मित्रांनो
चाळीसगाव जरी सुटलं तरी आठवणी सुटल्या
नव्हत्या.आमच्या चाळीसगाव मुक्कामातच माझ्या मोठ्या बहिणीचे,सुनंदा ताईचे लग्न
झाले.1965 साली तिचे लग्न झाले,ती लहान होती तेव्हा.मी तर अवघ्या 5 वर्षाचा
होतो.माझा जन्म झाल्यापासूनचे ते पहिले लग्न.मला जेवढे आठवते त्या प्रमाणे तिचे
लग्नही नगर पालिकेच्या शाळेत झाले होते.त्या नंतर 1967 साली नगर पालिकेच्या शाळेत
एकदम दोन लग्ने अनुभवायला मिळाली.एक माझ्या मोठ्या मामाचे अनिल मामाचे आणि सुधा
मावशीचे.ह्या खरं तर पूर्णतः कौटुंबिक घटना, पण सांगतोय यासाठी की,त्या वेळेसची
लग्न ही खरोखर मंगल विवाह असायची, त्यांत
पावित्र्य असायचं.जपलं जायचं.आज काल लग्न हा एक इवेंट असतो.
माझ्या मामा आणि मावशीच्या लग्नातलं आठवतंय.कुणाचे विशेष
लक्ष मेनू काय वगैरे याकडे नव्हते.लग्न सकाळी लागलं.त्यानंतर विधी आणि मग पंगतीच जेवण.कुणाला
काय आवडतं आहे,काय हवे आहे त्याची दखल घेतली जात होती.सर्व विधी होईपर्यंत वऱ्हाडी
मंडळी नवरदेव नवरीच्या आसपासच होते.चला आलोच आहे चाळीसगावला,तर गांव पाहून घेऊ हा पर्यटनाचा
निकष नसायचा.छान वाटायचं.आता लग्न म्हणजे इवेंट झालेत.काही ठिकाणी आधीच विधी आटपून,मग
बोहल्यावर उभे राहून उभयतांना हार घालणे वगैरे सोपस्कार.आणि केव्हा एकदा नवरा
नवरीला भेटतो किंवा तोंड दाखवितो आणि पळतो,ह्या कडे लक्ष.तिकडे धार्मिक विधी सुरू
आणि इकडे आत्या, मावश्या, भाच्या यांचे फोटो session सुरू.मग मोबाईलवर ग्रुप मधे कुणी जास्त फोटो
टाकले,यासाठी एखादी स्पर्धा असावी तसे फोटो पोस्ट होतात. मग काय काही दिवसांनी मेमरी
फूल म्हणजे मग डिलीटच करावे लागणार ना.असो.
ह्यातच त्या मिल कंपाऊंडमधे राव कुटुंबियांच्या मुलीच्या
लग्नाला उपस्थित रहायचा योग आला.त्यांची दोन मुले आणि एक मुलगी होती. मुलांची
नांवे कृष्णमूर्ती आणि वेणुगोपाल अशी होती आणि मुलीचे नांव राजमणी. राव साहेब खरं
तर खूप tough वाटायचे,पण ते
मुलीच्या लग्नामधे इतके धाय मोकलून रडले की मुलीच्या सासरी जाण्याचे दुख: काय असतं.हे
माझ्या सारख्या लहान मुलाला देखील जाणवलं. आबासाहेबांनी त्या वेळेस त्यांना खूप
आधार दिला होता.
आणखी एक गोष्ट प्रकर्षाने आठवते ते हे की, माझा एक मित्र
प्रशांत (नांव बदलले आहे) त्याचे वडील घराबाहेरच्या पारावर प्रशांतला गणित
शिकवायला घेऊन बसतं. त्याला आलं तर बरं, नाही तर ते मुंबईचे होते,त्यामुळे
शिंच्या, शिंदडीच्या असल्या काही शिव्या घालत.परिसरांत चांगले दोन चारशे फुटांवर
ऐकू जात असे.प्रशांतला मग आमच्या सोबत खेळतांना खूप लाजिरवाणे होत असे.माझे वडील
मला मात्र कधीच रागावले नाही.
आबासाहेबांनी चाळीसगावची नोकरी सोडल्यावर आम्ही एका
कुटुंबाच्या नावावर असलेल्या एका घरात काही दिवस राहिलो.कारण शैक्षणिक वर्ष
संपायचे होते.त्या वेळेस बाजूला दत्ता कुलकर्णी रहात असतं.त्या वेळेस रेडियोवर
दत्ता कुलकर्णी एक बातम्या देणारे निवेदक,ते आपल्या बोलण्यातील विशिष्ट लकबी साठी
प्रसिद्ध होते.ह्या मिल मधील दत्ता कुलकर्णीना चार मुलींच होत्या.सुषमा,संध्या,भावना
आणि कल्पना.त्यांचा काका विलासपूरला रहात असे.कुठे आहेत त्या नाही माहित आता.एकदा
आमच्या घराजवळ सांप निघाला.गोंगाटामुळे तो एका बिळात लपू लागला. त्या विश्वास
काकाने त्याची शेपटी ओढून बाहेर काढले आणि त्याचे तोंड जोरात फरशीवर आपटून त्याला
मारून टाकले.विलासपूरकडे खूप निघतात मग आम्ही हेच करतो असे ते सांगत होते.
तर चाळीसगांवच्या ह्या आणि अशा असंख्य आठवणी घेऊन चाळीसगांव सोडले ते आज आठवले.एक 5-6 वर्षापूर्वी,मी त्या जुन्या पैकी काही गोष्टी, काही जागा,काही जुन सापडत कां ह्याचा शोध घेतला.तो स्टँडकडे जाणारा लांबच लांब रस्ता,एसटी स्टँड जवळ लोटस टेम्पल सारखे दिसणारे मंदिर.जुनी झालेली माझी आवडती आ.बं.हायस्कूल,ती पूर्णपणे बदललेली सरस्वती प्राथमिक शाळा दिसली.आठवणी होत्या माझ्या हृदयात,पण जागेवर काहीच न दिसल्याने आलो नसतो तर बरं झालं असतं ह्या नैराश्यमय विचारानेच मी परत फिरलो.
प्रसाद नातु
88888 18589
मध्यंतरी मी गुगलवर सर्च केले असता सॅटेलाईट व्हीव मध्ये ती मिलची चाळ जशी होती तशीच दिसून आली. छान आठवणी.
ReplyDelete