ब्लॉग नं.2025/044
दिनांक: 13 फेब्रुवारी,2025.
मित्रांनो,
प्रयागराजचे स्नान आटोपल्यावर,तिथे असलेल्या प्रचंड गर्दीमुळे
आणि प्रत्येक ठिकाणी पायी पायी चालत जावे लागत असल्याने,आम्ही प्रयागराजला इतरत्र फिरू
शकलो नाही. आणि हा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. In fact,बरेच
लोक केवळ स्नान आटोपून आपापल्या घरी निघाले होते.पण आम्ही इतक्या दूर आल्यासारखे अयोध्या
आणि वाराणसीला जाऊन येऊ असा विचार करून गेलो होतो. त्यामुळे आम्ही प्रयागराज कडून अयोध्येला
निघालो. प्रयागराज ते अयोध्या हे अंतर केवळ 164 किमीचे,हे अंतर कापण्यासाठी नियमित
मार्गाने गेल्यास सध्या 4.15 तास लागतात. पण अयोध्येला जाणारी गर्दी वाढल्याने,आम्हाला
नियमित मार्ग म्हणजे प्रयागराजहून प्रतापगढ आणि सुल्तानपुरहून जाता न आल्याने जौनपूर,
सुल्तानपुर या 254 किमीच्या दूरच्या मार्गाने जावे लागले.जे अंतर कापण्यास हेवि ट्रॅफिकमुळे
आम्हाला 8 ते 9 तास लागले.अयोध्येतील श्रीराम दर्शन यावर आजचा ब्लॉग.
सविस्तर:
शेवटी
तो दिवस उगवला होता.प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्राच्या वाटेला जरी 14 वर्षाचा वनवास
भोगावा लागला होता.पण अयोध्येच्या मंदिरात प्रवेश करायला मात्र प्रभू श्रीरामचंद्राला
500 वर्षे वनवास भोगावा लागला.अखेर मागील वर्षी, प्रभू श्रीरामचंद्राने अयोध्येच्या
मंदिरात प्रवेश केला.तेव्हापासून माझी इच्छा होती की,अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरात
जाऊन त्याचे दर्शन घ्यावे.6 फेब्रूवारी 2025, माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मिरणीय दिवस. लहानपणापासून
ज्याला आदर्श मानून जिवन जगत आलो,त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री
रामचंद्र यांचे दर्शनाचा योग अगदी समीप येऊन ठेपला होता.
मंदिराकडे जाणारा रस्ता दुतर्फा गर्दीने अक्षरक्ष: वहात होता.
“जय श्रीराम, जय जय श्रीराम” चा जयघोष अविरत सुरू होता.मंदिरात पोहोचवयास किती वेळ
लागेल,हे कुणी विचारत नव्हता.एवढ्या गर्दीत ढकला ढकली न करता, लोक केवळ जयजयकार करत
होते. किती चालावे लागेल यापेक्षा आमच्या लाडक्या रामलल्लाचे दर्शन कधी होईल,याची उत्कंठा
सर्वांनाच लागली होती.आपले मौल्यवान साहित्य,मोबाईल, ATM कार्ड तसेच स्मार्ट वॉच देखिल,मंदिराने उपलब्ध
करून दिलेल्या लॉकरमध्ये ठेवायचे होते.चपला,जोडे ठेवायची मोफत व्यवस्था होती.एवढी मोठी
गर्दी,सुमारे 20 लाख भक्तांनी त्या दिवशी दर्शन घेतले असूनही सर्व पद्धतशीरपणे सुरू
होते. इतकेही करून कुणी गर्दीत हरवलाच तर त्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज होती,वारंवार
announcement होत होती.संथ लयीने रांग पुढे पुढे सरकत होती.
आता “जय श्रीराम, जय जय श्रीराम” चा जयघोष अधिक तीव्र झाला.मगापासून म्हणजे अगदी 2-2.50
किमी पासून लोकांना जयघोषाने प्रोत्साहित करणारा साठेक वर्षाचा वृद्ध, त्याला वृद्ध
म्हणावे कां हा प्रश्नच होता,अधिक जोशात “जय श्रीराम, जय जय श्रीराम” जयघोष करून लागला.
श्रीराम मंदिराचे प्रवेशद्वार आता आले होते.
