ब्लॉग नं. 2025/266
दिनांक: 22 सेप्टेंबर, 2025.
मित्रांनो,
नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा
आज घटस्थापना,नवरात्राचा शुभारंभ.महाराष्ट्र हे उत्सवप्रिय राज्य म्हणून
ओळखले जाते.महाराष्ट्रात आज बऱ्याच शहरात दुर्गेची स्थापना करण्यात येते.छत्रपती शिवाजी
महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत
आणि त्यांचे आराध्य दैवत तुळजापूरची तुळजाभवानी होते.त्या
अर्थाने महाराष्ट्रातील नवरात्र उत्सवाला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. आजच्या
ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांची माहिती घेणार आहोत.
सविस्तर:
महाराष्ट्रातील देवीची शक्तीपीठ आहेत.जी साडेतीन शक्तीपिठे
म्हणून संबोधली जातात.ती आहेत, कोल्हापूरची अंबाबाई,तुळजापूरची तुळजा भवानी, माहूरगडची रेणुकामाता आणि नाशिक जवळील वणीची सप्तश्रृंगी देवी.ही सर्व
शक्तिपीठं तीर्थक्षेत्र असून नवसाला पावणारी आहेत.ही सगळी जागृत ठिकाणं आहेत असं म्हटलं जातं.यांच्याशी निगडित बऱ्याच
आख्यायिका आहेत. भाविक आपापल्या इच्छा घेऊन येतात आणि या शक्ती पीठांना भेट देतात.
नवरात्रात या शक्तीपीठांच्या ठिकाणी भरपूर गर्दी असते.
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर:
कोल्हापुरातील महालक्ष्मीचे मंदिर म्हणजेच अंबाबाईचे
मंदिर हे सर्वात जुने देवस्थान आहे.या मंदिराचे किंवा देऊळाचे बांधकाम
राष्ट्रकूटांनी किंवा त्या आधी पासूनच शिलाहार राजांनी आठव्या शतकात केले होते.
पुराणात याचा उल्लेख 108 पीठांपैकी एक आणि
महाराष्ट्रातील साढे तीन शक्तिपीठांपैकी एक असा केलेला आहे.ज्या वेळी मुघलांचे शासन होते त्या
वेळी,हिंदूंवर सूड घेण्यासाठी सर्व देऊळांचा विध्वंस आणि नासधूस केली होती.तेव्हा या
देऊळाची मूर्ती,तिथल्या पुजाऱ्याने बरीच वर्षे लपवून ठेवली होती असे म्हटले जाते.छत्रपती संभाजी महाराजांच्या
कारकिर्दीत ई.स. 1715 ते 1722 या सुमारास मंदिराची
पुनर्बांधणी केली.या देऊळात महालक्ष्मी आणि त्यांचा समोर गरुडमंडपात गरुड स्थापित
केले गेले आहेत. देवीची मूर्ती दगडी असून वजन 40 किलोग्रॅम आहेत. मागील बाजूस दगडी सिंह आहे. देवी
आईच्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनाग आहे. दक्षिणेतील भाविक तिरूपतीचे
दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मीच्या दर्शनाला येतात.ते देवीला हरीप्रिया असे संबोधतात.
तुळजापूरची
तुळजाभवानी:
तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि
आद्यपीठ मानले जाते. इथे तुळजाभवानीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजापूर उस्मानाबाद
जिल्ह्यात वसलेले आहे. पुराणानुसार असुरांचा संहार करून धर्माचरण आणि नीतीची
पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने केले आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवी.भवानीआईच्या
आशीर्वादाने,महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली.खुद्द देवी आईने
छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन,महाराष्ट्रावरील आलेल्या संकटाचे निवारण
करण्यासाठी तलवार दिली होती.असे म्हटले जाते.या संदर्भात अशी आख्यायिका आहे की,देवीचे
हे देऊळ डोंगरमाथ्यावर असल्याने याचा कळस दिसत नाही. या देऊळाचे काही भाग
हेमाडपंती पद्धतीने बांधले आहेत. नवरात्रोत्सव जरी नऊ दिवसाचा असला तरी,हा उत्सव
इथे एकूण एकवीस दिवस चालतो.
माहूर गडची रेणुका देवी:
माहूर गडची रेणुका माता ही,महाराष्ट्रातील अनेक
परिवारांची कुलदेवी आहे. माहूर गड हे,नांदेड जिल्ह्यात आहे. हे एक जागृत तीर्थ
क्षेत्र आहे.माहूरगडावर रेणुकेचे तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील मंदिरे इथे
आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजानी बांधले आहे.अशी आख्यायिका आहे की
दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला.माता रेणुकेची एक कथा सांगितली
जाते.या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांचा मुलगा परशुरामाने,आपल्या पितृ
आदेशावरून केला.नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली,ते दुखी झाले होते.
त्याच क्षणी आकाशवाणी झाली. तुझी आई तुला दर्शनास देईल. पण तू मागे वळून बघू नकोस.
परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती.त्यामुळे त्याने मागे वळून
बघितले. त्यावेळी रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता.परशुरामाला तेवढेच
दिसले.त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते.
या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले,त्यामुळे या डोंगराला 'मातापूर' म्हटले जाऊ लागले.
सप्तशृंगी देवी वणी नासिक:
या देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन
पीठांपैकी अर्ध पीठ म्हणून ओळखले जाते. ही सप्तशृंगी देवी नाशिक पासून 65 किलोमीटर वणी येथे असून हे
मंदिर 4800 फूट उंचीवर सप्तशृंगगडावर आहे.
निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवी उभ्या रूपात
आहे. या मागील अशी आख्यायिका आहे की,महिषासुर मर्दन करण्यासाठी देवी देवतांनी हीची
याचना केली,तेव्हा देवी होमातून प्रकट झाली.तिचे हेच रूप सप्तशृंगी गडावर बघावयास मिळते.हिला ब्रह्मस्वरूपिणी देखील
म्हणतात.देवीची आठ फुटी उंच मूर्ती आहे.तिला अठरा भुजा आहेत.मूर्ती शेंदूर अर्चित
असून रक्तवर्णी आहे. या देवीचे डोळे तेजस्वी असून टपोरे आहेत. सर्व हात एकमेकांना
लागलेले आहेत.महिषासुराशी लढण्यासाठी देवीला सर्व देवांनी शस्त्रे दिलेली होती असे
मानले जाते.
मित्रांनो,तुम्हाला या शक्तीपीठांची माहिती असणारच,तरी
हा ब्लॉग लिहिण्यामागे एक कारण आहे.देवी ही देवी असली तरी मुळात ती नारी आहे.आपण
मोठ्या भक्तीभावाने नवरात्र साजरे करत असतो.पण देवीची खऱ्या अर्थाने पूजा करायची
असेल तर,स्त्रीला तिचा मान सन्मान द्यायला हवा.पण असे होतांना दिसत नाही. मित्रांनो,पृथ्वीवरील ही जीवसृष्टी केवळ हवामान,पाणी यावर अवलंबून नसून,ही जीवसृष्टी अव्याहत अबाधित सुरू राहण्यासाठी
स्त्रीचे योगदान मोठे असते.नवरात्रात देवीचे उत्सव साजरे करायला हरकत नाही.पण
नारीचा मानसन्मान न राखता हे करत असू, तर तो नुसता छलावा आहे,नाटक आहे,ढोंग आहे.असं मला वाटतं.तुम्हाला काय वाटतं
कमेन्ट बॉक्स लिहा.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.



Jay mata di
ReplyDeleteउत्कृष्ट माहिती
ReplyDelete