Blog No.2025/051.
Date: -20th, February,2025
मित्रांनो,
आज माघ वद्य सप्तमी म्हणजेच संत गजानन महाराज, शेगाव यांचा प्रगट दिन.याच दिवशी शेगावीचे संत गजानन महाराज शेगांवला प्रगटले.देविदास या ब्राम्हण व्यक्तीकडे ऋतु शांतीचे जेवण सुरू होते,त्यात पंक्ती सुरू होत्या,त्या पंक्तीतिल उष्ट्या पत्रावळीवरील अन्नाची शिते वेचून महाराज खात बसले होते.देविदासच्या घरासमोर बाहेर रस्त्याच्या कडेला टाकल्या जात होत्या.शेगांव निवासी बंकटलाल हा एक भाविक गृहस्थ आणि त्याचा मित्र दामोदर पंत यांच्या दृष्टीस संत गजानन महाराज तिथे बसलेले दिसले.हा खूप मोठा योगीराज असावा,त्यांनी महाराजांसाठी आतून पक्वान्न भरलेले ताट समोर आणून ठेवले आणि तांब्या भरून पाणी आणून ठेवले.पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत तेथील गाई गुरांसाठी असलेल्या ओढ्यातील गढूळ पाणी प्यायले.यावरून अन्न हे पूर्णब्रम्ह आहे,ते वाया घालवू नये. हा संदेश संत गजानन महाराजांनी दिला.
सविस्तर:-
त्या नंतर संत गजानन जवळजवळ 28-29 वर्षे शेगांवात होते.या कालावधीत त्यांचे अगणित भक्त शेगांव आणि विदर्भात झाले होते.संत गजानन महाराज हे चमत्कार करणारे साधू किंवा संत नव्हते.पण ज्याला त्यांचे महात्म्य कालू शकले नाही,त्यांनाच त्यांनी दाखले देऊन आपले महात्म्य पटवून दिले होते.श्री गजानन विजय ग्रंथात त्यांच्या शेगांवच्या वास्तव्यात जे प्रसंग घडले जे त्यांचे संतत्व प्रामुख्याने दाखवून देते.ते प्रसंग मी खाली उद्धृत करत आहे.
1. बंकटलालच्या घरी महाराज वास्तव्यास असतांना एकदा ते कुणालाही काही न सांगता घरून निघून गेले हे पाहून बंकटलाल हा जो महाराजांचा खराखुरा भक्त होता तो कासावीस झाला आणि त्याने शोधाशोध सुरू केली.तर महाराज शंकर मंदिरात बसून होते. बंकटलाला सोबत असलेल्या पितांबराने जवळच असलेल्या माळीणीच्या घरून झुणका भाकरी आणून दिली आणि जवळच्या ओढयावर तो तांब्या घेऊन पाणी आणायला गेला पण ओढ्याला पाणी नव्हते.पण त्याने ओढयातील एका खळग्यात तो तांब्या बुडविताच तो तांब्या पूर्ण काठोकाठ भरला.
2. असाच कुणी एक गोसावी एकदा महाराजांना गांजा पाजायचा असा नवस बोलून आला होता.पण महाराजांना कसं सांगावं हा प्रश्न त्याला पडला. ऑन महाराजांनी स्वतः त्याच्या मनातील भाव ओळखून बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले नवस बोलतांना तुला संकोच वाटला मग आता कां संकोच करतोस. असं म्हणत कधीही उक्ती आणि कृतीचा मेळ असावा हा उपदेश केला.
