारविचार । म्हणोनीच रोगराईने बेजांर । जाहले सारे
जन लोक ॥२१॥ गांव व्हावया निरोगी सुंदर ।
सुधारावें लागेल एकेक घर । आणि त्याहूनहि घरांत राहणार । करावा लागेल आदर्श ॥२२॥व्यक्ति
व्हाया आदर्श सम्यक । पाहिजे दिनचर्याच सात्विक । सारें जीवन निरोगी सुरेख । तरीच
होईल गांवाचें ॥२३॥नियमीं बांधला एकेक दिन । त्यानेच सुधरे जीवन संपूर्ण । गांवहि
होय आरोग्यसंपन्न । सारे प्रसन्न देवीदेव”॥२४॥ महाराज म्हणतात
गांव असो किंवा शहर असो जर आचारविचार बिघडले असतील तर लोक रोगराईने लोक बेजार होतील.ग्राम
आरोग्य सुधारावयाचे असेल तर एक एक घर सुधरवावे लागेल तर गावाचे आरोग्य सुधारेल.
तिसाव्या
अध्यायात “भजन प्रभाव” यावर महाराज म्हणतात. “आमुचें
संपूर्णचि जीवन । सुधारूं शके कीर्तनभजन । वेदशास्त्रस्मृति संपूर्ण । याच काजा
जन्मल्या.” या अध्यायातून त्यांनी भजनाचे सामर्थ्य वर्णन
केले आहे. तसेच भजन कसे करावे यावर खूप सुरेख भाष्य केले आहे.महाराज म्हणतात ज्या भजनाचा
अर्थ आपल्याला कळत नाही ते आपण म्हणून नये कारण त्याने समाजावर काहीच परिणाम होतं नाही.
ग्रामगीतेच्या
चौतीसाव्या अध्यायात जो प्रारब्धवादाला समर्पित आहे. यात महाराज म्हणतात की ज्याला
ज्या गोष्टीची आवड असते,त्यासाठी त्याला सवड असते. मग कुणी त्याच्या आड येण्याचा प्रयत्न
केला तरी येऊ शकत नाही. महाराजांनी “भाग्यवंत” कोण याची सुरेख व्याख्या केली आहे. भाग्यवंत त्यासचि म्हणावें । ज्याने ईश्वरास समर्पण व्हावें ।
अनन्यगतीने राहावें । शरण देवासि ॥२७॥ आणि
सत्कार्यी असावें तत्पर । सर्व सोडोनि दुर्व्यवहार । सहजकर्म मिळे पोटभाकर ।
त्यांतचि सुखें नांदावें ॥२८॥ आपणासीच सुख व्हावें ।
आणि दुसरे ते ओसरून जावे । ऐसें कधी न मानी जीवें । तोचि भाग्यवंत म्हणावा ॥
जीवनाच्या प्रत्येक अंगाला ग्रामगीतेतून
महाराजांनी स्पर्श केला आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे,हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व
घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश
चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच
होता.अमरावतीजवळ मोझरी येथे महाराजांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात,
याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
खंजिरी भजन
हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वैशिष्ठ. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले.त्यांच्या
ग्रामगीतेतील ग्रंथ महिमा या शेवटच्या अध्यायातील या 7 श्लोकांनी या ब्लॉगची समाप्ती
करतो.
ग्रामगीता कशासाठी आणि ती कां वाचावी
ईश्वरें
व्यापिलें हें विश्व । म्हणोनि जगचि आम्हां देव । विश्वाचा मूळ घटक गांव ।
ग्रामगीता त्यासाठी ॥१॥
यांत
ग्रामाचा जयजयकार । सर्व तीर्थक्षेत्रांचें ग्रामचि माहेर । ग्राम हा विश्वाचा
पाया सुंदर । ग्राम नसतां प्रलयचि ॥२॥
ग्राम
म्हणजे देवमंदिर । मानव देवमूर्ति सुंदर । सर्वांची सेवा समप्रकार । तीच पूजा
आमुची ॥३॥
ग्रामगीता
शाब्दिक सेवा । परि दृढ करी संस्कारांचा ठेवा । तेणें ईश्वरी राज्य गांवां ।
नांदेल सदासर्वकाळ ॥४॥
ग्रामगीता
दु:खांसि नाशवी । ग्रामगीता मृत्यूसि हसवी । ग्रामगीता सहकरीतत्त्व वाढवी ।
मानवधर्मा फुलवाया ॥५ ॥
चाळीस दिवस
म्हणजे मंडळ । ऐसीं अनुष्ठानें प्रांजळ । करितां गांव सुधारेल सकळ । संस्कारें
ग्रामगीतेच्या ॥६॥
म्हणोनि
चातुर्मास्यादि निमित्तां । मंदिरीं, पारीं, बैठकींत बसतां । वाचावी हर्षभरें ग्रामगीता ।
रंग रंगणीं आणोनिया ॥७ ॥
महानिर्वाण
तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन
कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.अशा या महान आधुनिक संतास जयंती दिनी माझे लक्ष लक्ष प्रणाम.
प्रसाद नातु, पुणे
छान, माहितीपूर्ण लेख.
ReplyDeleteविनम्र अभिवादन🙏🌺🌺
ReplyDeleteNice info about the saint
ReplyDelete