मित्रांनो,
कालचे माझे ब्लॉग पेज “इस्त्रीचे कपडे की चेहरा?" ला आपण उदंड प्रतिसाद दिलात. या बद्दल खरं तर आपल्या सगळ्यांचे मला आभार मानायचे होते. म्हणून आजचे हे ब्लॉग पेज लिहितोय. त्याच सोबत आणखी एक कारण घडलं. त्या विषयी लिहावे वाटले. आज बऱ्याच दिवसांनी माझी बँक, बँक ऑफ इंडियाला गेलो होतो. माझ्या सोबत ज्यांनी कामं केलं, असे फार कमी स्टाफ सदस्य तिथे आहेत. काहींचे प्रमोशन तर काहींची ट्रान्सफर यामुळे बदलून गेलेत. माझा नुकताच साहित्यातील योगदानाबद्दल कॉसमॉस बँक आणि ग्रीन वर्ड पब्लिकेशन तर्फे सन्मान करण्यात आला. त्याबद्दल माझे सर्वांनी अभिनंदन केले.सर्वांना नाही येतं लिहिता, ही एक कला आहे,असेही काही जणांचे मत पडले. पण कसे लिहावे या बद्दल तुम्ही काही टिप्स आम्हाला देऊ शकाल कां? अशी विचारणा ही केली. मला खूप आनंद झाला की, माझ्या सहकाऱ्यांमध्ये कमीतकमी लिहिण्याची इच्छा झाली.
मी त्यांना सांगितले की, यासाठी तुम्ही काही वाचायला हवे. पुस्तकं घेऊन वाचायला हवीत. हे सांगतांना मी त्यांना हे देखिल सांगितले, कि ठिक आहे. वेळ मिळतं नाही हे खरे आहे. पण आपली बँक विविध सर्क्युलर, वेगवेगळ्या पॉलिसी जारी करीत असते. हे सर्व जर वाचलेत तर त्यातून दोन उद्देश सफल होतील. पहिला हा, की तुम्ही काही तरी वाचाल, त्याने वाचायची सवय होईल. दुसरा हा की विविध सर्क्युलर, वेगवेगळ्या पॉलिसी वाचल्याने, तुमचे बँकेतील कार्यासंबंधीचे ज्ञान वाढेल. ज्याचा तुम्हाला दैनंदिन कामकाजात उपयोग होईल. हे वाचून झाल्यावर त्या संबंधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, उदाहरणार्थ लंचच्या वेळेत सोबत असता, 30 मिनिटातले 10 मिनिटे,त्यावर चर्चा करा. हयातून व्यक्त होणे शिकता येईल. एकदा व्यक्त होता आलं की मग लिहिता येईल.ते त्यांना पटलं.
दुसरे एक मला वाटतं, जे फेसबूकवर आहेत. त्यांना देखिल खूप वाचायला मिळतं असतं.कुणी आपले वेगवेगळे जीवनविषयक अनुभव पोस्ट करतो. कुणी आपल्या पर्यटनाची माहिती पोस्ट करतो. कुणी काही तरं कुणी काही. अशा चांगल्या पोस्टवर 90% लोक लाइक टाकून मोकळे होतात. हे लाइक तर इतके विचित्र आहे की कुणाचे कुणी मेले आहे तर आम्हाला “भावपूर्ण श्रद्धांजली” लिहायला वेळ नसतो. आपण Like करून मोकळे होतो. कुणाचे मरण Like करण्याइतके आपण संवेदनाहीन झालोत कां?
चांगली पोस्ट वाचली की त्या पोस्टवर आपल्या मनातले चार शब्द लिहिलेत, व्यक्त झालात तर खूप फरक पडेल. माणूस आपल्याला काही शारीरिक त्रास किंवा मानसिक त्रास होतोय, नोकरीच्या जागी घुटन होते आहे, चांगले कामं करून appreciation नाही. ह्या गोष्टी अगदी आपल्याला संसारातील जोडीदाराला सांगत नाही. या पायी मानसिक रोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. मन ठिक असेल, तर शारीरिक व्याधीवर मात करता येईल. पण मनच ठिक नसेल तर? माझे एक झोनल मॅनेजर होते. श्री.एस. एल. करंदीकर. एक वेगळच व्यक्तिमत्व.ते म्हणायचे तुम्हाला डायबेटीस आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे. तुमच्या बाजूला बसलेल्या स्टाफला माहित असायला हवे. शारीरिक आजार आहे त्याचा स्वीकार करा,त्याचा कमीपणा बाळगू नका. उद्या अकस्मात तुम्हाला बँकेत असतांना काही झालं, तर घरचे लोक येईपर्यंत, डॉक्टरकडे ॲडमिट केल्यावर, तुमच्या सहकाऱ्यास सांगता यायला हवे, की तुम्हाला काही व्याधी आहेत का? जेणेकरून डॉक्टरांना तुमच्या उपचाराची दिशा ठरविता येईल.
इंटरनेटमुळे जग भलेही जवळ आले असेल,पण माणसं दुरावलीत. हे फारसे चांगले लक्षण नाही. माणसांमधला संवाद संपत चालला आहे. संवाद संपल्यामुळेच व्यक्त होता येण अशक्य झाले आहे. ज्या मानसिक रोगांची आपल्याला माहिती नव्हती, ते मानसिक रोग होऊ लागलेत “मन चंगा तो सब कुछ चंगा” हे लोप पावत चाललयं. मित्रांनो खरंच विचार करायला हवा आहे आणि तेही परिवारातील सर्वांनी एकत्रित बसून.
आपल्या प्रतिक्रिया कृपया कमेंट बॉक्स मधे लिहा किंवा माझा मेल आयडी pknatoo25360@gmail.com आहे. त्यावर निश्चित कळवा.
प्रसाद नातु, पुणे.
88888 18589
Comments
Post a Comment