मित्रांनो,
चाळीसगावला
पहिली ते पाचवी,अशी पाच वर्षे शिकलो.ह्याच काळांत बऱ्याच घटना घडल्या.त्यातील एक
म्हणजे,माझा धाकटा बंधु श्रीनिवासचा जन्म झाला.त्या वेळी सुतिका गृह वगैरेच्या
सोयी लहान गावात नसायच्या.घरीच सुईणीला बोलावून घेत असतं.दुसरी महत्वाची घटना
म्हणजे, कोयना नगरचा भूकंप.आधी दारांना कड्या असायच्या,त्या कड्या कोंडयात अडकवून
त्याला कुलूप लावले जाई.11 डिसेंबर 1967 च्या पहाटे अचानक दाराच्या कड्या अचानक
वाजू लागल्या.माझे वडील आबासाहेब,सर्वात आधी उठले आणि दरवाज्याकडे धावले.चोर असेल
का? अशी शंका त्यांच्या मनाला शिवली देखील नव्हती.तर त्यांच्या डिपार्टमेंटला काही
प्रॉब्लेम झाला तर नसेल ना,म्हणून कुणी बोलवायला आले असेल.बराच वेळ कड्या
वाजलेल्या मी ऐकल्या आणि पाहिल्या.स्वयंपाकघरांत कपाटांत लावून ठेवलेले
डब्बे,भांडी सारेच खाली पडले होते.आता सारखी त्या वेळेस प्रसार माध्यमे नव्हती.
प्रसार माध्यम एकच तो म्हणजे रेडियो.आबासाहेबांनी मला ऑर्डर केली.“राजा, पटकन
रेडियो लाव. रेडियोवर न्यूज सुरू होत्या.
कोयना
धरण प्रकल्पाजवळ भूकंप झाला होता.पावणे दोनशेच्या वर लोक मृत्युमुखी पडले होते आणि
दोन हजाराच्यावर जखमी झाले होते. जवळपास 450 ते 475 किमी वर असणाऱ्या चाळीसगांवला,आम्हाला
एवढा धक्का जाणवला होता.तर तिथे कोयनानगरच्या लोकांचे काय हाल झाले असतील. ह्या
विचाराने आई त्रस्त झाली होती.माझे बालमन रिष्टर स्केल वगैरे समजण्याच्या पलीकडे
होते.दुसऱ्या दिवशी लोकसत्तात पहिल्याच पानावर मोठी बातमी आणि नुकसानीचे फोटो आले
होते.ते पाहून माझे बालमन देखील हेलावले होते.
भोंगे
हा एक टिपिकल प्रकार होता.1964 ला पंडित नेहरू गेले. तेव्हा भोंगा 10 मिनिटे चालू होता.1965 ला भारत
पाकिस्तान युद्धाच्या वेळी सगळी कडे ब्लॅक आउट होण्याच्या आधी,भोंगा 10 मिनिटे
चालू होता.ह्या युद्धात आपल्याला विजय मिळाला होता आणि त्यात 1966 साली आपले
पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ह्यांचे आकस्मिक निधन झाले होते. शास्त्रीजी “जय
जवान जय किसान” मुळे बऱ्या पैकी ओळखीचे झाले होते.भोंगा जास्त वेळ वाजणे म्हणजेच
काही तरी विपरीत घडले आहे. हे थोडे थोडे समजायला लागले होते.
अखेर
1969 साल उजाडलं होतं.मी पाचव्या वर्गात होतो.आता बऱ्या पैकी समजायला लागलं होतं.मी
सरस्वती बाल मंदिर ज्यात फक्त प्राथमिक शिक्षण दिले जायचे,ती शाळा सोडून,चाळीसगांवांतील
प्रतिष्ठित ए. बी. हायस्कूल अर्थात आनदीबाई बंकट हायस्कूलला प्रवेश घेतला. 1969 हे
वर्ष मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा
गांधी ह्यांचे जन्म शताब्दी वर्ष. गांधी जयंतीला पूर्ण गावातून आमची प्रभात फेरी
निघाली होती.वर्ष भरच त्याची रंगीत तालिम सुरू होती.माझा आवाज चांगला वाटल्याने
येवले सरांनी, “उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया” हे गाणं म्हणावयांस
लावले. मी आधी म्हणायचो, बाकी सारे माझ्या मागे म्हणतं असतं.मी गायलेले हे पहिले
गाणे.
1969
ची आणखी एक घटना,माझ्या चांगली स्मरणात आहे.ती म्हणजे तित्तुर आणि डोंगरीचा पूर.चाळीसगांव
हे तित्तुर आणि डोंगरीच्या संगमावर वसलेले गांव आहे.जुने आणि नवे चाळीसगाव शहर
यातून तित्तुर नदी वाहते.तित्तुर डोंगरीला मिळते आणि मग ही नदी पुढे गिरणेला आणि
गिरणा तापीला. 1969 ला खूप पाऊस झाला.आमचे घर मिल कंपाऊंड मधे होते.जे गावापासून
दूर असल्याने काहीच खबर बात मिळत नसे.मी शाळेत गेलो.सगळीकडे पाऊस खूप झालेला होता.
शाळेच्या मोठ्या पटांगणात देखील भरपूर पाणी साचलेले दिसले. शाळेचे सगळे दरवाजे बंद
होते.बाहेर एक बेल वाजविणारा चपराशी उभा होता.मी त्याला विचारले की, “आज शाळा बंद
का आहे?” तर त्याने मलाच उलटे विचारले, “कुठून आलास रे तू? “ मी म्हटलं,
“टेक्सटाइल मिल मधून.” तो म्हणाला म्हणूनच असे विचारतोस.तो पुर्णपात्रे डॉक्टरचा दवाखाना दिसतो ना, तिथे जाऊन बघ.मी
जसजसा त्या दिशेने जाऊ लागलो. तसे लक्षांत आले की, तित्तुर अगदी दुथडी भरून वहात
होती.जुने आणि नवे शहर जोडणारा पूल पाण्याखाली गेला होता. तिथे अचानक येवले सर
भेटले.ते म्हणाले की, “मुख्याध्यापक जुन्या शहरांत रहातात आणि शाळेच्या किल्ल्या
त्यांच्या कडे आहेत.त्यामुळे शाळेला आज सुट्टी.” त्या पुरात एकाने आपला घोडा
टाकल्याचे अजूनही आठवतंय.”
मी
पाचवी झालो आणि आमचे चाळीसगाव सुटले.आजच्या सारखे तेंव्हा मोबाईल व्हॉटस अप,
फेसबूक नव्हतं. नाही तर आज माझ्या फ्रेंड लिस्ट मधे शंभरेकची भर पडली असती.2011 ला
पश्चिम महाराष्ट्रात आल्यावर तर राहून राहून वाटत की त्यातील कुणी माझ्या समोर
सहकारी, बॉस किंवा अगदी बँकेचा ग्राहक बनून भेटूनही गेला असेल,अन मी त्याला आणि तो
मला भेटून देखील गेला असेल पण एक अनोळखी बनून.
प्रसाद नातु

Nicely written. I hope the extension of this blog will culminate into a new book.
ReplyDeleteI have recalled now that the buzzer played for 10 minutes and the atmosphere was very sad for 2-3days on Shastrijis demise
ReplyDelete