Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

लिव इन रिलेशनशीप,

 Blog No. 2023/44       

Date: 21st, February 2023.

 

 


मित्रांनो,

            आजकाल काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत,की ज्यामुळे लिव इन रिलेशनशीप ही संकल्पना अधिक प्रकर्षाने प्रकाशात आली आहे.लोकसत्ता दैनिकात देखिल 2-3 दिवसापूर्वी पेच नातेसंबंधांचा” हा अग्रलेख प्रकाशित झाला आहे.त्यात सर्वच गोष्टींचा छान ऊहापोह केला आहे.म्हणून मी सहज लिव इन रिलेशनशीप बद्दल अधिक जाणून घ्यायचे ठरविले. कारण विषय ज्या वेळेस ताजा असतो त्याच वेळी ब्लॉग लिहायचा असतो. हे ब्लॉग लिहिण्याचा मुख्य मंत्र हे ब्लॉग रायटींगच्या एका कार्य शाळेत शिकलेलो. आज अर्थातच माझा ब्लॉग लिव इन रिलेशनशीपवर आहे.

 



लिव इन रिलेशनशीप म्हणजे काय

            तर आधी जाणून घेऊयात की लिव इन रिलेशनशीप हे नेमके काय प्रकरण आहे. लिव इन रिलेशनशीप म्हणजे कुठल्याही विवाह बंधनात न अडकता जोडप्याने एकत्र राहणे.सध्या तरी एक पुरुष आणि एक स्त्री हिच जोडप्याची व्याख्या आहे. यापुढे कधी ती बदलेल माहित नाही.तर जोडप्याने एकमेकांपासून कुठलीही अपेक्षा न ठेवता एकत्र येणे.आपण विवाह बंधन म्हणतो त्या बंधन ह्या शब्दाचा इथे संबंध येतो.हे जोडपे कुठल्याही बंधनात नसते.भावनिक संबंध किंवा लेंगिक संबंध ह्या साऱ्या बद्दल ते दोघेच ठरवित असतात. त्यांच्या आपसातील विचारानुसार हे सारे ठरते.ही एक पाश्चात्य संकल्पना आहे. भारतीय परांपरेला काहीशी छेद देणारी ही संकल्पना आहे.

 

लिव इन रिलेशनशीप संकल्पना समजली आहे कां?

              लिव इन रिलेशनशीप संबंधात नुकत्याच घडलेल्या तीन घटना म्हणजे वसईकर श्रद्धा वालकरची दिल्लीत तिच्या मित्राने केलेली निर्घृण हत्या,त्यानंतर हरियाणातील झज्जर येथे निक्की यादव आणि मुंबईजवळ पालघर येथे मेघा ह्या लिव इन रिलेशनशीपमधे राहणाऱ्या जोडीदाराकडून हत्या.ह्या खरोखर मन चिताजनक आहेत.या तिन्ही घटनांमध्ये लिव इन रिलेनशीपमधे असे झाले म्हणून त्या पद्धतीला विरोध करणे मला तरी योग्य वाटत नाही. कारण ह्या तिन्ही जोडप्यांनी हा लिव इन रिलेशनशीप मार्ग समजून उमजून निवडला.कां लग्नाला घरचा विरोध होता म्हणून. जर समजून उमजून निवडला असेल तर लिव इन रिलेशनशीपला भारतात कायदेशीर मान्यता आहे कां? कायद्याच्या दृष्टीने लिव इन रिलेशनशीप काय आहे? ही गोष्ट जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता कां? की नाते संबंधातून पळवाट म्हणून हा मार्ग स्वीकारला होता.

            लोकसत्ताकारांनी म्हटल्याप्रमाणे तीन अशा घटना घडल्या म्हणून लगेच ही संकल्पना वाईट होत नाही. तसेच तीन पुरुषांनी असे केले म्हणून सरसकट पुरुष हे वाईट असतात असा निष्कर्ष काढत येणार नाही.अशा प्रकारे निर्घृण हत्या करणे ही विकृतीच आहे.एखाद्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून ही गोष्ट तेव्हाच घडू शकते,जेंव्हा ती व्यक्ती ही विकृत असते, सर्व साधारण व्यक्तीकडून हे होणे नाही.मग आता प्रश्न असा उभा राहतो की ह्या तीन मुलींना त्यांच्यातील ही विकृती जेंव्हा लक्षात आली तेव्हाच त्या संबंधातून त्या मुली बाहेर कां पडल्या नाहीत? त्यांना असे कुठले दडपण होते ज्यामुळे हत्या होईपर्यंत त्या जोडीदारासोबत राहिल्या.त्यांच्या पालकांना तरी त्या मुलींनी जोडीदाराबद्दल किंवा त्यांच्या अशा वागणुकीबद्दल काही कळविले होते कां? मग त्यांची प्रतिक्रिया काय होती? हे सारे आपल्या मनांत उभे राहतात.

            खरं पाहिला गेलं तर ही भारतीयांसाठी तशी नवीच म्हणजे 10-15 वर्षातील संकल्पना.ह्या संकल्पनेला   भारतात प्रचलित असलेल्या कुठल्याही धर्माची मान्यता नाही.या संबंधता कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळेच असे वाटते की ह्या संकल्पने अंतर्गत आपल्या मुलास किंवा मुलीस परवानगी देण्याच्या अगोदर त्या संकल्पनेविषयी माहिती करुन घेणे गरजेचे आहे. खरं तर कुठलीही गोष्ट विकत घेतांना ती चांगली परखून घ्यायची भारतीयांची जी मूलभूत सवय आहे, ती इथे कां काम करीत नाही. म्हणूनच ह्या तिन्ही प्रकरणात लिव इन रिलेशनशीप स्वीकारण्यामागे एक तर मुलीची किंवा तिच्या पालकांची अगतिकताच कारणीभूत असावी.

