मित्रांनो
चाळीसगाव सुटलं. तसा मी ही आपला प्रवास किशोरवस्थेकडे
सुरू केला होता.आमच्या ध्यानी मानी नसतांना आबासाहेबांना सिकंदराबादच्या डी.बीआर.मिल्स कडून नोकरीची ऑफर आली.ते
इंटरव्ह्यु साठी गेले अन तिकडे कामावर रुजू झाले.आबासाहेब आता डी.बीआर.मिल्स, सिकंदराबाद
येथे नोकरीला लागले होते.1970 साली रु.1200/-पगाराची नोकरी म्हणजे गंमत
नव्हती.हैदराबाद आणि सिकंदराबादच्या मधोमध, टॅंक बंद रोडच्या समोर, डी.बीआर.मिल्स
अर्थात दिवाण बहादूर रामगोपाल मिल्स. विस्तीर्ण पसरलेला हुसैन सागर अगदी समोर
होता.त्यात एक रोटरी पार्क होता. डी.बीआर.मिल्स.ही सिकंदराबाद आणि हैदराबादच्या
सीमा रेषेवर होती. कवाडीगुडा हे त्या भागाचे नांव जिथे ही मिल होती.घरातून टॅंक
बंद रोडची ट्राफिक दिसत असे.
चाळीसगाव
सारख्या लहान गावातून एकदम हैदराबाद-सिकंदराबाद सारख्या मोठ्या गावात रहायला जाणे.एक
चॅलेंज होतं हे. हैदराबाद आता इतके मोठे नसले तरी जवळपास 350 वर्षाचा इतिहास आणि
एकेकाळी निझामाची राजधानी असलेले शहर होते.हैदराबाद आणि सिकंदराबाद ही जुळी शहर. आपल्या
फॅमिली शिवाय इतर सारे तेलुगू बोलणारे.तसं हैदराबाद मधे निझामाचे राज्य असल्याने
हिन्दी बरेच लोक बोलत असतं.आम्हाला सिकंदराबाद हैदराबादच्या मानाने जवळ होतं आणि जवळचं
वाटायचं ह्याच कारण ते हैदराबाद पेक्षा थोडे छोटे असल्याने आमची कम्फर्ट लेवल जरा जास्त.सगळी कडे बसने जावे
लागत असे. रोटरी क्लबच्या स्टॉपहून आम्ही जात असू.
हळूहळू
सिकंदराबाद स्टेशन कडे जाणारे सगळे महत्वाचे स्टॉप माहित झाले होते.मी 11 वर्षाचा
पूर्ण झालो होतो.कवाडीगुडा, राष्ट्रपती रोड, जेम्स स्ट्रीट,paradise स्टॉप, Minerva टॉकीज हे स्टॉप होते.भाजी बाजार
म्हणजे मोंढा.तो राष्ट्रपती रोडने थेट शेवट पर्यन्त चालत गेलं की लागत असे किंवा
रेल्वे स्टेशन वरुन ही जवळ होता.आबासाहेबांना फिरण्याची फार हौस. त्यामुळे ते,आई
आणि आम्ही तिघे भाऊ,कधी कधी तर ताई देखील,अशी सर्कस घेऊन बाजारात जात असतं. मला
कधी कधी आश्चर्य वाटायचं की आम्ही तिघाही भावांनी महाराष्ट्राची राजधानी मुंबई
नंतर पाहिली,पण आंध्र प्रदेशची आधी.
मग
आम्हाला शाळेत टाकायची वेळ आली.मराठी शाळा ही सुलतानबझार ह्या हैदराबाद मधील
एरियात होती. त्या एरियात मराठी बोलणाऱ्यांची संख्या अधिक होती. विवेक वर्धिनी
एज्यूकेशन सोसायटी च्या दोन शाळा होत्या.एक होती,डॉ.डावरे स्कूल,जी प्राथमिक शाळा
होती,म्हणजेच 1 ली 4 थी करिता आणि 2 री होती.राधाबाई पळनीटकर हायस्कूल असे नांव होते त्या शाळेचे,जी 5 ते 10 वी पर्यन्त होती.मी
6 वी पास असल्याने मला अर्थातच राधाबाई पळनीटकर हायस्कूल मधे प्रवेश मिळाला.तर
मिलिंदला डॉ.डावरे स्कूलला चौथ्या वर्गात प्रवेश मिळाला. दोन्ही शाळा एकाच परिसरात
होत्या.
7
व्या वर्गात घडलेल्या दोन घटना मी सांगणार आहे.पहिली म्हंजे 1 ऑगस्ट हा दिवस,तेव्हा
लोकमान्य टिळकांची जयंती होती.हैदराबादेतील शाळेत ती शाळा मराठी असल्याने ही जयंती
साजरी केली जात असावी.मी शाळेत नवा असल्याने माझे नांव काही भाषण देणाऱ्यांच्या
यादीत नव्हते. 7-8 मुले टिळकांबद्दल बोलली.पण इतरांच्या ज्ञानात विशेष भर पडल्याचे
जाणवले नाही.मी स्वतःहून माझ्या क्लास टीचरना जाऊन सांगितले,की मला बोलायचे आहे.ते
ठीक आहे म्हणाले.एक विद्यार्थी भाषण देत होता,त्या नंतर तू बोल असे त्यांनी मला
सांगितले.त्याचे भाषण संपल्यानंतर सरांनी ह्या वर्षी नुकताच शाळेत आलेला प्रसाद
नातु ह्यास मी भाषणासाठी बोलावित आहे,असे म्हटले.
