Blog No.2023/275
Date:- 31th,October 2023.
मित्रांनो,
काल परवा मी कराडला गेलो होतो. परवा मराठी साहित्य मंडळ,
ठाणे यांच्या तर्फे कराड येथील यशवंतराव
चव्हाण साहित्य नगरीत माझ्या “चित्र आणि चेहरा” या कथा संग्रहासाठी माझा सावित्रीबाई
फुले राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.29 तारखेला सकाळी 10 चा कार्यक्रम होता.मला पुण्याहून 10 पर्यन्त कराडला पोहोचता येणार नाही,म्हणून
28 ऑक्टोबरला आम्ही कराडला गेलो.शनिवारी नृसिंहवाडी आणि खिद्रापुरला जाऊन
दर्शन घ्यायचे ठरविले. त्याप्रमाणे श्री दत्तगुरूंच्या दर्शनानंतर आम्ही
संध्याकाळी 5 च्या सुमारास खिद्रापुरकडे निघालो.कोजागिरी पौर्णिमेचा दिवस त्यामुळे
सूर्य मावळल्यानंतर ही चंद्राच्या प्रकाशाची सोबत होती. त्यामुळे खिद्रापूरचे
सौन्दर्य आधी सूर्य प्रकाशात न्याहाळले होते आता चंद्रप्रकाशात ही बघण्याचा आनंद
घेऊ ही कल्पना.
खिद्रापूर एक धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळ
खिद्रापुरचे धार्मिक महत्व तर आहेच कारण,येथे कोपेश्वर म्हणजे शंकराची पिंड तर
आहेच पण विष्णुची शाळुंखा देखिल आहे.त्या सोबत मंदिरातील अप्रतिम शिल्प सौन्दर्य हा
तर पर्यटकांचा आकर्षणाचा विषय आहे.खिद्रापूर मुंबई पासून 415 किमी,पुण्यापासून 271
किमी, कोल्हापूरहून 60 किमी तर सांगलीहून अवघ्या 40 किमीवर आहे. सांगली हे रेल्वे
आणि रस्ते वाहतुकीने जोडलेले शहर. त्यामुळे तुम्ही ट्रेन किंवा बसने सांगली येथे
जाऊन तिथून बसने खिद्रापूरला पोहोचू शकता. स्वतःच्या कारने निघालात तर पेठनाका
येथून जाता येईल किंवा कोल्हापूरहून देखिल जाता येते. कोल्हापूर तर विमान सेवेने देखिल जोडलेले
आहे.
खिद्रापुरची धार्मिक आख्यायिका
पुराणात असं सांगितलं आहे की दक्षाच्या 16 कन्या होत्या. त्यापैकी सर्वात लहान
सती हिने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता भगवान शंकराला वरले होते.त्यामुळे दक्ष
शंकरावर नाराज होते.दक्षाने केलेल्या वाजपेय यज्ञात शंकर आणि सती दोघांना बोलावले
नव्हते. शंकर स्वाभिमानी असल्याने गेले नाहीत.पण सती माहेरला गेली आणि तिचा तिथे
अपमान केला गेला.भगवान शंकर यांची देखिल शाब्दिक अवहेलना केली गेली. या अपमानामुळे
धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेऊन सतीने प्राणत्याग केला.झाल्या प्रकरणे शंकर क्रोधित
झाले,त्यांनी आपल्या जटा आपटून आपला क्रोध व्यक्त केला. या जागीच भगवान शंकर कोपित
झाले असल्याने येथील मंदिरास कोपेश्वर मंदिर म्हणतात.भगवान शंकरांनी आपला दूत
वीरभद्र पाठवून तेथील सर्व लोकांचा विनाश केला.
भगवान शंकरांना शांत करण्यासाठी भगवान
विष्णु येथे पोहोचले,म्हणून येथे विष्णु यांची शाळुंखा आहे. तिला धोपेश्वर म्हटले
जाते. शंकरांनी सती सोबत नंदीला पाठविले होते,त्यामुळे येथे नंदी नाही.हे अशा
प्रकारचे एकुलते एक मंदिर आहे असे येथे सांगितले गेले.भगवान विष्णु आणि भगवान शंकर
हे देखिल एकत्र अभावाने पहावयास मिळतात.दक्षाने केलेल्या यज्ञाची घडना कृष्णा नदी दक्षिणेकडे
ओलांडून गेले असता,यडूर गांव लागते. या गांवी घडल्याचे बोलले जाते.येथे मंदिरासमोर
500 फुटांवर कृष्णा नदीचे पात्र आहे.येथे गावाला वळसा घालून कृष्णा माय पश्चिम वाहिनी
होते,अशा रीतीने या गावाच्या तिन्ही बाजूना नदीने वेढले आहे. गूगल मॅपमध्ये बघितलं
तर हे सहज कळून येईल.खिद्रापूरनंतर कृष्णा नदी ओलांडली की कर्नाटक राज्य आहे. यडूर
हे गांव कर्नाटकांत आहे.
