ब्लॉग नं.2025/045
दिनांक: 14 फेब्रुवारी,2025.
मित्रांनो,
आमच्या
या यात्रेतील शेवटचा टप्पा होता,वाराणसी.वाराणसी किंवा बनारस किंवा काशी अशा तीन नावांनी
ओळखले जाणारे हे शहर, गंगा नदीच्या काठी वसलेले आहे. प्रयागराजला गंगा,यमुना आणि सरस्वतीच्या
संगमानंतर ही नदी काशीला पोहोचते.12 ज्योतिर्लिंगामद्धे अग्रक्रम या मंदिरास दिला जातो.वाराणसी
हे प्रयागराजच्या पूर्वेस 122 किमीवर आणि अयोध्येच्या दक्षिणेस 219 किमी वर स्थित आहे,जिथे
सध्या कुंभमेळया दरम्यान पोहोचण्यास 4.30 तास लागतात.आम्हाला पोहोचवयास 6.30 तास लागले,कारण
त्या दिवशी खूप गर्दी होती.अयोध्येहून सुल्तानपुर,जौनपूर मार्गाने आपण वाराणसीला पोहोचतो.पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचा हा मतदार संघ असल्याची चुणूक तेथील रस्त्यांवरून दिसून येते.आमचे
हॉटेल काशी विश्वनाथ मंदिरापासून बरेच दूर होते. आजचा ब्लॉग वाराणसी वर आहे.
सविस्तर:
सर्वात आधी
आपण या मंदिराविषयी थोडे जाणून घेऊ. काशी विश्वनाथ मंदिर हे मूळचे,आदि विश्वेश्वर मंदिर,मोहम्मद घोरीने,भारतावरील
आक्रमणादरम्यान पाडले होते.त्यानंतर, सम्राट अकबराच्या कारकिर्दीत
मानसिंग पहिला आणि तोडरमल यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. अनेक ऐतिहासिक
वृत्तांनुसार, मुघल सम्राट औरंगजेबाने 1669 मध्ये हिंदू मंदिर पाडण्याचा
आदेश दिला.त्यानंतर,1678 मध्ये,
ज्ञानवापी मशीद त्याच्या जागेवर
बांधण्यात आली.परंतु हिंदू यात्रेकरू मंदिराच्या अवशेषांना भेट देत
राहिले.सध्याची रचना म्हणजे 1780 साली इंदूरच्या मराठा शासक अहिल्याबाई होळकर
यांनी लगतच्या जागेवर बांधलेले मंदिर होय.मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर मंदिराच्या एका
बाजूस ज्ञानवापी मशीद दिसून येते. 2021 मध्ये, मंदिर
संकुलाचा मोठा पुनर्विकास पूर्ण झाला आणि गंगा नदीला मंदिराशी जोडणाऱ्या काशी
विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे पंतप्रधान मोदी यांनी उदघाटन केले,ज्यामुळे
पर्यटकांमध्ये अनेक पटीने वाढ झाली.पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा हा काशी विश्वनाथ
धाम कॉरिडॉर पर्यटकांसाठी बंद केला होता.
आम्ही
ऑटोरिक्शाने मंदिरापासून 2.30/3.00 दूर पोहोचलो.अफाट गर्दी म्हणजे मी आपल्या संपूर्ण
जिवनात अशी अफाट गर्दी पाह्यली नव्हती.इतकी गर्दी तिथे एका चौकात पहायला मिळाली. येथील
व्यवस्था मात्र अयोध्या आणि प्रयागराज येथील पोलिस व्यवस्थेसारखी चोख नव्हती आणि पोलिस
प्रशासन गर्दीपुढे हतबल झालेले आणि गोंधळलेले दिसले.दर्शनासाठीची रांग ही गंगाघाटापासून
सुरू झालेली होती.कुठून रांगेत लागायचं हे देखिल कुणी सांगू शकत नव्हतं.मुंबईच्या लोकलच्या
गर्दीत शिरले की आपण ट्रेन मध्ये आणि तिथून बाहेर देखिल निघतो,तसेच आम्ही गर्दीत रांगेत
लागलो.रांग थोडीशी देखिल पुढे सरकत नव्हती. रांगेच्या उजव्या हाताला सगळी दुकाने असल्याने,बरेच
यात्रेकरू दुकानात जायचे निमित्त सांगून रांगेत घुसखोरी करत होते. काही ठिकाणी पोलिसांच्या
देखरेखीखाली घुसखोर घुसखोरी करत होते.आम्हाला आधी एकाने रु.1100/- प्रत्येकी देऊन फास्ट
दर्शनाचा मार्ग सांगितला,तो यापैकीच एक असावा असे वाटून गेले.
