Blog No.2025/050.
Date: -19th, February,2025
मित्रांनो,
कालच मी “छावा” या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील हिन्दी चित्रपटाविषयी ब्लॉग लिहिला त्या महान योध्याला ज्यांनी जन्म दिला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,यांचा जन्म आज झाला. आज त्यांची जयंती.लाखोंचा पोशिंदा आजच्या पवित्र दिनी जन्माला आला.आपले बुद्धी चातुर्य,युद्ध चातुर्य,पराक्रम, स्वाभिमान,आत्मविश्वास या असंख्य गुणांच्या भरवश्यावर ज्यांनी हिंदवी साम्राज्याची स्थापना केली.त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वहाण्यासाठी हा माझा आजचा ब्लॉग.
सविस्तर:
छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेऊन भलेही निवडणुका जिंकता येतील,पण त्यांनी जे सुराज्य स्थापन केलं होतं,त्यामागची महाराजांची दृष्टी आजच्या किती राजकारण्यांकडे आहे.प्रजाहितदक्ष राजा असा लौकिक त्यांना उगीच प्राप्त झाला नव्हता.त्यांची दूरदृष्टी ही त्यांनी उभारलेल्या नौदलातून दिसून येते.त्यांच्या मुत्सद्देगिरीचा परिचय त्यांच्या चरित्रातून वारंवार दिसून येतो.
त्यांचे निरीक्षण किती जबरदस्त होतं,हे आग्र्याहून सुटकेसाठी त्यांनी केलेल्या नियोजनावरून स्पष्ट होतं.
त्यांना आपल्या अधिपत्याखालील आणि एकंदरीतच प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती होती.आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने,त्यांनी थोडया फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल फौजा आणि आदिलशाही फौजांचा केवळ यशस्वीपणे सामना केला नाही,तर त्यांना थोपवून धरलं, त्यांच्यावर विजय मिळविला.राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी ऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले आणि राज्यकारभार अधिक सुलभ केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुन: स्थापित केली.त्यांनी शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले.त्यांनी राज्य कारभारासाठी स्थापन केलेले 8 मंत्री असलेले अष्टप्रधान मंडल त्यांच्यातील द्रष्टेपणाची साक्ष देतात. त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि अनेक किल्ले जे सामरिक दृष्ट्या महत्वाचे होते,अशा किल्ल्यांवर ताबा मिळविला.
समारोप:
छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिता खूप येईल,पण त्यांच्या विषयी माहित नाही असा मराठी माणूस विरळाच.भारतात इतरत्र जेव्हा इतर राजे आपले राज्य टिकविण्यासाठी,प्रसंगी मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारायला तयार होते किंवा स्वीकारत होते.तेव्हा महाराष्ट्रात किंबहुना अखिल भारतात छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे योध्ये महापुरुष उदयास आले.ज्यांनी प्राणपणाने लढून मुघलांचे दास्यत्व न स्वीकारता आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मुघलांच्या झेंड्याला महाराष्ट्रात येण्यास नाकारले.असं म्हटलं जातं की हिंदू धर्म जिवंत राह्यला,तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आणि त्या वेळेसच्या विशेषतः औरंगजेबाची मानसिकता विचारात घेतली,तर मला या कथनात कुठेही अतिशयोक्ति वाटत नाही. आज त्यांच्या जयंती दिनी त्यांना मानाचा मुजरा.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
Comments
Post a Comment