नानासाहेब नुकतेच एका सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते.सेवानिवृत्तीच्या वेळेस ते चीफ इंजीनियर,पाटबंधारे विभाग,पश्चिम महाराष्ट्र विभाग होते.सेवानिवृत्त झाल्यावर provident फंड, अर्जित सुटयांचे रोखीकरण आणि ग्रॅच्युटी मिळून जवळपास एक करोंड एवढी रक्कम मिळाली होती.त्यांच्या वडिलांची जयसिंगपूर जवळ 17 एकर शेती होती.उस हे रोखीचे पीक.नानासाहेबांना एकच बहीण होती.तिचे पती संजय हे एका साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.त्यामुळे शेतीचे उत्पन्न सगळे नानासाहेबांच्या खाती जमा होत असे. त्यांचा मुलगा अमर एका एम.एन.सी, आय.टी.कंपनीत नोकरीला होता. त्यालाही तगडा पगार. त्याचे लग्न झाले होते.त्याची बायको अपूर्वा देखील एका एम.एन.सी आय.टी.कंपनीत नोकरीला. मुलीचे प्राचीचे मिस्टर सौरव हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते.जबलपूरला.
ही सर्व पार्श्वभूमी सांगायचे कारण हेच की त्यांच्या
पैशाला कुणी दावेदार नव्हता.ना ते कुणावर अवलंबून.त्यांच्या पत्नीची,विद्याताईंची
परदेश वारीची इच्छा होती. ती त्यांनी पहिल्याच महिन्यात पूर्ण केली.मोठ्या पदावर
होते.त्याचा फायदा घेऊन त्यांनी पासपोर्ट,व्हिसा अगदी सगळे जमवून आणले.एका
प्रसिद्ध टुर कंपनीमार्फत ते दोघं मुंबईहून लंडन आणि संपूर्ण युरोप, त्यानंतर
अमेरिका, कॅनडा, दुबई, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, टोकियो,सिंगापूर फिरून भारतात
नुकतेच परतले होते.
पुण्यात पाषाण मधे त्यांचा मोठा बंगला होता.दिवाळी जवळ आली
होती.अगदी आठ दिवसांवर.मुलांसाठी, नातवांसाठी बरीच खरेदी केली होती.त्यामुळे
त्यांची लेकही दिवाळीसाठी आली होती. विद्याताईं एवढे सगळे असून देखील एक सच्च्या
गृहिणी होत्या.नोकरीत असतांना घरांत नोकराचाकरांची कमी नव्हती. पण दिवाळीचा फराळ
मात्र स्वतः करण्याविषयी त्यांचा विशेष आग्रह असे.आताही त्या एवढी जवळपास 45
दिवसांची ट्रीप आटोपून आल्यावर फराळाचे पदार्थ करण्यासाठी स्वयंपाकघरांत दाखल
झाल्या होत्या.
लेक प्राची सुट्टी काढून आईला भेटायला
आणि रहायला आली होती,पंधरा दिवसांसाठी.ती आईच्या आजूबाजूलाच होती. दिवाळीची खरेदी
फारशी करायची नव्हती.कारण त्यांनी परदेशातून बरेच काही आणले होते.विद्याताईं
फराळाचे करायला लागल्या आणि अगदी दोन तीन दिवसांत जवळपास सारेच पदार्थ
चकल्या,रव्या-बेसनाचे लाडू,अनरसे चिवडा,शेव बनवून तयार झाले होते.आज धनत्रयोदशी
होती.विद्याताईंच्या काहीसे मनांत आले.त्यांनी आता प्रवासाला गेल्या होत्या.
तेंव्हा सोबत घेतलेली डायरी काढली आणि कुणाचा तरी नंबर पाहून त्या व्यक्तीस मोबाईलवरुन
कॉल केला.कॉल आटोपला होता.कॉल झाल्यावर त्या बैठकीत आल्या आणि नानासाहेबांना म्हणाल्या
“अहो,मी आज जरा लक्ष्मीरोडला जाऊन
येते. आज धनत्रयोदशी,काही तरी घेतले पाहिजे. मला आठवतय तुम्हाला नोकरी
लागली,तेव्हा विशेष पगार नव्हते आणि तुम्ही तेंव्हा खूप स्वाभिमानी. मी वडिलांच्या
पैशाने आज धनत्रयोदशीला काही घेणार नाही. माझ्या पगारातून जे येईल ते घेऊ, म्हणून
आपण अगदी चांदीच्या चमच्या पासून सुरुवात केलेली.आठवतंय.” “हो का नाही.” नानासाहेब
म्हणाले.
