Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

दिवाळी फक्त सण नव्हे व्यवसाय पर्वणी

 ब्लॉग नं. 2025/294.

दिनांक: 19 ऑक्टोबर, 2025. 

मित्रांनो,

            काल धन त्रयोदशी झाली आणि उद्या नरक चतुर्दशी.आज मात्र काहीच नाही.सध्या आपण दिवाळी किंवा दीपावली,हा आपला सर्वात मोठा सण साजरा करत आहोत.या सणाला जसं पौराणिक महत्व आहे,तसंच त्याला एक व्यवसायिक संबंधाची जोड देखिल आहे.खरीपाचा हंगाम संपून शेतकऱ्याच्या हाती चार पैसे येतात.पूर्वीच्या काळी सर्व काही शेतकऱ्याच्या हातच्या पैश्यावर अवलंबून असायचं आणि एकदा शेतकऱ्याच्या हातात पैसे आले की,ते आपल्या मनात वर्षभरात साठवून ठेवलेली कामे सुरू करीत असत.यावर आहे आजचा ब्लॉग. 

सविस्तर:

            दिवाळी हा एक सण एक उत्सव आहे.कारण दिवाळी ही आपण साजरी करत असतो.दिवाळी साजरी करण्यामागे,चार हातांना काम मिळणे हा उद्देश होताच.अगदी दिवाळीचा पहिला दिवस घेतला तर,सुरुवात होत असे बाहेर रांगोळी काढण्यापासून ते त्यात रंग भरण्यापर्यंत.हे रांगोळी साहित्य आणि रांगोळीचे रंग तयार करणाऱ्या कारागिरांना,काम आणि पैसे या निमित्ताने मिळत असतं.रांगोळी नंतर पणत्या लावल्या जातं.पणत्या तयार करण्याचे काम कुंभार वर्ग करीत असे.दिवाळीचा सण हा त्यांच्यासाठी एक उत्पन्न कामवण्याचे साधन होते.पण त्यासोबतच काही लोकांकडे,लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मीची मूर्ती घरी नेत असतात,त्या कुंभार बनवीत असत.फुलांचे हार,फुलं विकणाऱ्याना या काळात रोजगार मिळत असे.

            अभ्यंग स्नानासाठी सुवासिक उटणे आणि सुवासिक तेले बनविण्याची आणि ते विकण्याची दिवाळी, म्हणजे मोठी संधी.कारण दिवाळी शिवाय कधी उटणे वापरले जाते हे ऐकिवात नाही.लक्ष्मी पूजनासाठी छोटा झाडू ज्याला फडा म्हणतात,त्याची पूजा अलक्ष्मीची पूजा म्हणून केली जाते,त्या फडयाची निर्मिती करणाऱ्याना  या दिवसांत खूप मागणी असे.इतर दिवसांत केरसुणी किंवा कुंचा वापरणारे सुद्धा,या दिवसांत फडा विकत  घेतात.सणासाठी नवीन कपडे विकत घ्यायची प्रथा होती.जेव्हा मनात आलं तेव्हा बाजारात गेले आणि नवीन कपडे विकत आणले,असे तेव्हा नसत असे.मुख्य म्हणजे कापड घेऊन शिंप्याकडून (टेलर कडून) कपडे शिवून आणले जातं.त्या निमित्ताने त्यांना मोठं काम मिळत असे.मला आठवतंय एक तर दसऱ्याला किंवा दिवाळीला नवीन कपडे मिळत असतं.बाकी नवीन कपडे म्हणजे म्हणजे शाळेचा युनिफॉर्म.

            कोजागिरी पासून घराच्या दारासमोर,आकाश कंदील किंवा आकाशदिवा लावला जाई.ज्यांना हौस होती ते स्वतः बनवीत असतं अन्यथा आकाशदिवा बनविणे आणि विकणे,हे सुद्धा एक अतिरिक्त रोजगाराचे साधन होते.शिवाकाशीला कुणी शिवकाशी म्हणतं, फटाक्यांचे घरोघरी उत्पादन होत असे.ते फटाके विकण्याचे दुकान लावून,अतिरिक्त उत्पन्न कमावले जात असे.तसेच चकल्याची भाजणी,बेसन इत्यादिच्या दळणाच्या निमित्ताने, ज्यांच्याकडे चक्की होती,त्यांना सुद्धा अतिरिक्त उत्पन्न होत असे.

            धनतेरसला चांदी किंवा सोन्याचे अलंकार किंवा वस्तु विकत घेतल्या जात असतं.त्यामुळे सोनारांना देखिल अतिरिक्त प्राप्ती होत असे.ज्यांची सोने-चांदीच्या वस्तु खरेदी घेण्याची  ऐपत नसायची,ते तांबे किंवा पितळ याच्या वस्तु खरेदी करत असतं.त्यामुळे त्या कारागिरांना आणि दुकानांना उत्पन्न होत असे.पूर्वी सणासुदीला स्त्रिया नवीन बांगड्या भरून घेत असतं.त्यामुळे कासार घरोघरी फिरत असतं. त्याची सुद्धा या सणाच्या दिवसांत कमाई होत असे.यासोबत किराणा दुकानात,किराणा मालाची दिवाळीसाठी अतिरिक्त विक्री होत असे.अशा प्रकारे बारा बलुतेदारांसाठी,दिवाळी हा सण म्हणजे एक आनंद पर्वणी असायचा.त्या दृष्टीने दिवाळी सणाचे नियोजन असावे असे कधी कधी वाटते.

            गणपती, गौरी हे संपूर्णतः धार्मिक सण आहेत.स्नान वगैरे आटोपल्यावर उपवास ठेवून गणपतीची किंवा गौरीची स्थापना केली जाते.दिवाळीत असे काही बंधन नसते.लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी करण्यात येते.त्यामुळे सकाळी दिवाळीच्या खास पदार्थांचा फराळ,त्यानंतर सणानिमित्त दुपारी गोडाधोडाचे जेवण करुन,मग संध्याकाळी निवांतपणे लक्ष्मीपूजन करण्यात येते.वाचकांपैकी कुणी जर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर उपवास करुन,लक्ष्मीपूजन करणारे असेल तर कृपया माझ्या नजरेस आणून द्यावे.सांगायचे प्रयोजन हे की दिवाळी हा पूर्णतः उत्सव आहे. 

समारोप:

            आज देखिल वर जे जे लिहिले ते होत आहे,पण आता या सर्वाच्या जोडीने दिवाळीच्या सणाला,लोक घराची खरेदी करतात,धनतेरसला वाहन,ज्याला व्हाइट गुडस म्हणतात ते फ्रीज,वॉशिंग मशीन, मिक्सर, किंवा लॅपटॉप,मोबाईल खरेदी करत असतात.एकूण काय आता खरेदीची साधने बदलली.पण उत्साह तोच कायम आहे. दिवाळीला बोनस देण्याची प्रथा ही त्या निमित्ताने,एखादी मोठी वस्तु घेता यावी यासाठी आणि हा उत्सव अधिक उत्साहाने,उल्हासाने आणि आनंदाने साजरा करता यावा यासाठी असावी असे वाटते.एकंदरीत काय दिवाळी हा एक सण तर आहे पण ही एक व्यवसायाची संधी देखिल आहे.  

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...