मंदिराची रचना
साधारणतः आपण मंदिरांची रचना पहातो. त्यात सुरुवातीस सभामंडप असतो आणि मग आंत गाभारा असतो. ज्यात प्रत्यक्ष देवाची मूर्ती म्हणा पिंड असते. येथे ही रचना थोडी वेगळी असल्याचे अनुभवास येते.मंदिर परिसराच्या प्रवेश द्वारातून आंत गेलो. समोर मंदिर दिसतं. मंदिराच्या पायऱ्या चढून पूर्व दरवाज्यातून प्रवेश आपण मंदिरात प्रवेश करते झालो की सभामंडपाच्या आधी इथे एक मंडप लागतो,ज्याला स्वर्गमंडप म्हटले जाते. या सभामंडपाच्या वर आपण बघितले तर त्यातून आकाशाकडे सहज पहाता येते. हे एक 13 फुट व्यासाचे पोकळ वर्तुळ आहे.त्याच्या कडांवर काढलेले नक्षीकाम पहाण्यासारखे आहे. हा स्वर्गमंडप 48 खांबांवर उभारलेला आहे. या खांबावरील नक्षीकाम विलोभनीय आहे. या वर्तुळाखाली जमिनीवर तेवढ्याच आकाराची साधारणतः 1 इंच उंचीची वर्तुळाकार शिळा कोरलेली आहे.
मंदिराचा बाहेरील भाग
शंकराच्या मंदिरास आपण सर्वसाधारणपणे पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही. पण येथे
मंदिराच्या बाह्य भिंतीवर पुराणकालीन स्थापत्य कलेचा नजारा पहावयास मिळतो.मंदिराच्या
बाहेरील भिंतीवर देवदेवतांच्या,स्त्री पुरुषांच्या अप्रतिम अशा शिल्पाकृती बघावयास
मिळतात.मंदिराचे जे कठडे आहेत ते देखिल नक्षीदार कलाकृतींनी सजवलेले आहेत.
स्वर्गमंडपातून सभामंडपात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत.
एक पूर्वेकडील म्हणजेच स्वर्गमंडपातून, एक उत्तरेकडून तर दुसरे दक्षिणेकडून.या
दारांवर द्वारपालांच्या सुंदर अशा मूर्ती बघावयास मिळतात. येथे वेगवेगळी सुंदर अशी
नारीशिल्पे पहावयास मिळतात, ज्यांनी परिधान केलेले वेगवेगळे अलंकार इतके सुंदर
कोरले आहेत की आपण थक्क होऊन जातो.जवळपास कुठेच अश्या प्रकारचा काळा कातळ नैसर्गिक
दृष्ट्या उपलब्ध नाही. मग त्या काळात हा काळा कातळ येथे आणून त्यावर इतके सुंदर
कोरीवकाम करणाऱ्या त्या अज्ञात कारागिरांच्या प्रति आपण अजाणता नतमस्तक होतो.पण
भारतातील अशा सुरेख मंदिरांवर भारतावर ज्या असंख्य चढाया आक्रमकांनी केल्या,त्यात
मंदिराचे खरं तर मंदिरातील अशा सुरेख कलाकृतींचे जे नुकसान केले आहे ते निंदनीय
आहे,घृणास्पद आहे.
ज्या कलाकृतींचे वर्णन करावयास शब्द देखिल जिथे अपुरे
पडतात,त्या कलाकृती नष्ट करण्याचे,भंग करण्याचे कार्य करणाऱ्याला मन, हृदय नव्हते
कां? त्याला चांगल्या वाईटाची देखिल जाण नव्हती कां? त्याला यात काही सौन्दर्य न
दिसण्याइतके त्याचे मन कठोर,निष्ठुर होते कां? अशा व्यक्तीला माणूस म्हणायचं कां?
की शैतान,हैवान. हा इतर अशा मंदिरात गेल्यावर पडणारा प्रश्न,या मंदिराला भेट
देणाऱ्या प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की. असो.
समारोप
येती पौर्णिमा म्हणजे कार्तिकी पौर्णिमेस येथे प्रकाश महोत्सव साजरा केला
जातो. स्वर्गमंडपातील त्या पोकळ वर्तुळाच्या अगदी महोमध चंद्रबिंब अवतरते.हा क्षण
अनुभवण्यासाठी दूरदूरचे भाविक आणि पर्यटक येथे येतात असे कळले.येत्या पौर्णिमेस या
मंदिरास अवश्य भेट देऊन या अद्भुत क्षणाचा आनंद लुटण्यासाठी खिद्रापूरला भेट द्या.आणि
आपले अनुभव मला नक्की शेअर करा.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा
वाटला,हे कमेन्ट बॉक्स
मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया
उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी
रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
खूप छान माहिती
ReplyDeleteNice information
ReplyDeleteकोपेश्वर महादेव की जय🙏🌺🌺
ReplyDeleteखूप छान माहिती. ह्या सुट्टीत कोल्हापूरला जायचा प्लॅन आहे .आता नक्कीच खिद्रापूरला भेट देणार .
ReplyDelete