मोफत
दर्शनाच्या रांगेत उभे राहून दर्शन करण्यासाठी थांबलेलो आम्ही,आम्हाला थोड्या वेळाने
वाटू लागले की आम्ही चूक तर नाही केली. रांग 100-125 मीटर पुढे गेल्यावर,आता किती वेळ
लागेल म्हटल्यावर 2-2.30 तास हे ठरलेले उत्तर ऐकायला मिळत होते.20 लाख यात्रिक दर्शनासाठी
आले होते.मंदिराकडे जाणारे अरुंद रस्ते, दुतर्फा असलेली दुकाने आणि त्यातून बॅरीकॅड
उभे करून केलेल्या रांगा,यामुळे रांगेतून मंदिरात पोहोचायला 5 तास लागले.मंदिरापर्यंत
पोहोचल्यावर आंत गर्भगृहात पोहोचण्यास आणखी एक तास लागला.एका बाजूला मंदिराचा कळस आणि
त्याच्या बाजूला लागून ज्ञानवापी मशीद दिसून येते.या सगळ्या काही वेळेस भळभळणाऱ्या
जखमांसारखे वाटते.हे सारे आपले होते आणि आहे आणि तरी त्यासाठी संघर्ष करावा लागतो,याचं
वैषम्य वाटू लागतं.जे रामजन्म भूमी बद्दल तेच काशी विश्वनाथांबद्दल. त्यातला श्रीरामजन्म
भूमीचा वाद निकालात निघाल्याचे आणि संपल्याचे पाहून समाधान वाटते.
काशी
विश्वनाथ मंदिरात ज्योतिर्लिंग आहे,पण सदैव पिंडीसमोर उपस्थित असलेला नंदी नसल्याचे
प्रकर्षाने जाणवते. पण एका स्थानिकाला विचारले असता,त्याने शंकरासमोरील मोठा नंदी अजूनही
ज्ञानवापी मशीदीत असल्याचे सांगितले.खूप भव्य असे मंदिर बघण्यासाठी योग्य वेळ ही महाकुंभ
संपल्यावर आणि महाशिवरात्र,श्रावण महिना नसतांना जावे असे म्हणतात. कारण काशी
विश्वनाथ धाम कॉरिडॉर आम्हाला पहाता आला नाही. कारण काही लोक सांगत होते की तो बंद
आहे,तर काही सांगत होते की तो पहाण्यासाठी अजून 4-5 किमी चालावे लागेल.मोठ्या भाविक
मनाने या अग्र मानान्कित देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी येथे पुन्हा यायला हवे असे मनांत
योजून घेतले.
पोलिस व्यवस्था आणि मंदिरातील व्यवस्था:
सुरक्षेच्या
कारणास्तव मंदिरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी, पोलिसांची व्यवस्था होती. सैरभैर पोलिस,
गोंधळलेले वाटले.रांगेत कुठून लागायचे वगैरे कुठलीही सूचना देत नव्हते किंवा तसे फलक
देखिल लावलेले नव्हते. दर्शनासाठी क्षणभर थांबू देत नव्हते. याची तक्रार करायला गेलो
तर तिथे सारे आमच्याकडे तक्रार करून नका,एक वरिष्ठ अधिकारी यासाठी नियुक्त आहे,त्याचा
नंबर देखिल ते देत नव्हते.नंतर कळले की,तो वरिष्ठ अधिकारी म्हणजे पोलिस आयुक्त (Police Commissioner) आहे.मौल्यवान वस्तु, मोबाईल,पर्स,स्मार्ट वॉच आणि चपला जोडे
हे दर्शन रांगेच्या बाजूला असलेल्या खासगी दुकानांच्या लॉकरमध्ये आपल्या जबाबदारीने
ठेवायचे होते.येथील गंगा आरती पहाणे आणि रात्रीच्या वेळी घाट पहाणे हे सुद्धा महत्वाचे
मानले जाते. गंगा आरती 6.00 वाजता होती आणि आम्ही 6.00 वाजेपर्यंत रांगेत असल्याने
याचा लाभ घेता आला नाही. पण महाकुंभात स्नान आटोपल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्राचे आणि
भगवान महादेवाचे दर्शन घेण्याचा आनंद घेता आला. यांत धन्यता वाटते.प्रयागराज, अयोध्या
आणि वाराणसीला पर्यटनासाठी पुढे जाता येईल असा विचार मनांत येऊन गेला.आम्ही 8 पैकी
6 जण पंचावन पार केलेले आणि त्यातील 4 जण साठी पार असलेले असतांना,एवढ्या प्रचंड गर्दीत
आणि दमणूक करणाऱ्या प्रवासातून आम्ही सुखरूप परतलो, हेच या देवांच्या दर्शनाचे फलित
आहे असे म्हणता येईल. कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात असलं तरी
देखिल,कार्य यशस्वी होण्यासाठी, त्याला भगवंताचे अधिष्ठान असणे गरजेचे असते, असे मी
मानतो आणि त्यावर माझा विश्वास आहे.
समारोप:
या
तीन तीर्थस्थानांच्या यात्रेहून मोठ्या समाधानाने आम्ही नागपूरला परतलो.पण या यात्रेत
आम्ही कुठल्या हॉटेल्सला थांबलो आणि तेथील व्यवस्था कशी होती? आम्ही नागपूरहून कसे
गेलो? या प्रवासादरम्यान आलेल्या अडचणी हे सारे लिहिण्यासाठी एक ब्लॉग मला लिहावा लागेल.
तो उद्या लिहिन. आजच मी महाकुंभचा व्हिडीओ पाह्यला, 15 ते 24 फेब्रुवारी तेवढी गर्दी
नसेल म्हटलं जातंय. बघा 144 वर्षातून एकदाच येणाऱ्या या सोहळ्याचा आनंद घ्या.एका अद्भुत
अशा प्रसंगाचा आनंद लुटा.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा आणि एक जागरूक रहा.
प्रसाद नातु, पुणे.
छान वर्णन
ReplyDeleteमस्त
ReplyDelete