ब्लॉग नं. 2024/296.
दिनांक:7 डिसेंबर,2024.
मित्रांनो,
आपण पूजेत कापूर वापरत असतो. खरं सांगायच झालं “कर्पूर आरती” झाल्याशिवाय आरतीचा कार्यक्रम पूर्ण होत नाही. सगळ्या देवांची आरती म्हणून झाली की “कर्पूर गौरं” ने आरती कार्यक्रमाची सांगता होते. पण म्हणून कापूर हा फक्त धार्मिक दृष्टीनेच महत्वाचा आहे असे नसून कापूर हा बहुगुणी पदार्थ आहे. त्याचे अनेक उपयोग सांगितले जातात.आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत.
सविस्तर:
पुजेसाठी वापरला जाणारा कापूर हा एक बहुगुणी आहे.याच्या वापराने काही शारीरिक समस्या काही दिवसांत बऱ्या होतात,असे म्हटलं जातं. असं मानलं जातं की कापरामध्ये वास्तू दोष आणि घरातील नकारात्मकता दूर करण्याची क्षमता असते. या कारणास्तव कापूर अत्यंत पवित्र मानला जातो.आणि पूजेच्या वेळी कापूर वापरला जातो.
तुम्हाला माहीत नसेल पण कापरामध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे तुमच्या सर्व शारीरिक समस्या दूर करू शकतात. कापरामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. याशिवाय विविध समस्यांमध्ये कापूर कसा वापरावा, हेही समजून घेणं आवश्यक आहे.
कापरापासून कोणकोणते फायदे मिळतात:
1. कापूर तणाव दूर करतो आणि शांत झोप लागते: ◼️ कापराचा सुगंध मनाला शांत करतो. जर तुम्हाला जास्त ताण येत असेल तर, एका भांड्यात कापूर ठेवा आणि खोलीत ठेवा. यामुळं तणाव दूर होईल आणि तुम्हाला बरं वाटेल. शिवाय, तुम्हाला रात्री चांगली झोपही लागेल.
2. कापूर डोकेदुखी दूर करतो: ◼️ डोकेदुखीचा त्रास झाल्यास कापूर, अर्जुन वृक्षाची साल आणि पांढरं चंदन समप्रमाणात बारीक करून कपाळावर लावावं. थोडा वेळ तसंच पडून रहावं. या उपायानं तुम्हाला भरपूर आराम मिळेल.
3. स्नायू वेदना आणि खोकल्यापासून आराम: ◼️स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी कापूर देखील उपयुक्त मानला जातो. यासाठी मोहरीच्या तेलात कापूर टाकून नियमितपणे शरीराची मालिश करावी. खोकला झाल्यास या तेलानं छातीला आणि पाठीला मालिश करा. तुम्हाला भरपूर विश्रांती मिळेल. तुम्ही मोहरीऐवजी तिळाचं तेलही वापरू शकता.
4. सर्दीपासून आराम: ◼️ सर्दी झाल्यास गरम पाण्यात कापूर टाकून वाफ घेतल्यानं सर्दीपासून आराम मिळतो.
5. त्वचेवरील दाग दूर होतात: ◼️खोबरेल तेलात कापूर मिसळून ते नियमितपणे त्वचेवर लावावं. यामुळे त्वचेवरील डाग दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते. पण जर त्वचा तेलकट असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर हे करा.
6. केसांतील कोंडयाची समस्या दूर होते: ◼️खोबरेल तेलात कापूर मिसळून केसांमध्ये लावल्याने कोंड्याची समस्या दूर होऊन केस काळे राहतात.
7. टाचांच्या भेगा दूर होतात: ◼️हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या खूप सामान्य आहे. अशा स्थितीत कापूर तेलात पाणी मिसळा आणि त्यात काही वेळ पाय ठेवा. यानंतर पाय पुसून क्रीम किंवा तेल लावा. यामुळे तुम्हाला काही दिवसांत आराम मिळेल.
समारोप:
अशा प्रकारे कापूर आपल्याला छोट्या छोट्या व्याधीपासून दूर ठेवण्यास मदत करतो. म्हणूनच कापूर हा बहुगुणी पदार्थ आहे असे म्हटले जाते.तुम्ही या व्याधीपासून स्वतःला मुक्त ठेवू शकता.अर्थात यांत तो कापूर शुद्ध म्हणजेच भीमसेनी कापूर असायला हवा तरच त्याचे परिणाम तुम्ही अनुभवू शकाल.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु,
Useful information 🙏
ReplyDelete