Blog No. 2023/67
Date: 17th, March 2023.
मित्रांनो,
लावणी ऐकणाऱ्यांचा एक वेगळा वर्ग असतो
ही व्याख्या मोडून काढली ती सुलोचनाताई चव्हाण यांनी. फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा असं ठसक्यात म्हणावं ते सुलोचनाताईनी. चपखळ,फटकेबाज
शब्दांना आपल्या भारदस्त आवाजात ठसका आणि खटका देण्याचे काम सुलोचनाताईनी केलं आणि
गायनाच्या क्षेत्रात आपली एक ओळख निर्माण केली.अशा या रसिकांच्या मनात स्वतःचे स्थान
निर्माण केलेल्या गायिकेची आज जयंती.
प्रास्ताविक
सुलोचना कदम हे सुलोचनाताईचे माहेरचं नांव.
त्यांचा जन्म 17 मार्च 1933 चा. म्हणजे बरोबर 10 वर्षांनी आपण त्यांचे शताब्दी वर्ष
साजरे करु. सुलोचना कदम ह्यांचा जन्म मुंबईत झाला.मुंबईच्या चाळीतच त्यांचे बालपण गेले.वयाच्या
पंधराव्या वर्षापासून त्यांनी गायला सुरुवात केली. त्यांच्या घरचाच एक “श्रीकृष्ण बालमेळा”
होता.ह्या मेळ्याच्या माध्यमातून त्यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले. प्रसिद्ध अभिनेत्री
संध्या या देखिल ह्या मेळ्यात भाग घेत. मेळ्याच्या सोबत त्यांनी हिन्दी,गुजराती आणि
उर्दू नाटकांत बालभूमिका केल्या.त्या काळी घरी ग्रामोफोन ऐकून त्या गायनाचा रियाज करीत.
त्यांनी कुठलेही शास्त्रीय संगीत शिकले नाही.
“कृष्ण सुदामा”ह्या हिन्दी चित्रपटात त्या आपले पहिले गाणं गायल्या.त्या वेळेस त्या नऊ वर्षाच्या होत्या. या नंतर त्यांनी मा. भगवान ह्यांच्या काही चित्रपटात पार्श्वगायन केले. यात त्यांचे सहकलाकार होते, सी. रामचंद्र.त्याच वेळेस त्यांनी मो. रफी, मन्ना डे, शमशाद बेगम या सारख्या आघाडीच्या गायकांसोबत सहगायन केले. पुढे मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी.
लावणी गायन
सांभाळ
गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत
लाखाची" ही लावणी सुलोचना चव्हाण लहानपणी वारंवार गुणगुणत असत आणि त्यासाठी
आईकडून त्यांनी भरपूर ओरडाही खाल्ला होता.मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे त्याकाळी मत होते. आचार्य अत्रे यांच्या
"हीच माझी लक्ष्मी" या चित्रपटात त्यांनी पहिली लावणी गायली. ही लावणी हंसा वाडकर यांच्यावर
चित्रित करण्यात आली होती.संगीत वसंत देसाई यांचे होते. "मुंबईच्या
कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी..." हे त्या लावणीचे बोल होते.पुढे
“लावणी सम्राज्ञी" हा किताब त्यांना आचार्य अत्रे यांनीच दिला.नंतर “कलगीतुरा”
ह्या चित्रपटासाठी त्या काही गाणी गायल्या. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक शमराव चव्हाण यांच्याशी त्यांचे लग्न झाले. गीतकात
जगदीश खेबुडकर यांच्या "नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे
कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची" या गाण्याने
त्यांचे आयुष्यच बदलून गेले.
सुलोचना चव्हाण यांना १९६५ साली
"मल्हारी मार्तंड" या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र राज्याचा
पुरस्कार मिळाला. त्याहीपलीकडे जाऊन विविध स्तरावर त्यांनी गायलेल्या गाण्यांनी
आणि विशेषतः लावण्यांनी त्यांना जनमानसांच्या हृदयात मानाचे स्थान मिळाले आहे.
सुलोचना चव्हाण यांची काही गाजलेली गाणी:
१. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची
२. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं
३. पाडाला पिकलाय आंबा
४. फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला
लागंल कोल्हा
५. कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
६. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं
कोना माझ्या चोळीचा
७. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते
खरं हाय का?
८. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला
नेसव शालू नवा
९. गोरा चंद्र डागला
१0. मला म्हणत्यात पुण्याची मैना
११ लई लई लबाड दिसतोय ग
पुरस्कार आणि सन्मान
१. महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार “मल्हारी मार्तंड” चित्रपटातील पार्श्वगायनाकरिता.
२. महाराष्ट्र सरकारचा संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी “लता मंगेशकर” पुरस्कार.
३. मार्च,२०२२ मध्ये पद्मश्री हा शासनाचा चतुर्थ
सर्वोच्य नागरी पुरस्कार.
मृत्यु
अशा या वेगळ्या धाटणीच्या आणि स्वतःचा अमिट असा ठसा उमटविलेल्या गायिकेने मागच्याच वर्षी १० डिसेंबर ला मुंबई येथे जगाचा निरोप घेतला.
आज त्यांच्या 91 व्या जयंती निमित्त त्यांना माझा
मानाचा मुजरा.
फोटो सौजन्य :- https://en.wikipedia.org/wiki/Sulochana_Chavan
प्रसाद नातु,पुणे.
Lavni samradnyi.Sulochana Chavhan .ANANT
ReplyDeleteविनम्र श्रद्धांजलि🌺🌺
ReplyDelete