 

कायदा काय म्हणतो?

            भारतीय कायद्यात लिव्ह इन रिलेशनशीप ह्या संकल्पनेची कायदेशीर व्याख्या नाही.पण अशा बऱ्याच केसेस सर्वोच्य न्यायालयात दाखल झाल्यामुळे,त्यावर निकाल देतांना काही दूरगामी परिणाम होतील,असे निकाल सर्वोच्य न्यायालयाने दिलेले आहेत. लिव्ह इन रिलेशनशीप विवाहपूर्व लैंगिक संबंधांना मान्यता देते. त्यामुळे ह्यात मुलाचा जन्म होण्याची शक्यता असते.या मुलांना, विवाहितेतून जन्मलेल्या वारसांप्रमाणे, वारसा हक्काचे कोणतेच आधिकार कायद्याने नव्हते.समाज त्यांना अनौरस मुलांप्रमाणे वागणूक देत होता.म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1978 मधे दिलेल्या निकालात लिव्ह इन रिलेशनशीपला प्रथमच वैध ठरविले.मानसिक सुदृढता, विवाहाचे कायदेशीर वय पूर्ण करणे, संमती इ. यासारख्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यास, जोडपे कायदेशीर लिव्ह-इन नातेसंबंधात असल्याचे मानले जाते.   

महिला जोडीदारासोबत घरगुती हिंसाचार किंवा लिव्ह-इन रिलेशनशीपमधून जन्मलेल्या मुलांसह भारतातील महिलांना अपमानास्पद (मानसिक, शाब्दिक, आर्थिक आणि शारीरिक) वैवाहिक संबंधांपासून संरक्षण करण्यासाठी,घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, 2005 लागू करण्यात आला.लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये महिला जोडीदाराला संरक्षण देणे, कायद्याचे कलम 2(एफ) केवळ विवाहित महिलांनाच नाही तर ‘विवाहाच्या स्वरूपातील नातेसंबंधात’ राहणाऱ्या महिलांच्या संरक्षणासाठी लागू आहे.

            हिंदू विवाह कायदा, 1955, कलम 16 मुलांच्या वारसा हक्कांबद्दल बोलतो आणि वारसा हक्काच्या एकमेव उद्देशाने बेकायदेशीर मुलाला (लग्नातून जन्मलेल्या किंवा लिव्ह इन) कायदेशीर दर्जा प्रदान करतो. त्यामुळे लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या मुलांनाही वारसा हक्क बहाल केला आहे.हे अधिकार वडिलोपार्जित आणि स्व-खरेदी केलेल्या दोन्ही मालमत्तांना लागू आहेत.या शिवाय, कलम 125, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973, अशा मुलांसाठी आहे जे वैयक्तिक कायद्यांतर्गत भरणपोषणाचा दावा करू शकत नाहीत.हा कायदा पत्नी, महिला जोडीदार आणि मुले दोघांनाही पालनपोषणाचा कायदेशीर अधिकार देते.

 

सारांश

            आपल्या प्रचलित विवाह पद्धतीत देखिल काही उणिवा आहेत.जसे की एका बैठकीत एखाद्याचा किंवा एखादीचा जन्मभरासाठी जोडीदार म्हणून स्वीकार करणे,हे आजकाल जरा स्वीकारायला जड जाते.पूर्वी लोकसंख्या कमी होती.वाहतुकीची साधने जरी आजच्या इतकी जास्त नसली किंवा फोन वगैरेचा विस्तार नव्हता. तरी एखादे स्थळ सांगून आले की तिची किंवा त्याची चौकशी करणे त्यामानाने सोपे जायचे.ओळख निघायची.त्यामुळे सर्वच माहिती उपलब्ध होत असे. अर्थात तेव्हा सुद्धा वैवाहिक समस्या नव्हत्या अशातला भाग नाही.पण जग विस्तारले तसे सारे काही विस्तारले.आचार विचारामध्ये सुद्धा खूप फरक पडला आहे.शिक्षणामुळे शैक्षणिक प्रगती झाली.त्यामुळे लग्नाआधी एकमेकांना पारखता यावे म्हणून,काही सुशिक्षित परिवारांमधे हा प्रकार अवलंबिला गेला.पण आज लिव्ह-इन रिलेशनशीप बद्दल काहीही न जाणता,केवळ बंधनात रहावे लागू नये म्हणून, किंवा लग्नास पालकांची परवानगी नाही म्हणून जोडप्याने एकत्र रहाणे सुरु केले आहे.त्याच्यात जोखीम काय, कायदा काय म्हणतो ह्याची माहिती नसतांना देखिल लिव इन मधे रहाणे सुरु केले आहे. हे घातक आहे. म्हणूनच सर्वांनी ह्या संकल्पनेची पूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे.भलेही आपल्या घरी हा प्रसंग उद्भवणार नाही. पण आपल्या आसपास ओळखीच्या/परिचयाच्या लोकांमध्ये असे घडले तर आपल्याला त्यांना मदत करता येईल.

            कृपया कमेन्ट मधे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्की लिहा.




प्रसाद नातु, पुणे

 

 

                                        

             

Comments

  1. Mahiti sampanna blog. We have not fully understood future implications of the live in Relationship with respective to legal and social implications. You ha0ve covered the issue nicely.
    The youngsters do need guidance on this issue.

    ReplyDelete
  2. खूप वास्तववादी विवेचन.

    ReplyDelete
  3. Very informative and important blog. I agree. 👍

    ReplyDelete
  4. खूप छान विचार मांडलात 🙏

    ReplyDelete
  5. खूप सखोल माहिती विषद केलीत!छान माहितीपूर्ण लेख!

    ReplyDelete

Post a Comment