3. शेगांव नगरीतील जानरावावर गंडान्तर आले होते.आता बहुतेक हा जाणार असे वाटत असतांना लोकांनी महाराजांना जानरावाच्या घरी बोलावले. त्याची महाराजांवर दृढतर अशी श्रद्धा होती,महाराजांनी दिलेल्या तीर्थाने जानराव बरा झाला.तेव्हा शेगांव नगरी असा भ्रम होऊ नये की महाराज शेगांवांत आहेत तोपर्यंत कुणाला मरणच येणार नाही. म्हणून त्यांनी गंडान्तराचे तीन प्रकार भक्तांना सांगितले. गंडान्तराचे तीन प्रकार म्हणजे आध्यात्मिक,आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. आधिभौतिकाची सुरुवात ही कुपथ्याने होते आणि मग दुखणे बळावत जाते.या गंडान्तराचे परिमार्जन जर चांगला वैदू आणि चांगले औषध मिळाले तर होते. आधिदैविक गंडान्तराचा नाश हा देवाचे जर अनुष्ठान असेल,श्रद्धा आणि दृढतर भक्ती असेल तर होत असते. पण आध्यात्मिक गंडान्तर हे गंडान्तर हे कुठलाही उपाय केला तर टाळता येत नाही. जानराव देशमुखावरील गंडान्तर हे आधिदैविक स्वरूपाचे होते.हे ज्ञान महाराजांनी शेगांव वासीयांना दिले.
4. गोविंदबुवा टाकळीकरांचा घोडा आणि सुकलालाची गाय महाराजांच्या सान्निध्य लाभता शांत झाले.महाराजांचे महात्म्य हे जनावरांना देखिल समजायचे हे यावरून स्पष्ट होते.
5. एकदा संत गजानन महाराज अकोल्याच्या आवारात भास्कराच्या शेतात माध्यानाला येऊन बसले आणि त्यांनी भास्कराला पिण्यास पाणी मागितले. भास्कर म्हणाला की या कोरड्या ठणठणीत विहीरीतून तुला कुठून पाणी आणून देऊ.महाराज विहीरीच्या काठावर जाऊन बसले आणि नमन केले आणि क्षणात निर्झर विहिरीला पाणी आलं.भास्कर ज्याला महाराजांची ओळख झाली नव्हती,त्याला महाराजांचा अधिकार कळून आला. पुढे तो महाराजांचा शिष्य म्हणून नावारूपास आला.
6. महाराजांचा एक भक्त, पुंडलीक याला जेव्हा महाराजांनी त्याच्या गावाला म्हणजे कोंडोलीला पाठवले. तेव्हा गांवकऱ्यांनी त्याला चिडवू लागले आणि म्हणून लागले,जर महाराजांचा खराखुरा शिष्य असशील तर तू या वठलेल्या वृक्षाला पालवी आणून दाखवं.भक्त पुंडलीक घाबरला आणि मनोमन धावा करू लागला.आणि आश्चर्य म्हणजे वटलेल्या वृक्षाला पालवी फुटली.महाराज हे भक्ताच्या मदतीसाठी नेहमी धावून येत असत,हे यातून दिसून येतं.
7. एकदा महाराज आणि त्यांचे सर्व भक्त आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले असता. महाराज आणि इतर भक्त दर्शनासाठी निघून गेले.बापुना बिचारा मठात एकटा बसून राह्यला.त्याला वाटलं आता आपल्याला दर्शनाविनाच परत जावे लागणार.पण निराश होऊन बसला असता.महाराजांनी त्याच्या मनातील भावना जाणल्या.ते दोन्ही हात कटीवर ठेऊन उभे राह्यले आणि तेथेच विठ्ठलाचे दर्शन घडविले. असे भक्तवत्सल होते महाराज.
असे अनेक प्रसंग सांगता येतील पण विस्तार भयाअभावी एवढेच प्रसंग देतो.सारे काही जाणून घेण्यासाठी श्री गजानन विजय या ग्रंथाचे अवश्य पारायण एकदा तरी करावे.
समारोप:
संत गजानन महाराज प्रगट दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात शेगांवच्या मंदिरात आणि ठिकठिकाणी जिथे त्यांचे मंदिर आहे किंवा जिथे त्यांचे भक्त आहेत,तिथे साजरा केला जातो.एयरकंडिशन हॉटेल मध्ये वास्तव्य करणाऱ्या आणि आलिशान कारमद्धे हिंडणाऱ्या ढोंगी तथाकथित साधू संताच्या चरणी आपले मस्तक ठेवणे मला नेहमीच नकोसे वाटले.महाराजांच्या चरणी माझी अगाढ श्रद्धा आहे आणि म्हणून आजचा हा ब्लॉग मी त्यांच्या चरणी अर्पण करतो.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
🕉️ श्रींच्या प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ReplyDelete🙏
ReplyDelete