Skip to main content

ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही? 2106

  ब्लॉग नं. 2026/1 72.   दिनांक: 21 जून, 2026.   मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...

परिमळाची धांव भ्रमर ओढी

 Blog No. 2023/70      

Date: 20th, March 2023.


मित्रांनो,

            आज संत ज्ञानेश्वर यांचा जन्मदिवस किंवा त्यांनी संजीवन समाधी घेतली तो दिवस देखिल नाही. पण मला गाणी ऐकत बसलो असता एक संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग ऐकायला मिळाला. तसे हे भजन पंडित अजित कडकडे यांनी बऱ्याच वर्षापूर्वी गायलेले.पंडितजींनी नेहमी प्रमाणेच अतिशय सुरेख गायले आहे.भजनातील अर्थाशी तन्मयता पावत अगदी समरस होऊन हे भक्तीगीत गायले आहे.

 

परिमळाची धांव भ्रमर ओढी

            हा तो संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे पंडित अजित कडकडे यांनी खूपच सुरेख गायला. पण मला त्यापेक्षा अधिक भावला तो या अभंगाचा अर्थ तो पुढीलप्रमाणे,

 

परिमळाची धांव भ्रमर ओढी

            तैसी मज लागो तुझी गोडी, भ्रमर ओढी ! १ !

 

भुंग्याला जशी सुगंधाची आवड असते,त्यामुळे तो सुगंधाकडे आकर्षित होतो,ओढला जातो.तद्वताच बा पांडुरंगा मला देखिल तुझी गोडी लागो आणि मी देखिल तुझ्याकडे आकर्षित व्हायला हवा.

 

            अवीट गे माये विटेना

            जवळी आहे परी भेटे ना  ! २ !

हे भगवंता तुझे स्वरूप अवीट आहे.म्हणजे जे कधी निस्तेज होत नाही, ज्याचा कधी वीट येत नाही, अर्थात वारंवार तुझे दर्शन घेतले तरी कधी कंटाळा येत नाही, असेच आहे. पण तू इतका जवळ  असून देखिल तुझी भेट होत नाही.

 

            तृषा लागलिया जीवनाते ओढी

            तैसी तुझी गोडी लागो या जीवा ! ३ !

तहान लागल्यावर जसा जीव पाण्याकडे ओढला जातो.अगदी तहानेने व्याकुळ होऊन पाण्याकडे धांव घेतो. अगदी तसाच मी तुझ्या दर्शनासाठी कासावीस होवो, तुझ्या दर्शनासाठी आतुर होवो.




            बापरखुमादेवीवरा  विठ्ठली आवडी

            गोडियेसि गोडी मिळोन गेली  ! ४ !

रखुमाईचा पती आणि माझा पिता असा जो तो विठ्ठल त्याची मला गोडी लागली आहे.त्याच्या दर्शनात जी गोडी आहे आणि मला जी त्याची गोडी लागली आहेत.त्या गोडीत गोडी मिसळून गेली आहे.अर्थात त्याच्या स्वरूपाशी मी एकरूप होऊन गेलो आहे,त्याच्याशी समरस झालो आहे, तादात्म्य पावलो आहे.  

 

किती सुंदर अर्थ आहे या भजनाचा. यशवंत देव यांच्या “शब्दप्रधान गायकी” या पुस्तकात त्यांनी  लिहिले आहे की गायक हा जर गीताचा अर्थ समजून गायला तर त्या गाण्यात जीव येतो. परमेशाची भक्ती ही देखिल अशीच समजून,उमजून करण्यासारखी गोष्ट आहे.आपल्याला परमेश्वर कधी दर्शन कां देत नाही. कारण आपण वरवरची भक्ती करतो मित्रांनो.हेच ह्या अभंगाच्या निमित्ताने लिहावयाचे होते. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू या, उद्याच्या ब्लॉग मधे.


 

 

प्रसाद नातु, पुणे.

 

 

                    

Comments

Post a Comment