मित्रांनो,
कधी कधी
मनुष्य छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकून जातो आणि कधी कधी छोट्या छोट्या
गोष्टी मनुष्याला स्वतःला कठोर म्हणणाऱ्या माणसाला भावनिक बनवितात. सध्या मी विदर्भात
आलोय. खरं तर हा विदर्भ दौरा मी सेवानिवृत्ती नंतर यावे अशा इराद्याने ठरविला
होता. पण त्या वेळी कोरोंनाने थैमान घातले आणि man proposes and god disposes चा अनुभव घेतला.आता जवळपास पावणे
तीन वर्षानंतर तो दौरा प्रत्यक्षात उतरला.कदाचित समृद्धी महामार्गाची वाट पहात
असेल. समृद्धी महामार्गाने खरोखर नागपूर जवळ आल्याचे जाणवले.अवघ्या 9
तासात,त्यातले साडेचार तास पुणे औरंगाबादला लागले, नागपूरला पोहोचलो.
अमरावतीस मित्राच्या मुलाच्या लग्नाला
18 ला
माझ्या एक घनिष्ठ मित्राच्या मुलाचे लग्न अमरावतीला होते. त्यासाठी राष्ट्रीय
महामार्ग नंबर 6 ने अल्पावधीत अमरावतीस पोहोचलो. माझ्या नोकरीच्या अगदी
सुरुवातीच्या काळातील मित्रांच्या भेटीने जुन्या आठवणी जागवल्या. “गेले ते दिन
गेले’ हे गाणे ओठांवर तरळून गेले. आताच्या पेक्षा लोक एकमेकांच्या किती निकट होते,
ते तसे दिवस पुनः येणे नाही.ह्या बाबतीत कधी
काळी एखाद्या विषयासंबंधात चर्चा
झाल्यावर एकमत न होणाऱ्यांचे आज चक्क एकमत झाले होते.नव्या युगातील मोबाईल मात्र
भाव खाऊन गेला.कारण मित्रांचे हे असे एकत्र येणे सेल्फीने सेव केले, कॅमेराबद्ध केले.
अमरावती ते वर्धा प्रवास
पुण्यापासून
निघून जवळपास 850 किमी प्रवास छान झाला होता. रस्ते आजकाल खूप छान झालेत असे मत
झाले असताना,आम्ही येतांना चांदूर रेल्वे मार्गे वर्ध्याला यायला निघालो. तळेगाव
(द) पर्यन्त प्रवास छान सुरु होता आणि अचानक खड्डे दिसू लागले.अतिशय खराब रस्ता कदाचित
चांगल्या रस्त्यांना दृष्ट लागू नये म्हणून ठेवल्यासारखा.त्याने कारचे टायर पंक्चर
झाले.अगदी बसलेच इतका मोठा खड्डा. 6-6.15 ची वेळ. अंधार पडलेला.रोडच्या बाजूला कार
उभी करावी तर जागा दिसेना. एक टायर लटकविलेले दुकान दिसले, तिथे कार उभी केली.
रस्त्यावर दोन्ही बाजूने वर्दळ खूप होती पण कामाचा कुणीच नव्हता.अगदी मुकेशचे गाणे
“है भीड इतनी पर डील अकेला” आठवून गेले.
प्रवासात विघ्न
अंधारात अचानक
लक्ष समोरच्या पेट्रोल पंप कडे गेले. कार कशी बशी तिथपर्यन्त नेली. तिथे एक 20-22
वर्षाचा तरुण मुलगा खुर्चीवर बसून होता. येणाऱ्या जाणाऱ्याला पेट्रोल भरून देत
होता. त्याला म्हटले जरा मदत करतोस कां? तो लगेच तयार झाला. डिक्कीत सामान बरेच
होते. ते मागच्या सीटवर ठेवले आणि स्टेपनीचे टायर बाहेर काढले. चाकाचे स्क्रू, फिट
करण्याच्या मशीनने घट्ट केलेले असल्याने जरा वेळ लागत होता. त्यात तो मधेच
त्याच्या ग्राहकांना पेट्रोल भरून देत होता. मधेच स्क्रू ढिले करीत होता.मधे मधे त्याचे
जे मित्र पेट्रोल भरायला,त्यांची गाडी घेऊन आले होते,ते देखिल स्क्रू ढिले करायला
मदत करीत होते. त्या टायरला ढिले करण्यासाठी असंख्य हात लागले होते. एक सवा तास तो
तरुण मुलगा अशी दुहेरी कसरत करीत होता.शेवटी चाक निघाले,त्याने दुसरे चाक लावले.एक
दीड किमी वर असलेल्या पेट्रोल पंपावर,पंक्चर सुधरवून घ्या असे म्हणत तो आपल्या
कामाकडे निघाला.
माणुसकीचा परिचय
तो जात असतांना मी त्याला आवाज देऊन बाजूला बोलविले.कृतज्ञतेपोटी रु. 500/- देऊ केले.त्याने मोठ्या विनम्रतेने नकार दिला आणि म्हणाला तुमच्या सारख्यांची सेवा करायला मिळावी,ह्या साठीच माझी रात्रीची ड्यूटी ही योजना असावी कदाचित.शहरात जिथे जवळचे सुद्धा परक्यासारखे वागतात.तिथे इतकी निर्व्याज माणुसकी माझ्या नकळत माझे डोळे पाणावले. मनात आलं अजूनही माणुसकी जीवंत आहे.निघता निघता त्याचे नांव विचारायला मी विसरलो नाही,पण त्याचा फोन नंबर विचारायचा राहिला,ह्याची खंत लागून राहिली आहे.
प्रसाद नातु, पुणे
Manuski Ani sahahridayata Arun jiwamt ahe
ReplyDelete