“तर मग या
वर्षी खंड नको पडायला मी प्राचीला घेऊन जाते. तुम्ही येणार आहात का?” “नको तुम्ही
दोघी जा. प्राची कार चालवते ना.”नानासाहेब.
11.00 वाजता विद्याताईं आणि प्राची दोघी कारने घराबाहेर
पडल्या.सुट्टीचा दिवस नसल्याने तेवढी गर्दी नव्हती.जरी लक्ष्मीरोडला नेहमी गर्दी
असत असली तरी.जाता जाता विद्याताईं प्राचीला म्हणाल्या “प्राची माझ्या कडे आता
सगळं आहे. कुठला दागिना नाही सांग. तुझ्या बाबांनी सर्व हौस पुरवली माझी.या वर्षी
माझ्या मनांत घरच्या दिवाणखान्यात एक छान चांदीचा देव्हारा ठेवावा,ज्यात गजानन
महाराजांची,ती शेगांवहून आणलेली मुर्ती ठेवावी म्हणते मी.लहानपणी अकोल्याला
असतांना कितीदा जायची मी शेगांवला.नंतर महाराजांच्या कृपेने अकोल्याला पोस्टिंग
मिळाले.तेंव्हा देखील दर्शनाचा खूप योग आला.महाराजांची कृपया सगळी.म्हणून म्हणते
जरी त्यांना असले काही आवडायचे नाही.तरी एक आपली श्रद्धा म्हणून.” “ठीक आहे
आई,असेच करू.” प्राची म्हणाली.ठरल्याप्रमाणे त्यांनी एका सोन्या-चांदीच्या दुकानात
जाऊन मंदिर घेतले.प्राचीला वाटले आता घरी जायचे आहे.म्हणून ती पार्किंगच्या दिशेने
जायला लागली.तश्या विद्याताईं तिला म्हणाल्या “अग थांब.थोडं तुळशी बागेत जाऊन
येऊ.” प्राची त्रासिक चेहऱ्याने म्हणाली “कशाला?” “अग चल गं,जरा चक्कर मारून येऊ.”
दोघी तुळशी बागेकडे निघाल्या. विद्याताईं पुढे आणि प्राची त्यांच्या मागेमागे.त्यांनी
उजव्या बाजूची सगळी दुकाने पालथी घातली.मग डाव्या बाजूने परत येतांना एका दुकानात
त्यांना ती वस्तु मिळाली.विद्याताईंनी तो हिन्दी भाषिक असावा,असे समजून त्याला
“कितनेकी दी ये” असे विचारले.तेंव्हा त्याने 300 रुपये सांगितले.त्या त्याच्याशी
200-225 अशी बऱ्याच वेळ घासाघिस करीत उभ्या होत्या.शेवटी 250 रुपये सेट्टलमेंट
कॉस्ट ठरली होती.विद्याताईं प्राचीला म्हणाल्या “चल आता जाऊ घरी.”
थोड्याच वेळांत दोघी घरी परतल्या.त्यांनी चांदीचे मंदिर
नानासाहेबांना दाखविले.त्यांनाही खुप आवडले.
ते म्हणाले “उत्तम खरेदी,पण हे एवढेच
घेण्यासाठी खूप वेळ लागला.चार दुकाने फिरायला लागली कां?”.
तेंव्हा प्राची म्हणाली “नाही
हो,पप्पा.त्यानंतर आम्ही तुळशी बागेत गेलो.तिथे लागला एक तास.”
“मग काय आणलं काय? एवढं एक तास फिरून.”
विद्याताईंनी पर्स मधून एक छोटीशी डब्बी काढली आणि त्यातून एक वस्तु काढली आणि
दोघांनाही दाखवत त्या म्हणाल्या “हे कानातलं आणलय.अहो आपल्या सोबत विदेशवारीत
नव्हत्या कां त्या स्मिताताई.त्यांच्या कानांतलं पाहिल्या पासून इच्छा होती.” “पण केवढ्याच ते”
नानासाहेब म्हणाले “अहो काही नाही 300 रुपयांचे घासाघिस केल्यावर 250 रुपयांत
दिलं.” “अग एवढी विदेशवारी करून आपल्यावर 250 रुपयांच्या वस्तुसाठी एक तास
फिरलीस.” तेंव्हा प्राची म्हणाली “राहू द्या,शेवटी हौसेला मोल नसतं हेच खरं आणि
त्यातूनही तुळशी बागेतून घासाघिस करून काही आणलं नाही तर ती खरेदी कसली. हेच खरं.
हो ना आई”
Comments
Post a Comment