Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

यकृताचे (लिव्हर) आरोग्य जपा

ब्लॉग नं:2025/344 .

दिनांक:8 डिसेंबर, 2025. 

मित्रांनो,

आरोग्य हेच खरे धन आहे,” हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र, आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात सर्वाधिक दुर्लक्ष जर कोणत्या गोष्टीकडे होत असेल, तर ते म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे. काम, पैसा, मोबाईल, सोशल मीडिया, जबाबदाऱ्या सगळ्यासाठी वेळ असतो; पण स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. काही वर्षांनी याच निष्काळजीपणाचे परिणाम गंभीर आजारांच्या रूपाने समोर येतात.आजचा ब्लॉग आहे याच विषयावर.

सविस्तरः

आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रिया काही विशिष्ट अवयवांवर अवलंबून असतात. त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे यकृत (Liver).

यकृत – शरीराची रासायनिक प्रयोगशाळा:

यकृत हा केवळ एक अवयव नसून तो एक महत्त्वाची ग्रंथी देखील आहे. शरीरातील तब्बल 500 हून अधिक जैवरासायनिक क्रियांमध्ये यकृताची भूमिका असते. आपण खाल्लेले अन्न पचवून त्यातून ऊर्जेची निर्मिती करणे, शरीरातील टाकाऊ व विषारी घटक बाहेर टाकणे, रक्त शुद्ध ठेवणे, प्रथिने तयार करणे, चरबीचे रूपांतर करणे, औषधांचे विघटन करणे, अशी अनेक जबाबदारी यकृत पार पाडत असते. रक्ताला स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वाचे काम यकृत करते. त्यामुळेच यकृताचे कार्य बिघडले, तर संपूर्ण शरीरयंत्रणाच कोलमडू लागते.

बदलती जीवनशैली – यकृताच्या आरोग्यास धोका:

पूर्वी घरचे ताजे अन्न, चालणे, शारीरिक श्रम हे सहज घडत असे. आज मात्र घरच्या डब्याची जागा तयार अन्न, फास्ट फूड, तेलकट पदार्थ, जंक फूड यांनी घेतली आहे. व्यायामाला वेळ नाही, झोप अपुरी आहे, ताणतणाव प्रचंड वाढला आहे. परिणामी यकृतावर मोठा ताण पडत आहे. यकृताला झालेले नुकसान सुरुवातीला फारसे जाणवत नाही. परंतु कालांतराने त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात.

यकृत बिघडल्याची प्राथमिक लक्षणे:

यकृताच्या आजारांमध्ये काही सामान्य लक्षणे दिसून येतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.

1.डोळे व त्वचा पिवळी पडणे,

2.पोट किंवा पायाच्या घोट्याला सूज येणे,

3.सतत उलटी होणे, भूक न लागणे,

4.वारंवार चक्कर येणे,

5.रक्ताला शरीराचा आत्मा म्हटले जाते, आणि त्या शरीराला खाज सुटणे,

6.लघवी अतिपिवळी होणे,

7.शौचेला रक्त पडणे.

ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

यकृताशी संबंधित प्रमुख आजार

1) हेपेटायटिस (कावीळ):

यकृताचा सर्वात सामान्य आणि गंभीर आजार म्हणजे हेपेटायटिस. हा विषाणूजन्य संसर्ग असून यामुळे यकृताला सूज येते.

हेपेटायटिसचे पाच प्रकार आहेत:

हेपेटायटिस A आणि E – दूषित पाणी व अन्नातून पसरतो.

हेपेटायटिस B, C, D – संक्रमित व्यक्तीचे रक्त किंवा शरीरी द्रव संपर्कातून पसरतो.

हेपेटायटिस B आणि C पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस आणि यकृताचा कर्करोग यांचे कारण ठरू शकतात.

हेपेटायटिस A आणि B साठी लस उपलब्ध आहे; मात्र C आणि E साठी सध्या लस उपलब्ध नाही.

2) लिव्हर सिरोसिस:

हा विकार अत्यंत गंभीर असून यामध्ये यकृताला कायमस्वरूपी इजा होते. यकृत कडक होते व आकुंचन पावते. यामध्ये यकृताच्या पेशी नष्ट होऊन त्या जागी तंतुमय घटक तयार होतात.

मुख्य कारणे:

1.अतिमद्यपान,

2.जास्त चरबीयुक्त व मांसाहारी आहार,

3.वाढलेले कोलेस्ट्रॉल,

4.काही औषधांचा अतिरेक.

हा आजार प्रगत अवस्थेत गेल्यास लिव्हर ट्रान्सप्लांट हाच एकमेव पर्याय उरतो.

3) यकृताचा कर्करोग:

हा कर्करोग दोन प्रकारचा असतो:

1.थेट यकृताच्या पेशींमधून सुरू होणारा,

2.शरीरातील इतर अवयवांतून पसरणारा.

लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर, दीर्घकाळ चाललेली कावीळ यामुळे यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

या आजारावर रेडिएशन, किमोथेरपी, शस्त्रक्रिया किंवा गरज असल्यास ट्रान्सप्लांट केले जाते.

4) कावीळ (Jaundice):

कावीळ हा सामान्य पण धोकादायक विकार आहे. दूषित पाणी व अन्नामुळे तो प्रामुख्याने होतो.

रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढल्याने डोळे पिवळे दिसू लागतात.औषधोपचार आणि योग्य आहार घेतल्यास कावीळ बरी होते. मात्र, दुर्लक्ष केल्यास ती प्राणघातक ठरू शकते.

यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

स्वच्छ पाणी प्या

घरगुती, ताजी, पोषक आहार घ्या

तेलकट व जंक फूड टाळा

मद्यपान टाळा

नियमित व्यायाम करा

पुरेशी झोप घ्या

अनावश्यक औषधांचा वापर टाळा

वेळोवेळी आरोग्य तपासणी करा

हेपेटायटिस A B ची लस घ्या

समारोपः

यकृत हा आपल्या शरीराचा निःशब्द रक्षक आहे. तो आजारी पडेतोपर्यंत फारशी वेदना होत नाही, म्हणून त्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. पण एकदा यकृत बिघडले, की संपूर्ण शरीर आजारांच्या विळख्यात सापडते.म्हणूनच आजपासूनच आपल्या जीवनशैलीत थोडा बदल करा. कारण

यकृत निरोगी – तर जीवन निरोगी!

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...