मी भाषणास उभा राहिलो.मी काय काय
बोललो हे आज शब्दशः जरी आठवित नसले तरी,मी सुरुवात ह्या वाक्याने केली होती.माझ्या
आधी बऱ्याच मित्रांनी भाषण दिले.पण त्यांच्या भाषणावरून टिळकांनी जन्मभर शेंगा
खाल्या,पण टरफलं मात्र उचलली नाहीत असा ग्रह होईल.“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध
अधिकार आणि तो मी मिळविणारच” हे कुणी म्हटलं, टिळकांनी. मराठा आणि केसरी ही दैनिके कुणी सुरू
केली,टिळकांनी.“भारतीय असंतोषाचे जनक कुणाला म्हटले जाते, टिळकांना. मंडालेच्या तुरुंगात “गीतारहस्य” हा ग्रंथ कुणी लिहीला,
टिळकांनी.असे बरेच काही बोललो.मला आठवतंय माझ्या मुख्याध्यापकांनी जवळ घेऊन माझी पाठ
थोपटली होती.बरेच शिक्षक आणि पालक देखील माझ्या आजूबाजूला जमा झाले होते.त्यांना
मी सांगितले की मी महाराष्ट्रातून आलोय,म्हणून मला हे माहित आहे.मला नाही वाटत की
आज महाराष्ट्रातील किती मुलांना हे माहित असेल.कारण गूगल वर सर्च केले तर 1 st
August इज celebrated as फ्रेंडशिप डे असे
आले.अधिक खोल सर्च केल्यावर पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे आहे असे येते.हा
संस्कृतीचा ऱ्हास नाही तर काय
म्हणायचे मित्रांनो ह्याला.
दूसरा प्रसंग असा की,आम्हा दोघांना
आमच्या घरून आम्हाला शाळेत आजमय्या नावाचा रिक्शावाला कम गिरणी कामगार रोज सोडून
देत असे.घरापासून शाळेचे अंतर हे जवळपास 6.5 किमी एवढे होते.आजकाल 6.5 किमी विशेष
नाही.पण तेव्हा घरापासून शाळा साधारणतः 1 किंवा 1.5 किमी असायची.तो काही मेन रोड
ने जात नसे. तो कुठल्याशा गल्ल्या बोळातून नेत असे. शाळा सुटायच्या 10 मिनिटे आधीच
तो येऊन उभा रहात असे.आज शाळा सुटली आणि अर्ध्याच्यावर तास होऊन गेला होता.पण तो आला
नव्हता.शाळेच्या जवळ सुलतानबाजार रोडवर,एका मराठी माणसाचे दुकान होते.मंगल स्टील भांडार
असे नांव होते.माझ्या वडिलांनी त्यांच्याशी ओळख करून दिली होती.त्यांना सांगितले. त्यांनी
डीबीआर ला फोन लावायचा प्रयत्न केला.फोन यंत्रणा आता एवढी स्ट्रॉंग नव्हती.
आम्ही त्यांना सांगून ठेवले आणि निघालो.जीवनातल्या
एका पहिल्याच दूरच्या पायी सफरवर.मी मघा म्हटलं की आबासाहेबांना
पायी चालण्याचा भारी षौक.त्यामुळे आम्ही ह्या चॅलेंज साठी तयार होतो.रस्ता आठवण महत्वाचे
होते.परत येतांना कुठे बूक स्टॉल,कुठे मटन शॉप मधे बकऱ्यांचे सांगाडे लटकलेले, कुठे
चिकन शॉप मधे कोंबड्याचे ओरडणे,तर कुठे मॉडर्न ब्रेड ची मोठी जाहिरात,कुठे मशीद, कुठे
रस्त्याच्याच बाजूला थडगे ह्या सगळ्या आठवणीच्या खुणांच्या सहाय्याने आम्ही 1-1.30
तासाने परतलो.रात्र व्हायला आली होती.आईचे डोळे रडून रडून सुजले होते.घरी गेल्यावर
आधी दोघांनी आईला मिठी मारली.पायी घरी आलो तर पाय दुखत असतील,कुठे रास्ता हरविले असते
तर वगैरे खूप शंका तिच्या मनांत येऊन गेल्या.आजही ते आठवलं की वाटत की एक वेड धाडस
केले होते आम्ही. काही दिवसांतच आमच हैदराबाद सुटलं.माझ्या वडिलांनी पुनः दुसऱ्या गावाला
नोकरी धरली होती. डी.बी.आर. मिल्स खूप दिवस स्मरणांत राहिली. एकदा 1998 ला हैदराबादला
गेलो असता टॅंक बंद रोडवर गेलो होतो. तेव्हा कळले की एके काळी सिकंदराबाद आणि
हैदराबाद शहरांचे वैभव असलेली ही कापड गिरणी 1992 मधे बंद पडली ती पुनः सुरू न
होण्यासाठी.
Very memorable, and pleasing
ReplyDelete