पायरीवर डोकं ठेवायला बंदी केली होती आणि तशी सूचना पोलिस प्रशासनाकडून
दिल्या जात होत्या.कारण मागील गर्दीच्या रेट्यात कुणी खाली पडून दुर्घटना होऊ नये,यासाठीची
खबरदारी होती.अन मग पायऱ्या ओलांडून आम्ही सगळे गर्भगृहात आलो. हलके हलके प्रभु
श्रीरामचंद्राची हसतमुख मूर्ती दिसू लागली.आपल्या मंदिरात साक्षात अवतरलेले प्रभु
श्रीरामचंद्र पाहून अक्षरशः डोळ्यातून अश्रूंच्या महापुराला मी वाट मोकळी करुन
दिली.अनेकांच्या डोळ्यात हे आनंदाश्रू मी बघितले.मी प्रभु श्रीरामचंद्राचा फोटो
याआधी पाह्यला नव्हता असे देखिल नाही किंवा अयोध्येत विराजमान श्रीरामचंद्राची
प्रतिमा देखिल पाह्यली नव्हती असेही नाही. पण प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट या
उक्तीला नाकारणारी, म्हणजे प्रतिमेहूनही देखिल उत्कट, अवर्णनिय, अनोखी, हसतमुख,आश्वासक,सुंदर,यासम हीच अशी, भावविभोर, भावविव्हळ करुन टाकणारी, स्वतःचे स्वत्व विसरायला लावणारी, स्वर्गीय सुंदरतेची अनुभूती देणारी, हलकेसे स्मित धारण केलेली रामलल्लाची मुर्ती बघितली अन नकळत हात जोडले गेले.“जय श्रीराम आणि जय जय श्रीराम”च्या प्रचंड उदघोषाने आसंमंत भारला गेला. मग त्या जपाच्या ताकदीने कोण उत्तर प्रदेशी,कोण बिहारी,कोण बंगाली,कोण मराठी यासारख्या शुल्लक गोष्टी, तर्क उपाध्या सारं सारं गळून पडलं. 4-5 किमी चालून गेलो आहोत, सोबत, आजूबाजूला 20 लाखांची गर्दी आहे. याचे दडपण जाणवत नव्हतं. "रामरंगी रंगले मन, आत्मरंगी रंगले मन" याचा अविष्कार काय असतो हे अनुभवले. धन्य झालो मी.भरुन पावलो हीच भावना मनांत ठेवून आणि प्रभु श्रीरामचंद्राची हसतमुख मूर्ती मनांत साठवून ठेवत आम्ही गर्भगृहाच्या बाहेर पडलो.
मंदिरातील आणि एकूणच व्यवस्थेविषयी:
मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर,पोलिस प्रशासनाची,होणाऱ्या
मोठ्या गर्दीस् सामोरे जाण्याच्या तयारीची
चुणूक दिसून आली. कुठेही कसलाही गोंधळ नव्हता.काय काय करायचं आणि कसं कसं करायचं याचे
स्पष्ट निर्देश दिले जात होते.गर्दी असूनही यात्रेकरू म्हणा,भाविक म्हणा, अतिशय शिस्तबद्ध
होते.मंदिर प्रशासनाने चपला,जोडे ठेवण्यासाठी मोफत व्यवस्था करून दिलेली होती.पण तिथेही
कुठे गोंधळ दिसून आला नाही.मौल्यवान वस्तु,जसे पर्सेस,एटीएम कार्ड,मोबाईल आणि मुख्य
म्हणजे तुम्ही स्मार्ट वॉच घातले असेल तर तेही लॉकरमध्ये ठेवण्यासाठी
लॉकर,मंदिर प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आले होते.तिथे गर्दी खूप होती,पण सर्व
सुचारू पद्धतीने सुरू होते.मंदिरात प्रवेश करण्यासाठी वेगळा आणि बाहेर पडण्यासाठी वेगळा
मार्ग असल्याने कुठेही गोंधळ आढळून आला नाही.आरामात दर्शन घेता आले.
समारोप:
प्रयागराज येथील कुंभमेळया प्रमाणेच आपल्या कैक पिढ्या श्रीरामाचे
अयोध्येतील दर्शनाला पारखे झाल्या असतील,पण माझ्या नशिबी हा योग आला हेच मोठे भाग्याचे
लक्षण.मग मला काही लोकांनी दशरथ महाल, लता मंगेशकर उद्यान/चौक पाहिला कां? इत्यादि
शंका विचारल्या. पण माझं म्हणून सांगतो,मला फक्त प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यात
स्वारस्य होते,मी अयोध्येला पर्यटनाला गेलोच नव्हतो मुळी.त्यामुळे मला प्रभू श्रीरामचंद्राचे
दर्शन मिळाले या गोष्टीत जी धन्यता होती, जो आत्मिक आनंद मला दर्शनाने मिळाला,त्यापुढे
ऐहिक सुखाच्या बाबी महत्वाच्या वाटत नाहीत.मला सर्वाना हेच सांगणे राहील की, या जगातून
राम म्हणण्याआधी प्रभू श्रीरामचंद्रांचे अलौकिक दर्शन अयोध्येस जाऊन अवश्य घ्या.पाप
पुण्य कुणाला माहिती,पण एक आत्मिक आनंद मिळविण्यासाठी अयोध्येस अवश्य जा.
मोबाईल आधीच आंत ठेवावे लागत असल्याने, मंदिरात फोटो मात्र काढता येत नाहीत.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा आणि एक जागरूक रहा.
प्रसाद
नातु, पुणे.
image courtesy@wikipedia

अतिशय सुरेख. आपल्या गेल्या कित्येक पिढ्या या दर्शनाची आस ठेऊन होत्या. आपल्याला ते मिळतं आहे हीच दैवी कृपा. 🙏🏼
ReplyDeleteजय श्री राम🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर लेखन.
ReplyDeleteJai shri ram
ReplyDeleteजय श्रीराम 🙏🏼🙏🏼
ReplyDelete