Blog No. 2023/20
Date 24th, January 2023 .
मित्रांनो,
तुम्हाला
ती झी मराठीवरील मालिका आठवते,ज्यात स्पृहा जोशीची भूमिका खूप गाजली होती. तुम्ही अंदाज
केला असल्यास तुम्ही बरोबर ओळखलेत. “उंच माझा झोका” या रमाबाई रानडे ह्यांच्या
जीवनावर आधारित ही मालिका खूप लोकप्रिय झाली.आज रमाबाई रानडे ह्यांचा जन्म दिवस. सांगली
जिल्हयातील देवराष्ट्रे ह्या छोट्याशा गावात कुर्लेकर परिवारात 25 जानेवारी,1862 ला
त्यांचा जन्म झाला.त्या पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर.त्या काळी स्त्रियांना शिक्षण
देणे हे निषिद्ध मानले जात असल्याने,त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकविले नाही. त्यांचा
केवळ 11 व्या वर्षी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह लावून देण्यात
आला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे लग्नाच्या वेळेस विधुर होते आणि भारतातील सामाजिक
सुधारणेचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती. घरातील इतर स्त्रियांचा विरोध पत्करून त्यांनी
रमाबाईस शिकविण्याचे ठरविले.रमाबाईंना सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेसाठी आपली मदतनीस
म्हणून बनविण्यासाठी मदत केली. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे पुढे जाऊन रमाबाईंनी
आपले सर्व आयुष्य महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनविण्यात खर्च केले.
न्यायमूर्ती रानडे यांनी तरुण रमाबाईंना मराठी,इतिहास,भूगोल, गणित आणि इंग्रजी लिहिण्याचे
आणि वाचण्याचे धडे दिले.
रमाबाईच्या कार्याचा प्रारंभ
नासिक हायस्कूल
मधे रमाबाईंनी प्रथमच प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली.न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी
त्यांचे भाषण लिहून दिले होते.त्या नंतर त्या मुंबईत प्रार्थना समाजासाठी कार्य करु
लागल्या.त्यांनी मुंबईत महिला आर्य समाजाची शाखा स्थापन केली. 1893 ते 1901 ह्या काळांत
त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या.त्यानंतर त्यांनी
हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी कलोबची स्थापना करून महिलांना भाषा,सामान्य ज्ञान,टेलरिंग
आणि हातकामाचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक वर्ग सुरु केले.
न्यायमूर्ती रानडे यांच्या मृत्यु पश्चातचे जीवन
1901 ला न्यायमूर्ती रानडे यांचे निधन झाले.पतीच्या मृत्युनंतर
त्या मुंबई सोडून पुण्यास आपल्या वडीलोपार्जित घरात येऊन राहिल्या.एक वर्ष स्वतःच लादलेल्या
विजनवासानंतर त्या बाहेर पडल्या.पतीचे स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेचे काम त्यांनी
आपल्या शिरावर घेतले.1904 मधे भरलेल्या भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सत्राचे त्यांनी
अध्यक्षपद भूषविले.स्त्रियांचे सामाजिक प्रबोधन,निवारण, अडचणीत असलेल्या महिलांच्या
पुनर्वसनासाठी 1909 मधे त्यांनी “सेवा सदन” सारखी सामाजिक संस्था स्थापन केली.1915
ला त्याची नोंदणी झाली.सेवा सदनने जुन्या शैक्षणिक विभागांचा विस्तार करून नवीन विभाग
सुरु केले.त्यांनी एक महिला प्रशिक्षण महाविद्यालय,तीन वसतीगृहे विकसित केली.त्यापैकी
एक वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरे परिविक्षाधीन परिचारिकांसाठी.
विशेष सामाजिक कार्ये
मध्यवर्ती
कारागृहात, विशेषत: महिला विभागाच्या त्या नियमित अभ्यागत
होत्या.तुरुंगातील कैद्यांमध्ये स्वाभिमान जागृत करणे.सुधारगृहातील मुलांना भेट देऊन
त्यांच्याशी बोलणे आणि सणासुदीच्या प्रसंगी त्यांना मिठाई वाटणे इत्यादि त्या करीत
असत.त्या नियमितपणे स्थानिक रुग्णालयांमध्ये रुग्णांना भेट देत, फळे, फुले आणि पुस्तकांचे वाटप करत.1913 मध्ये त्या गुजरात आणि
काठियावाडमध्ये दुष्काळग्रस्त लोकांसाठी मदत करण्यासाठी गेल्या होत्या.त्यांच्या आयुष्याच्या
शेवटच्या वर्षांतही,आषाढी आणि कार्तिकी मेळ्यांच्या वेळी त्या
सेवा सदनच्या स्वयंसेवकांसह संत ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला
यात्रेकरूंना मदत करण्यासाठी,त्या आळंदीला
गेल्या होत्या.हा उपक्रम हाती घेऊन त्यांनी महिलांसाठी एका नव्या प्रकारच्या
समाजसेवेची पायाभरणी केली.1921-22 मध्ये त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये
महिला मताधिकार चळवळीची संघटना स्थापन केली.1920 मध्ये
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीच्या शिखरावर असताना रमाबाईंनी
कापसाचा चरखा कसा चालवायचा हे देखील शिकले.
अखेरीस
1924 साली रमाबाईंचे वयाच्या 62
व्या वाढदिवसाला निधन झाले.अशा या स्त्रियांच्या सुधारणा,त्यांचे सामाजिक उत्थान आणि प्रगती साठी जीवनभर झटणाऱ्या
ह्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वास त्यांच्या 160 व्या जयंती आणि 98 व्या पुण्यतिथि निमित्त माझे लाख लाख प्रणाम.
प्रसाद नातु,पुणे.
विनम्र अभिवादन🙏🌺🌺
ReplyDeleteरा. रा. जोशी
True social reformer
ReplyDelete